Banana Cultivation : केळी सल्ला

वातावरणातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली असेल, तर त्याचा केळी वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
केळी सल्ला
केळी सल्ला

मृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड बाल्य अवस्थेत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. वातावरणातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली असेल, तर त्याचा केळी वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 

थंडीचा परिणाम लागवडीवर परिणाम उतिसंवर्धित रोपे रुजण्यासाठी होण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान लागते. सध्या कांदेबाग लागवड झालेली असेल. परंतु लागवडीस जसजसा उशीर होईल, तसतशी थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 

मुळांवर परिणाम  उतिसवंर्धित रोपाची कांदेबाग लागवड झालेली आहे. पण कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच कमी तापमानामुळे मुळांच्या अन्न व पाणी घोषणाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 

पानांवर होणारा परिणाम 

  •  केळीला सरासरी ३ ते ४ पाने प्रति महिन्याला येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रति महिना २ ते ३ पाने येतात. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. पानांचा गुच्छ तयार होतो.
  • अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. लहान रोपांच्या कोवळ्या पानांच्या कडा करपतात. केळीचा पोंगा पिवळा होऊन करपतो. थंडीत मोठ्या रोपांच्या पानांवर पिवळसर रंगाचे लांबट चट्टे पडतात, व कालांतराने ते काळपट तपकिरी होऊन पान वाळण्यास सुरुवात होते. 
  • मोठ्या रोपांच्या पानांच्या कडासुद्धा थंडीमुळे करपतात. सूर्यप्रकाशाच्या बाजूने पानांचा रंग पिवळा पडतो विरुद्ध बाजूच्या पानांचा रंग हिरवा राहतो. 
  • झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी, केळी निसवण्याचा कालावधी लांबतो. त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो. 

    बुंधा आणि घडावर होणारा परिणाम कमी तापमानामुळे केळीचा बुंधा व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात. हे चट्टे वाढत जातात आणि घड सटकतो. ज्यादा थंडीमुळे घडांची वाढ मंदावलेली दिसून येते. 

    फळवाढीवर होणारा परिणाम  थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ फार हळूवार होते. परिमाणी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड कापणीस वेळ लागतो. 

    थंडीचा परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना 

  •     केळी बागेला पाण्याचा ताण देऊ नये. ठिबक सिंचन संच रात्री चालवून १० ते १२ लिटर पाणी प्रति झाड द्यावे. 
  •     बागेमध्ये गव्हाचा भुस्सा, भाताचा भुस्सा, लाकडाचा भुस्सा किंवा मक्‍याचा भुस्सा यांचा ढीग करून रात्री जाळून धूर करावा. जेणेकरून बागेचे तापमान वाढण्यात मदत होईल. 
  •     मुळाच्या कक्षेत चिखल राहील एवढे पाणी देऊ नये. मुळांची कक्षा कायम वाफसा स्थितीत राहील याची काळाजी घ्यावी. 
  •     बागेस २० किलो युरिया प्रति एक हजार झाड याप्रमाणे अतिरिक्त मात्रा द्यावी.
  •     कांदेबाग तसेच मृग बागमध्ये रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. यातील २०० ते २५० मिलि द्रावण प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी. 
  • करपा रोगनियंत्रण  हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील ४ ते ५ पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. नियंत्रण ः फवारणी प्रति लिटर पाणी प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिलि किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम  द्रावणात १ मिलि स्टिकर मिसळावा.  १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. 

    - डॉ. एस. व्ही. धुतराज,  ७५८८६१२६३२ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com