भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्ग

सोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त असलेल्या पांडुरंग गोपाळा कोकोडे तीन वर्षांपूर्वी शेततळे उभारणीनंतर भाजीपाला पिकाकडे वळले. दुर्गम अशा चंद्रपूर जिल्ह्यात स्वयंप्रेरणेने ब्रोकोली, रेड कॅबेज अशा परदेशी भाजी लागवड करत नावीन्यपूर्ण शेतीत पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांच्यासाठी आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे.
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्ग
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्ग

सोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त असलेल्या पांडुरंग गोपाळा कोकोडे तीन वर्षांपूर्वी शेततळे उभारणीनंतर भाजीपाला पिकाकडे वळले. दुर्गम अशा चंद्रपूर जिल्ह्यात स्वयंप्रेरणेने ब्रोकोली, रेड कॅबेज अशा परदेशी भाजी लागवड करत नावीन्यपूर्ण शेतीत पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांच्यासाठी आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट चोरगाव (ता. जि. चंद्रपूर) या गावाची लोकसंख्या १२०० आहे. प्रामुख्याने भातशेती होणाऱ्या या गावातील पांडुरंग गोपाळा कोकोडे यांची ३.५ एकर शेती आहे. गेल्या तीन वर्षापर्यंत त्यांची भिस्त प्रामुख्याने भात, सोयाबीन यासारख्या कोरडवाहू पिकांवर होती. परिणामी उत्पादकता व उत्पन्न कमी राहत असे. शेततळे झाले परिवर्तनाचे निमित्त ः २०१५-१६ मध्ये जलयुक्‍त शिवार अभियानात चोरगावची निवड झाली. त्या अंतर्गत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पांडुरंग कोकोडे यांच्याकडे १०० टक्के अनुदानामध्ये शेततळे घेण्याविषयी आग्रह केला. पांडुरंग कोकोडे यांनीही पुढाकार घेत ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे घेतले. त्यातून झालेली पाण्याची शाश्वत सोय पुढील परिवर्तनाचे निमित्त ठरल्याचे ते सांगतात. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शाश्वतता, प्रयोगशीलता ः

  • चंद्रपूर हा हमखास पावसाचा जिल्हा असून येथे सरासरी ९०० ते ११०० मि. मि. पाऊस पडतो. कोकोडे यांचे शेततळे पहिल्याच पावसात भरले. या पाण्याचा उपयोग सर्व कामे वेळच्या वेळी होण्यासोबत भाताला संरक्षित पाणी देण्यासाठी होऊ लागला. परिणामी पूर्वी केवळ १२ ते १६ क्विंटल असलेले भात उत्पादन वाढून १६ ते २० क्विंटलवर पोचले. त्यात शाश्वतता आली. भाताला प्रति क्विंटल १८०० ते २००० रु. दर मिळतो.
  • २०१७-१८ च्या खरिपात त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर हळद लागवड केली. त्यातून ओल्या हळदीचे २३ क्‍विंटल उत्पादन झाले. यापासून हळद पावडर तयार केली. त्यातील ३ क्विंटल हळद पावडरची विक्री २०० रुपये प्रति किलो या प्रमाणे विविध कृषी प्रदर्शनातून केली. मात्र, आणखी एकवेळा हळद लागवडीनंतर हळद घेणे कमी केले. कारण मजुराची कमतरता व हळद शिजवणे व पॉलिश यंत्राची अनुपलब्धता.
  • अर्धा एकर क्षेत्रावर वांगी, उर्वरित एक एकर क्षेत्रामध्ये कारली, मिरची भाजीपाला लागवड सुरू केली. गावापासून २० कि.मी. अंतरावरील चंद्रपूर येथील बाजारात भाजीपाल्याची विक्री करतात. दोन वर्षानंतर भाजीपाल्याखालील क्षेत्र वाढवल्याने पाण्याची गरजही वाढली. त्यांनी बोअरवेल खोदले. त्याला ७० फुटावर चांगले पाणी लागले आहे.
  • नावीन्याचा शोध ः पांडुरंग कोकोडे यांना शेतीविषयक माहिती वाचनाची सवय आहे. त्यातून नवीन पिकाकडे त्यांचा ओढा आहे. त्यांच्या एक एकरामध्ये वांगी, कारली (अर्धा एकर) तर उर्वरित क्षेत्र वाल, मिरची, टोमॅटो, चवळी व कोबीवर्गीय पिकांचे विविध वाण ते घेतात. विदेशी भाजीपाल्यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, लिफी अशा भाज्यांचे सुरुवातीला ऑनलाइन बियाणे मागवून प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली. पुढे त्याखालील क्षेत्र वाढवले. वांग्याचे दुहेरी उत्पादन ः मे मध्ये रोपे टाकल्यानंतर जून मध्ये वांगी लागवड करतात. ऑगस्ट महिन्यापासून उत्पादनाला सुरुवात होते. उत्पादन कमी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात वांगी फांद्यांची छाटणी करतात. त्यावर चांगली फूट निघून वांग्याचे उत्पादन हाती येते. लागवड व खोडवा असे मिळून त्यांना १४० क्विंटल उत्पादन मिळाले. गतवर्षी अर्ध्या एकरवर केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याने यावर्षी पांडुरंग यांच्या भावांसह गावातील काही शेतकऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले आहे. असे मिळतात दर ः

  • वांग्याला सरासरी २० ते २५ रुपये प्रति किलो असा दर मिळतो.
  • ब्रोकोलीला किरकोळ बाजारात ८० रुपये प्रति किलो असा दर असला तरी घाऊक दर ३५ ते ४० रुपये मिळतात. रेड कॅबेज १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळतो.
  • टोमॅटोला ३० रुपये किलो घाऊक दर मिळतो. दररोज सरासरी २० किलो टोमॅटो मार्केटला जातो.
  • हिरवी मिरचीचे घाऊक दर १५ ते २० रुपये प्रति किलो आहेत.
  • खर्च वाचवण्यासाठी नवे तंत्रज्ञान ः पांडुरंग हे शेतीमध्ये सातत्याने नवे तंत्रज्ञान, नवे वाण, नवनवे प्रयोग करतात. गेल्या वर्षी भाजीपाल्याखालील दोन एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. भाजीपाल्यात सापळा पीक म्हणून त्यांनी झेंडू लावतात. त्याच्या जोडीलाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत सौर प्रकाश सापळाही वापरतात. यामुळे फवारणीचे कष्ट व खर्चात बचत होतात. तसेच नव्या योजना, तंत्रज्ञान यांची माहिती मनिषा दुमाने (कृषी साहाय्यक), दत्ता काळे (उपविभागीय कृषी अधिकारी), प्रदीप वाहाने (तालुका कृषी अधिकारी) यांच्याकडून मिळत असल्याचे पांडुरंग यांनी सांगितले. वार्षिक आर्थिक ताळेबंद ः

  • संपूर्ण शेतीतून एकूण उत्पन्न - ६ ते ६.५ लाख रु. (भाजीपाला ५.५ लाख रु., भात व अन्य पिके १ लाख रु.)
  • उत्पादन खर्च - २.५ ते ३ लाख रु.
  • निव्वळ उत्पन्न ः ३ ते ४ लाख रु.
  • घर खर्चासह अन्य कौटुंबिक कारणांसाठी - सुमारे १.५ ते २ लाख रुपये.
  • मुलगा सत्यम हा १० वीला तर मुलगी नम्रता ही ८ वीला शिकत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी खर्च - सुमारे २० हजार रुपये.
  • स्वतः पांडुरंग, पत्नी सौ. मेघा व मुले यांचा विमा उतरवलेला असून, त्याचे हप्ते सुमारे १५ हजार रुपये.
  • पीक विमा गेल्या वर्षी घेतला होता. मात्र, हंगामी व कमी कालावधीची पिके असल्याने यावर्षी घेतला नाही.
  • पांडुरंग कोकोडे, ९०४९७५९८६७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com