विदर्भातील हवामानानुसार पिकांचे नियोजन

विदर्भातील हवामानानुसार पिकांचे नियोजन
विदर्भातील हवामानानुसार पिकांचे नियोजन

विदर्भाचे कार्यक्षेत्र १९ अंश ०५ अंश ते २१ अंश ४७ अंश उत्तर अंक्षाश आणि ७५ अंश ५९ अंश ते ७९ अंश ११ अंश पूर्व रेखांश असे आहे. त्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश होतो. हा संपूर्ण विभाग दख्खनच्या पठारात मोडतो. विदर्भाचे हवामान सर्वसाधारणपणे कोरडे व उष्ण आहे. विदर्भातील जमिनी ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या बेसॉल्ट खडकापासून बनलेल्या आहेत. या विभागात प्रामुख्याने भात, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, खरीप ज्वारी, उडीद इत्यादी पिके खरीप हंगामात घेतली जातात. तसेच, रब्बी हंमामामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई इ. प्रमुख पिके आहेत. पर्जन्यमान : तीस वर्षांच्या हवामान घटकाच्या अभ्यासावरून विदर्भाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १०३९ मि.मी. असून सरासरी पावसाचे पर्जन्यदिन ४९ आहेत. एकूण वार्षिक पावसापैकी जवळपास ८५ ते ९० टक्के पाऊस जून ते सप्टेंबर याकाळात पडतो. वार्षिक पावसात जवळपास ७.१ टक्के तफावत आढळते. विदर्भात मोसमी पाऊस २४ व्या कृषिहवामान आठवड्यात दाखल होतो, तर मोसमी पावसाची माघार ४० व्या कृषिहवामान आठवड्यात होते. मॉन्सूनची सुरुवात आणि अखेर यात जिल्हानिहाय एक ते दीड आठवड्याचा फरक पडतो. पर्जन्यकल : विदर्भातील सर्व जिल्ह्यांत सरासरी मासिक पर्जन्यमान सर्वाधिक जुलै महिन्यात असते, तसेच जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने विदर्भात सर्वत्र सर्वाधिक पावसाचे आहेत. त्यानंतर सप्टेंबर आणि जून हे महिने अशा उतरत्या क्रमाने पावसाचे आहेत. विदर्भातील पर्जन्यकल अभ्यासल्यास, काही तालुक्यांत नकारात्मक बदल झाल्याचे आढळून येते. मात्र, वार्षिक सरासरी पावसाच्या दिवसांमध्ये कोणतेही फारसे सकारात्मक अथवा नकारात्मक बदल जाणवत नाहीत. तापमान ः मागील तीस वर्षांतील तापमानाच्या अभ्यासामध्ये विदर्भ विभागाचे सरासरी वार्षिक कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सिअस असल्याचे आढळले. विदर्भातील जिल्हावार सरासरी वार्षिक कमाल तापमान ३४.० अंश सेल्सिअस (अकोला), ३३.४ अंश सेल्सिअस (अमरावती), ३१.२ अंश सेल्सिअस (बुलडाणा), ३४.१ अंश सेल्सिअस (चंद्रपूर) आणि ३२.९ अंश सेल्सिअस (गोंदिया), ३३.१ अंश सेल्सिअस (नागपूर) आणि ३२.७ अंश सेल्सिअस (यवतमाळ) असे आढळते. सरासरी कमाल तापमान सर्वाधिक मे महिन्यात ४२.७ अंश सेल्सिअस वर्धा जिल्ह्यात आढळून येते, तर सर्वांत कमी कमाल तापमान डिसेंबर महिन्यात २७.६ अंश सेल्सिअस नांदेड जिल्ह्यात आढळते. विदर्भ विभागाचे सरासरी वार्षिक किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअस आहे, तर विदर्भातील जिल्हावार सरासरी वार्षिक कमाल तापमान १८.५ अंश सेल्सिअस (अकोला), २०.२ अंश सेल्सिअस (अमरावती), १९.६ अंश सेल्सिअस (बुलडाणा), २०.७ अंश सेल्सिअस (चंद्रपूर) आणि २०.१ अंश सेल्सिअस (गोंदिया), १९.१ अंश सेल्सिअस (नागपूर), १९.८ अंश सेल्सिअस (वर्धा) आणि २०.० अंश सेल्सिअस (यवतमाळ) असे आढळते. सरासरी किमान तापमान सर्वाधिक मे महिन्यात २८.३ अंश सेल्सिअस वर्धा जिल्ह्यात आढळून येते, तर सर्वांत कमी कमाल तापमान डिसेंबर महिन्यात ११.१ अंश सेल्सिअस अकोला जिल्ह्यात आढळते.

सापेक्ष आर्द्रता विदर्भ विभागाची सरासरी वार्षिक सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के आहे. विदर्भातील जिल्हावार मासिक किमान सापेक्ष आर्द्रतेचा अभ्यास केल्यास सर्व जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ती सर्वाधिक आढळते. सर्वाधिक कमी सरासरी सकाळची सापेक्ष आर्द्रता एप्रिल महिन्यात आढळते. विदर्भ विभागाची सरासरी वार्षिक दुपारची सापेक्ष आर्द्रता ही ४० टक्के आहे. विदर्भातील जिल्हावार मासिक दुपारची सापेक्ष आर्द्रतेचा अभ्यास केल्यास विदर्भातील सर्व जिल्ह्यांत ऑगस्ट महिन्यात ती सर्वाधिक आढळते, तर सर्वाधिक कमी सरासरी सापेक्ष आर्द्रता एप्रिल महिन्यात आढळते.

बाष्पीभवन : बाष्पीभवनामध्ये मार्चपासून वाढ होण्यास सुरुवात होते. ते मे महिन्यामध्ये सर्वाधिक राहते. परिणाम : १. तापमानाचा व पाण्याचा ताण बसल्यास पिकांच्या वाढीवर आणि पीक फुलोऱ्यात असताना वाईट परिणाम होतो. २. २०५० पर्यंत तापमानात ३.५ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाल्यास गहू पिकाच्या उत्पादनात २ ते ६ टक्के घट होईल. ३. तापमानवाढीचा विविध पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. ४. तापमानातील वाढीचे मातीतील सेंद्रिय पदार्थ व सुपीकता यावर विपरीत परिणाम होतात. ५. तापमानातील चढ-उतारामुळे कीड व रोग यांच्या प्रादुर्भावामध्येही बदल होतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून उपाय

  • तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर एक धोरण आखून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गाव आणि शेतकऱ्यांच्या पातळीवर आपल्या परिसरामध्ये भरपूर झाडे लावणे हा एक उपाय महत्त्वाचा ठरणार आहे.
  • हवामानानुसार योग्य त्या कृषी सल्ल्यांची निर्मिती आणि वापर करणे आवश्यक आहे.
  • जास्त तापमानात तग धरतील अशा पिकांच्या वाणांची निर्मिती करावी लागेल.
  • हवामान बदलानुसार पीक पद्धतीचा वापर करावा.
  • जमिनीतून होणा­ऱ्या पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी योग्य आच्छादनाचा वापर करावा. अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास पाणी बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
  • सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा
  • नवीन फळझाडांसाठी सावली करावी. जिथे ठिबक सिंचन शक्य नाही, अशा फळबागेत मटका सिंचन पद्धती उपयुक्त ठरू शकते.
  • जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकांची अवस्था व तेथील हवामान या मुद्द्यांचा सखोल विचार करून पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर ठरवावे.
  • पिकांना व फळबागेला पाणी शक्यतो सकाळी किवा सायंकाळी द्यावे.
  • पीक फुलो­ऱ्यावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फळधारणा न होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • उन्हाळ्यात तापमान व उष्णता वाढल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन पिकांचीही पाण्याची गरज वाढते. यानुसार उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांना पाणी द्यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com