मियावाकी ः जंगलनिर्मितीचा अनोखा प्रयोग

मियावाकी पद्धतीमध्ये एका जागेवर कमीत कमी ५० ते १०० प्रकारचे देशी (स्थानिक) वृक्ष लावण्यास सुचविले आहे. त्यातही दुर्मीळ वृक्षांना प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. पारंपरिक पद्धतीने जंगल तयार करण्यास २०० वर्षांपेक्षा अधिक काळ लागत असताना या पद्धतीने २० वर्षांत आपण घनदाट जंगलाची निर्मिती करू शकतो.
संपादकीय
संपादकीय

जपान हा देश मला मनापासून आवडतो तो तेथील जंगल श्रीमंतीमुळे. जगामधील आठ प्रगत राष्ट्रांत समाविष्ट असलेला हा देश वृक्षावर अतिशय प्रेम करतो. म्हणूनच याला ‘चेरी ब्लॉसमचा देश’ असेही म्हणतात. जपान हा देश तेथील नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे. ‘मियावाकी’ हासुद्धा असाच दोन-तीन दशकापूर्वीचा जंगल निर्मितीचा प्रयोग. याचे निर्माते आणि संशोधक आहेत डॉ. अकिरा मियावाकी. वनस्पतिशास्त्रामधील आपले उच्च संशोधन हिरोशिमा विद्यापीठात पूर्ण करीत असताना त्यांनी १९६०-७० च्या दशकात जपानमधील वृक्षराजींनी समृद्ध असलेल्या जवळपास १० हजार भूभागांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मंदिर, प्रार्थनास्थळे, स्मशान आणि देवराई भागात आढळणारे हजारो वर्षांपूर्वीचे वृक्ष त्या ठिकाणाशिवाय इतर कुठेही आढळत नाहीत. त्यांची संख्याही आता मानवी हस्तक्षेपामुळे झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या असेही लक्षात आले, की जपानच्या अनेक जंगलामध्ये जपानबाहेरील वृक्षांनी अतिक्रमण करून स्थानिक वृक्षांना आणि त्या सोबत जोडलेल्या जैवविविधतेला नष्ट केले आहे. हे सर्व लक्षात आल्यावर त्यांनी स्थानिक वृक्षांचा नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्मितीचा ध्यास घेतला आणि या ध्यासामधूनच त्यांच्या ‘मियावाकी’ जंगल पद्धतीचा जपानमध्ये उदय आणि प्रसारही झाला. आज तेथे १३०० आणि जगाच्या इतर भागांत १७०० मियावाकी जंगले विखुरलेली आहेत. त्यात चीन आणि भारत आघाडीवर आहेत. आपल्या देशात ३३ मियावाकी जंगले आहेत. त्यातील चार तर तुम्हाला आनंदवन, वरोरा येथे व एक बंगलोर शहराच्या विमानतळाबाहेर आढळून येते.

 मियावाकी पद्धतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जाते. यामध्ये वृक्षांची आपापसामध्ये स्पर्धा आणि त्यांचे एकमेकांशी असलेल्या मैत्रीच्या नात्याला प्रोत्साहन दिले जाते. मियावाकीसाठी ओसाड जमिनीची निवड करून तेथील मूळ निकृष्ट दर्जाची माती काढून तेथे शेणखत आणि गहू, भात यांचा कोंडा समप्रमाणात मिसळून त्यावर खड्डे करून आपणास हवी तशी वृक्ष लागवड करता येते. खतांमुळे वृक्षांना भरपूर मूलद्रव्ये मिळतात आणि भाताचे तूस वापरल्यामुळे पाण्याचा निचरा होतो, हवा खेळती राहते, उपयोगी सूक्ष्मजीव झपाट्याने वाढतात व मोठ्या प्रमाणात ह्यूमस तयार होतो. मियावाकी पद्धतीमध्ये एका जागेवर कमीत कमी ५० ते १०० प्रकारचे देशी वृक्ष लावण्यास सुचविले आहे.पारंपरिक पद्धतीने जंगल तयार करण्यास २०० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो, पण मियावाकी पद्धतीने जेमतेम २० वर्षांत आपण घनदाट जंगलाची निर्मिती करू शकतो. जंगल निर्मिती फक्त लाकडासाठी असू नये, त्याचा उपयोग जैवविविधता समृद्ध करणे, वनस्पतीच्या औषधी गुणधर्माचा मानवी कल्याणासाठी फायदा घेणे आणि कमीत कमी जागेत जास्त हरितक्षेत्र वाढवणे हासुद्धा आहे आणि तो या पद्धतीत साध्य होतो. हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी मियावाकी जंगल निर्मिती हा उत्कृष्ट पर्याय आहे, हे जपानमधील अनेक प्रयोगामधून सिद्ध झाले आहे. डॉ. अकिरा मियावाकी यांनी त्यांच्या या नावीन्यापूर्ण संशोधनातून आजपर्यंत ४० दशलक्ष झाडे लावली आणि ती सर्व जिवंत असून, घनदाट जंगलाच्या रूपात निसर्गामध्ये आनंदाने राहात आहेत. २९ जानेवारी १९२८ मध्ये जन्मलेले डॉ. मियावाकी आज ९१ वर्षांचे तेही सुदृढ, निरोगी आहेत, त्यांच्या या दीर्घायु आयुष्याचे श्रेय ते त्यांच्या देशी वृक्ष प्रेमास आणि सहवासास देतात. 

मियावाकी या जपानी पद्धतीमध्ये अतिशय कमी जागेत जास्तीत जास्त झाडांची शाश्वत वाढ केली जाते. या जंगल निर्मितीमध्ये फक्त स्थानिक वृक्षांनाच स्थान आहे, हे आपण प्रथम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. उदाहरण द्यावयाचे झालेच, तर आपल्या जवळपासच्या जंगलात वाढणारा हिरडा, बेहडा, बेल, आवळा, बोर, गावठी आंबे, जांभूळ, अर्जुन, पळस, चिंच  आदी. गावामधील वृक्ष जानकार मंडळी, औषधी वनस्पती गोळा करणारा वैद्य या अशा शेकडो वृक्षांची माहिती आपणास सहज देऊ शकतात. ‘मियावाकी’ जंगल निर्मिती १०० चौ.मी पासून १० हजार चौ.मी. मध्येसुद्धा करता येते. एकूण खर्चाचा अंदाज घेता कमीत कमी क्षेत्र म्हणजे १०० चौ.मी हे निश्चित करावे. या क्षेत्रात आपणास चारशे वृक्ष लागवड करावयाची आहे, हे ठरवून रोपवाटिकेमध्ये स्थानिक वृक्षामधील उंच, मध्यम, लहान, दुर्मीळ या विविध स्तरामधील वृक्षांची निश्चिती करावी. १०० चौ.मी. जागा आपण आपल्या शेतामध्ये, घराच्या पुढे अथवा मागे, व्यावसायिक ठिकाणी अथवा पडीक जमीन असेल, तर तेथे निवडावी. आपणास कोणत्या भूमिती पद्धतीचे म्हणजे चौकोनी, त्रिकोणी, लंबाकार, चंद्रकोर अथवा वर्तुळाकार जंगल निर्माण करावयाचे आहे त्याचे डिझाइन तयार करून ज्या जमिनीवर ते करावयाचे आहे तेथे चुन्याच्या साहाय्याने आखणी करावी. एकदा डीझाइन तयार झाले की ‘जेसीबी’ मशिनच्या साहाय्याने डिझाइनच्या आतील तीन फूट माती बाहेर काढून घ्यावी. वर्तुळाकार खड्डा आतून समांतर झाल्यावर त्यावर योग्य प्रमाणात जिवामृत शिंपडावे. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत आणि भाताचे तुस यांचे समप्रमाण करून खड्डा पूर्णपणे भरून घ्यावा. त्यावर पुन्हा जिवामृतचे योग्य मिश्रण शिंपडावे आणि खत सारखे करून घ्यावे. खताचे मिश्रण सारखे केल्यावर त्याच्या पृष्ठभागावर एक फूट अंतरावर लहान लहान खड्डे करून प्रत्येकात एक वृक्ष लागवड करावी. साधारणपणे १०० चौ.मी. मध्ये ३७० झाडे बसतात. झाड लावल्यावर खड्डा भरुन त्यास जिवामृत द्यावे. वृक्ष लागवड पूर्ण झाल्यावर त्यावर उसाचे पाचट अथवा शेतामधील कुठल्याही पिकाच्या टाकावू भागाचा अंदाजे एक फूट उंचीचा आच्छादनाचा थर द्यावा. तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com