कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास करायची?

पिकांच्या जातींचा विकास करताना कोणत्या गुणधर्मांला प्राधान्य देणार, हे केवळ बाजारपेठेवर सोडून चालणार नाही. लोकहिताच्या दृष्टीने स्थानिक लोक, प्रशासन आणि सरकार यांनी योग्य तो हस्तक्षेप केला पाहिजे.
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास करायची?
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास करायची?

एखाद्या पिकातील योग्य ते गुणधर्म पुढील पिढीमध्ये आणण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये ही प्रक्रिया सोपी झाली असून, वेळही कमी लागतो. मात्र पिकांच्या जातींचा विकास अथवा पैदास करताना कोणत्या गुणधर्मांला प्राधान्य देणार, हे केवळ बाजारपेठेवर सोडून चालणार नाही. त्यात ज्या लोकांना बाजारपेठेच्या दृष्टीने आवाज नाही, अशा लोकांच्या हिताच्या दृष्टीने स्थानिक लोक, प्रशासन आणि सरकार यांनी योग्य तो हस्तक्षेप केला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कीड, रोग प्रतिकारक, दुष्काळासाठी सहनशील आणि अधिक उत्पादनक्षम जातींच्या विकासावर प्राधान्याने लक्ष दिले जाते.  हा बदल करत असतानाच या शेतीमालाची मूळ चव बदलू नये किंवा ती अधिक चांगली व्हावी, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. या दोन्ही अपेक्षांचा दबाव पैदासकारांवर नक्कीच असतो.   अर्थातच, सर्वसामान्य शेतकरी, ग्राहक यांचा विचार या प्रक्रियेमध्ये कितपत होतो, याबाबत शंकाच आहेत. परदेशामध्ये ग्राहककेंद्रित बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या अपेक्षांचा निदान काही प्रमाणात तरी विचार केला जातो. बीज उत्पादक कंपन्यांच्या दृष्टीने त्यांचा ग्राहक हा शेतकरी असतो. शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेल्या मालाचा ग्राहक वेगळाच असतो. म्हणजेच बीज कंपन्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष ग्राहक हा शेतकरी, तर अप्रत्यक्ष ग्राहक हा सर्वसामान्य नागरिक (पुन्हा यात शेतकरीही आलेच) असतात. केवळ एवढी बाब लक्षात घेतली तरी यातील तिढा लक्षात येऊ शकतो. स्वतः शेतकरी शेतामध्ये उत्पादन घेताना वेगळ्या जातीला प्राधान्य देतो, तोच शेतकरी परसबागेमध्ये स्वतःच्या घरासाठी उत्पादन घेताना वेगळ्या जातीला प्राधान्य देऊ शकतो. विकताना तो विक्रेता असतो, खरेदी करताना ग्राहक या दोन्ही वेळी त्यांची अपेक्षा वेगळी असू शकते.  कोणत्याही शेतीमालाची एक विशिष्ट चव सर्वसामान्यांच्या मनामध्ये रूतलेली असते. त्यामुळे ग्राहकांकडून नव्या जातींच्या भाज्या खरेदी करण्याचे टाळले जाते. अशा वेळी जास्त उत्पादनक्षम असूनही ग्राहकांची मागणी नसल्यास त्या संशोधनाचा फारसा उपयोग होणार नसल्याचे मत मांडले जाते. 

थोडक्यात, काय तर गाय कशी असावी?  आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ...  असाच प्रकार नव्या जातींच्या विकासादरम्यान होत असतो. नव्या जातींची पैदास करताना कोणत्या ना कोणत्या गुणधर्मांचा त्याग करावा लागतो. पूर्वी पारंपरिक पैदास कार्यक्रमांमध्ये दीर्घकाळ (वर्षानुवर्षे) लागत असे. सामान्यतः निवड पद्धतीने योग्य तो आकार, रंग, साठवण कालावधी किंवा काढणीतील सुलभता या गुणधर्मांचे गुणन करत पुढे जावे लागत असे. त्याच वेळी ग्राहकांची या नव्या जातींकडे पाहण्याची दृष्टी नेमकी कशी असेल, त्यांना ही चव आवडेल का, हे प्रश्न तसे अनुत्तरीतच राहत.  आजच्या बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांचे महत्त्व अमर्याद वाढले आहे. बीज उत्पादक कंपन्या भाजीपाला किंवा फळांच्या जातींचा विकास करताना ग्राहकांची गरजांचा, आवडी निवडीचा विचार करत असतात. त्यांचे प्रतिनिधी मागणी नोंदवून घेत असताना मध्यस्थ विक्रेते, ग्राहक यांच्या अभिप्राय, प्रतिसाद यांच्याही नोंदी घेत असतात. त्यावरून त्यांना एकूण ग्राहकांच्या मागणीचा अंदाज येत राहतो. पण ती सामान्यतः फार नंतरची बाब असते. एखाद्या जातींच्या विकासाचा प्रकल्प राबवत असताना सुरवातीला अंतःप्रेरणा किंवा एखाद्या तज्ज्ञांच्या सल्लागार समितीवर अवलंबून निर्णय घ्यावे लागतात. 

चवीसोबतच पोषकतेलाही हवे प्राधान्य पोषकता या मुद्द्यांबाबत अलीकडे जागरूकता वाढत असली, तरी त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाने नव्या जाती विकसित करण्याची प्रक्रिया तुलनेने संथ आहे. सध्या लोहाचे प्रमाण अधिक असलेल्या काही जाती उत्पादनाच्या विविध टप्प्यावर आहेत. मात्र, त्यांना ग्राहकांकडून अपेक्षेएवढी मागणी नसल्याची बाब एक सर्वेक्षणामध्ये पुढे आली होती. आहारात लोहाची कमतरता असल्याने रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहतो. त्यातून बहुतांश भारतीय महिलांमध्ये रक्ताल्पता (अॅनिमिया) दिसून येत आहे. यासाठी अशा जाती अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. आधीच ग्रामीण कुटुंबाची क्रयशक्ती कमी, त्यात महिला हा घटकाचे कुटुंबांकडे निर्णय घेण्याची परंपरा नाही. त्यामुळे बाजारपेठेच्या दृष्टीने निष्क्रिय अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षांना बाजारपेठेमध्ये क्रयशक्ती अभावी फारशी किंमत दिली जाणार नाही.

सर्वसामान्य शेतकऱ्यांचा/ग्राहकांचा वाली कोण?     आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या मोठ्या बीज उत्पादक कंपन्यांसाठी ग्राहकांचे निकष देश व स्थान गणिक बदलत जातात. नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव पिकांमध्ये करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची ते खरेदी करण्याची क्षमता आहे की नाही, हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असतो. सामान्यतः मोठे शेतकरी, बागायतदार यांचा विचार केला जातो. कारण त्यांच्याकडे बऱ्यापैकी क्रयशक्ती असते. कोरडवाहू शेतकऱ्यांची क्रयशक्ती कमी असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा पाझर फारच सावकाश होत  असतो.      यातही सर्वसामान्य ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक व मोठी  मागणी असलेल्या व्यावसायिक, उद्योगाच्या अपेक्षांना प्राधान्य दिले  जाते.       अनेकवेळा राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवर नव्या तंत्रज्ञानाला विरोध होऊ शकतो. अनेक ठिकाणचे कायदे वेगळे असतात. त्याचाही अडसर जाणवत असतो. जर आर्थिक फायदा नसेल, कामकाजामध्ये अनेक अडथळे अशा स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या बाजारपेठेमध्ये उतरण्यास नाखूष असतात. 

शासकीय पातळीवर यासाठी अधिक प्रयत्न हवेत     सरळ ग्राहकांवर अवलंबून असलेल्या शेतीमालासंदर्भात थोड्या फार प्रमाणात ग्राहकांच्या मागणीचा विचार केला जातो. उदा. सफरचंद हे नेहमी ताजे व चवीने खाल्ले जाते. त्याच्या चवीसोबतच कुरकुरीतपणा हा गुणधर्म असलेला वाण नुकताच ‘हनीक्रिस्प’ नावाने बाजारात आणण्यात आला आहे.       सर्वसामान्य, कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकरी यांचा विचार करून नव्या जातींचा विकास करण्याकडे शासन, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्थांनी लक्ष दिले पाहिजे. त्याच प्रमाणे गरिबांतील गरिबांपर्यंत उत्तम दर्जाचे अन्नधान्य पोचेल, या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. खासगी कंपन्या हे काम करतील, या अपेक्षेने राहण्यात फारसा अर्थ नाही.

 ः सतीश कुलकर्णी, ९९२२४२१५४० (लेखक ॲग्रोवनमध्ये  वरिष्ठ उपसंपादक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com