शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रीय पद्धतीने प्रजनन व्यवस्थापनामध्ये बदल करून हा व्यवसाय फायदेशीर करता येतो. शेळीपालनामध्ये जंत निर्मूलन नियमितपणे करणे खूप आवश्यक आहे. कारण जंताच्या प्रादुर्भावामुळे शेळ्यांमध्ये हगवण, रक्तक्षय, अशक्तपणा, वाढ खुंटणे यासारखे विकार निर्माण झाल्यामुळे पिलांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे योग्य प्रमाणात वजनातील वाढ होत नाही. प्रजननसंस्थेचा विकास योग्य वेळी व पूर्णपणे होत नाही. जंत निर्मुलन करताना जंतनाशकाचा वापर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावा. बाह्य परोपजीवीचे नियंत्रण करण्यासाठी नियमितपणे गोठ्यामध्ये गोचिडनाशकांची तज्ज्ञांच्या सल्याने फवारणी करावी. परपोजीवींचे नियंत्रण झाल्यामुळे शेळ्यांना त्वचारोग, कीटकामार्फत पसरणारे रोग यापासून संरक्षण मिळते. शरीराची वजन वाढ योग्य पद्धतीने होते. अति उष्ण किंवा अति थंड वातावरणामध्ये शेळ्यांमध्ये ताण येतो. प्रजननासाठी आवश्यक संप्रेरकामध्ये असमतोल निर्माण झाल्यामुळे प्रजनन व्यवस्थित होत नाही. गर्भधारणेचे प्रमाण घटते. त्यामुळे अति थंडी किंवा अति उष्णतेपासून शेळ्यांचे संरक्षण करावे. करडाच्या वाढीसाठी उच्च प्रथिनयुक्त व ऊर्जा असलेला संतुलित आहार देणे गरजेचे आहे. शेळ्यांच्या आहारामध्ये किमान ७० टक्के एकदल व ३० टक्के द्विदल चारा देणे आवश्यक आहे. यामध्ये हिरवा व वाळलेला चारा, किमान १५ ग्रॅम खनिज मिश्रण व जीवनसत्वे खुराकामधून द्यावीत. समतोल आहारामुळे प्रजनन संस्थेचे कार्य योग्य पद्धतीने होते. वयाच्या ८ ते १० महिन्यात शेळ्या मध्ये माज येऊन त्या गाभण राहतात. योग्य गर्भधारणेकरिता शेळ्यांना प्रजननापूर्वी २ ते ३ आठवडे जर उच्च प्रथिने व ऊर्जा युक्त अतिरिक्त आहार दिल्यास त्याचा प्रजननावर सकारात्मक परिणाम होऊन गर्भधारणेचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. योग्य आहारामुळे सुदृढ करडे जन्मतात. त्यांची चांगली वाढ होते. ः डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६ (पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)