रासायनिक शेती आणि मानवी आरोग्य

एखादे पीक घेत असताना जसे तुमच्यासाठी काही उत्पादन केले जाते तसे जमीन व त्यातील सूक्ष्मजीवासाठीही निसर्गात उत्पादन होतच असते. आपण त्यांचा भाग जमिनीला परत दिल्यास जमिनीची सुपीकता खालावतेय, हा प्रश्‍नच संपून जातो.
संपादकीय
संपादकीय
हा लेख लिहिण्यामागे मुख्य उद्देश असा आहे, की १९९०-२००० दरम्यान हरितक्रांती बदनाम होण्यामागे फक्त रसायनांना दोष दिला जातो हे कितपत योग्य आहे. यावर सेंद्रिय शेती हा योग्य पर्याय होऊ शकतो का? या सर्वामागे पायाभूत विज्ञान आहे, त्याचा अभ्यास न करता एक हत्ती व सात आंधळ्यांच्या गोष्टी प्रमाणे प्रत्येक जण आपले मत मांडत आहे. कोणतेही पीक वाढण्यासाठी त्याचे पोषण जमिनीतील सूक्ष्मजीवांमार्फत केले जाते. या कामापोटी सूक्ष्मजीव जे काम करतात त्यासाठी त्यांची शरीरवाढ व प्रजोत्पादन या कामासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा वापर केला जातो. यानुसार एखादे पीक घेणे म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब संपविणे, उत्पादन जास्त मिळविणे अगर दीर्घ मुदतीची अगर बहुवार्षिक पिके घेत असता जास्त जास्त सेंद्रिय कर्ब संपतो. जुन्या कमी उत्पादन देणाऱ्या जाती लावल्यास सेंद्रिय कर्ब कमी संपतो. एखाद्या पिकाच्या काढणीनंतर जितका सेंद्रिय कर्ब आपण वापरून संपविला त्यापेक्षा थोडा जास्तच जमिनीला परत दिल्यासच जमिनीची सुपीकता टिकून राहू शकते. अनेक कारणामुळे आता आपण गरजेइतका सेंद्रिय कर्ब परत देऊ शकत नाही. डॉ. एफ. जे. स्टिव्हन्सन आपल्या ‘ह्युमस केमेस्ट्री’ या पुस्तकात लिहितात की शेतकऱ्याने सेंद्रिय कर्ब वापराकडे दुर्लक्ष केले तरी मूळ जमिनीमध्ये असणाऱ्या सेंद्रिय कर्बाचे जिवावर जमीन तुम्हाला २०-२५ वर्षे उत्तम पीक देऊ शकते. त्यानंतर उत्पादकतेचे प्रश्‍न निर्माण होतात. या संदर्भानुसार ज्या ज्या ठिकाणी हरितक्रांती झाली त्या त्या ठिकाणी २०-२५ वर्षांनंतर उत्पादकतेचे प्रश्‍न निर्माण होऊन ती बदनाम झाली. दुसरा कोणताच सक्षम पर्याय पुढे नसल्याने यातून शेती रेटणे चालू आहे. या अभ्यासातून माझे स्पष्ट मत आहे की जमिनीची सुपीकता व उत्पादकतेचे प्रश्‍न निर्माण होण्यामागे रसायनांचा वापर हा मुळातच दोष नसून चुकीचे सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन हा दोष आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर गेले २५ वर्षे सेंद्रिय खत व्यवस्थापन या विषयावर काम करीत आहे. यावर माझी मते प्रचलित मतापेक्षा खूप वेगळी आहेत. पशुपालनातून सेंद्रिय खत व्यवस्थापन हा विषय कालबाह्य झाला आहे. (माझे वैयक्तिक मत सर्वांनी सहत व्हावे असा आग्रह नाही.) एखादे पीक घेत असताना जसे तुमच्यासाठी काही उत्पादन केले जाते तसे जमीन व त्यातील सूक्ष्मजीवासाठीही निसर्गात उत्पादन होतच असते. आपण त्यांचा भाग जमिनीला परत दिल्यास जमिनीची सुपीकता खालावतेय, हा प्रश्‍नच संपून जातो. किमान जमीन न नांगरता शेती करावयास शिका. मागील पिकांचे अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत. दोन पिकांच्या ओळीत युक्तीने तणे वाढवा व जशी आहेत तशीच तणनाशकानेच मारा. आपली सेंद्रिय खत व्यवस्थापनाची गाडी अजून २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले खत वापरा इथेच अडकून पडली आहे. कालानुरूप शेती करण्याच्या पद्धतीत जे बदल करणे गरजेचे आहे त्यावर अभ्यास न करता जुने ते सोने यातच आपण जास्त रममाण झालो आहोत. जमिनीतील सूक्ष्मजीवांचे कार्य शेतकऱ्यांना समजून सांगणे गरजेचे आहे. सुपीकता कमी झाली म्हणजे नेमके काय झाले? व परत मूळ पदावर जमीन नेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? बिना नांगरणी व तण व्यवस्थापनातून मी बिघडलेली जमीन दुरुस्त केली व आता ती ५०-६० वर्षांपूर्वी पिकत होती तशी त्यावेळेपेक्षा कमी खर्चात पिकत आहे. मी सर्व रसायनांचा गरजेप्रमाणे वापर करतो. उत्पादन चांगले घेतो. उत्पादनाचा दर्जा अतिउत्तम असतो, असे ग्राहकांचे मत आहे. आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होण्यामागे फक्त रासायनिक शेतीतील अन्नाचे सेवन हेच एकमेव कारण आहे का? इथे एकात्मिक विचार होणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न असा आहे मानवी स्नायुंच्या ताकदीवर यापूर्वी जीवनावश्‍यक बहुतेक कामे होत होती. शहाण्या माणसाने बुद्धिचातुर्याने प्रत्येक कष्टाचे कामासाठी यंत्राचा शोध लावला. पूर्वीपेक्षा आर्थिक स्तर उंचावल्यानंतर घरातील कष्टाची कामे मोलकरणींना दिली. शहरवासीयांना शुद्ध हवा शुद्ध पाणी मिळणे अवघड. मुलामध्ये बाजारी पदार्थ खाण्याकडे जास्त कल, बेकरीपुढे सायंकाळी होणारी गर्दी, मुलांना खेळण्या बागडण्यास जागाच नाही. दूरदर्शन व मोबाईलवरील खेळ ही करमणुकीची साधने! ही यादी खूप वाढविता येते. हा जीवन पद्धतीतील बदल सर्व आरोग्यदायी आहे का? आरोग्याचा दोष फक्त रासायनिक शेतीतील उत्पादनांना देणे चूक की बरोबर आपणच ठरवावे. फक्त सेंद्रिय शेतीतील अन्न खाऊन आरोग्य मिळणार असते तर आरोग्य हे बाजारातून पैसे टाकून खरेदी करून आणण्याची गोष्ट झाली असती. वास्तवात असे नाही आरोग्य बाजारातून विकत आणण्याची बाब नाही. आरोग्य फुकट मिळत नाही. ती एक कष्ट साध्य गोष्ट आहे. याबाबत इतर जनांच्या तुलनेत आम्ही शेतकरी नशिबवान आहोत. शुद्ध हवा, पाणी, व्यवसायातून आपोआप होणारे कष्ट, योग्य वेळी भूक लागणे, भूक लागली म्हणून खाणे, वेळ झाली म्हणून खाणे नाही. अपवाद वगळता रात्री शांत झोप. मित्रांनो तुलनात्मक पैसा कमी मिळणे व सतत नैसर्गिक आपत्तींशी संघर्ष करावा लागणे हे आपल्या पाचवीलाच पुजले आहे. हेच दुःख सतत उगाळत बसला तर सुख आपल्याला कधीच भेटणार नाही. हरितक्रांतीत काय दोष होते ते हरितक्रांती केल्याशिवाय सापडणार नाहीत. ते दोष दूर केल्यास हरितक्रांतीची मधूर फळे कायमस्वरुपी चाखता येतील. नॉर्मन बोरलॉग अगर स्वामिनाथन यांना आरोपी करून आपले प्रश्‍न सुटणार नाहीत. विज्ञानात सर्वांसाठी उत्तरे आहेत, शोधा म्हणजे सापडतील! प्र. र. चिपळूणकर ः ८२७५४५००८८ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com