आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी सक्षम हवा

आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी सक्षम हवा
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी सक्षम हवा

हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी अधिक सक्षम होण्याची गरज आहे. पिकांच्या कोणत्याही टप्प्यावर येणाऱ्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचेच प्रथम नुकसान होते. त्याचा भार आर्थिकदृष्ट्या सध्यातरी केवळ शेतकऱ्यांवरच पडताना दिसतो. मात्र, एकूण वाया जाणारे अन्न या दृष्टीने विचार करता त्याचे गांभीर्य सर्व मानवजातीच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्वाचे असणार आहे. शास्त्रीय काल्पनिका (साय-फाय) प्रकारातील ‘इंटरसेलर’ नावाचा एक इंग्रजी सिनेमा आहे. त्या सिनेमाची सुरुवात हीच मुळी शेतामधील एका घरामधील प्रचंड प्रमाणात साठलेली धूळ काढताना होते. ही धूळ सातत्याने येणाऱ्या धुळीच्या वादळामध्ये येत असल्याचे स्पष्ट होते. अशा वातावरणामध्ये शेतीतील भेंडीचे पीक चांगले येणार नसल्याचे नायक कूपचे वडील त्याला सांगतात. त्याऐवजी मका लावला असता तर बरे झाले असते असा काहीसा संवाद झाल्यानंतर कूप आपल्या मुलाच्या शाळेकडे निघतो. शाळेत जाण्यापूर्वी चालत्या गाडीतून त्यांना दिसलेले एक ड्रोन संगणकाच्या साह्याने ताब्यात घेऊन (हॅक) करतो. आपल्या गाडीमध्ये भरून शाळेत पोचल्यानंतर शिक्षकाकडून मुलाचे ग्रेड कमी असल्याचे सांगत महाविद्यालयातील प्रवेश नाकारला जातो. त्या वेळी त्यांच्या तोंडी एक संवाद आहे. ते शिक्षक म्हणतात, ‘‘आपल्याला आता आणखी अभियंत्यांची (इंजिनिअर), तंत्रज्ञांची गरज नाही. त्याऐवजी अधिक चांगले आणि अधिक शिकलेले शेतकरी आवश्यक आहेत. कारण, परग्रहावर जाण्यापेक्षाही याच ग्रहावर जगायचे असेल, तर आपल्याला अन्नाची गरज आहे.’’ पुढे तो सिनेमा परग्रह, कृष्ण विवर वगैरे अनेक शास्त्रीय संकल्पनांच्या आधारे वेगळ्या मार्गावर जातो. मला त्यातील याच (त्रिकालाबाधित सत्य अशा) एका संवादाने भारावून टाकले आहे. त्यातील सुरुवातीचे वातावरण भविष्यातील वाळवंटीकरण, त्यामुळे येणाऱ्या धुळीच्या वादळांनी अत्यंत भयावह होणार आहे, याची चाहूल देते. हवामानातील बदलांकडे अत्यंत साक्षेपाने पाहण्याची गरज त्यातून व्यक्त होते. त्यामध्ये मानवजात तग धरण्यासाठी शेतकरी अधिक सक्षम होण्याची गरज आहे. कोणत्याही पिकाला अंकुरण्यापासून काढणीपर्यंतच्या टप्प्यामध्ये वाढताना सातत्याने हवामानाला सामोरे जावे लागते. किचिंतशी थंडी वाढली म्हणून आपण ज्याप्रमाणे स्वेटर, मफलर घालून संरक्षण करू शकतो, तशी कोणतीही सोय वनस्पतींकडे नाही. मोठ्या वाढलेल्या झाडांकडे पानगळ करण्यासारख्या काही अंतर्गत नैसर्गिक यंत्रणा कार्यान्वित होतात. हंगामी आणि कमी कालावधीच्या पिकांना त्यामध्ये अनेक मर्यादा असतात. त्यामुळे पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादकतेसाठी चांगले हवामान असणे ही गरज आहे. आपल्यासारख्या उष्ण कटिबंधातील देशांसाठी हवामानातील ठळक घटक म्हणजे तापमान, सापेक्ष आर्द्रता, पाऊस हे आहेत. तर युरोपातील अनेक देशांसाठी पाण्याचे एक रूप असलेले हिमवर्षाव, सातत्याने येणारी वादळे यांची भर घालावी लागेल. दोन्ही प्रकाराच्या तीव्र वातावरणामध्ये उत्पादन घेणे अत्यंत कठीण बनते. पीकवाढीसाठी एकूण सोळा प्रकारची अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यातील काही जमिनीतून (नत्र, स्फुरद, पालाश) मिळतात, तर काही पाणी आणि वातावरणातून (कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन इ.) घेतली जातात. त्यांचे संतुलन मानवांच्या उद्योगीपणा आणि उचापत्यांमुळे बिघडत आहे. मानवाचा उद्योगीपणा... मानवी इतिहासाचे औद्योगिकपूर्व काळ आणि औद्योगिकरणानंतरचा काळ असे दोन प्रमुख टप्पे पडतात. त्यात औद्योगिकरणानंतर कोळशासारख्या खनिजांचे ज्वलन मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातून कर्बवायूंचे उत्सर्जन वाढत गेले. त्याचा परिणाम पृथ्वीच्या वर असलेल्या ओझोनच्या थरावर होऊन ते काही ठिकाणी पातळ झाले तर काही ठिकाणी त्याला छिद्र पडले. हा ओझोनचा थर (O३) सूर्यप्रकाशातील हानिकारक अशा किरणांना रोखण्याचे काम करतो. परिणामी, आत येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले असल्याचे मांडणी पर्यावरण तज्ज्ञ करत आहेत. वातावरणातील कर्बवायूच्या संतुलनामध्ये झाडांइतक्याच सागरामध्ये तरंगणाऱ्या एकपेशीय वनस्पती महत्त्वाच्या असतात. त्यातील जंगलाची तोड मानवाने जमिनीची उपलब्धता, शेती यांसह अन्य अनेक कारणांसाठी सातत्याने केली आहे. माणसांनी केलेल्या उलाढालीमुळे हवामानातील अनेक घटकांचे संतुलन ढळत चालले आहे. त्याचे पर्यवसान वातावरणाच्या तीव्रतेमध्ये वाढ होण्यामध्ये होत आहे. या साऱ्या घटकांचा फटका पिकांच्या उत्पादनाला बसणार आहे. आपण माणूस म्हणून शेताच्या पातळीवर, गावकरी म्हणून गावाच्या पातळीवर हवामानातील संतुलन राखण्यासाठी काय करू शकतो, याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. आपल्याकडे विकास म्हटले की गावपातळीवर पिण्याचे पाणी, रस्ते तर शहर पातळीवर केवळ सिंमेटच्या इमारती, लांबसडक मोठे महामार्ग यांचा विचार होतो. आपल्या विकासाच्या व्याख्या तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

संपर्क ः ९९२२४२१५४० (लेखक अॅग्रोवन मध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com