गाजरगवत निर्मूलनासाठी नियमित सामुदायिक प्रयत्न आवश्यक

गाजरगवत निर्मूलनासाठी नियमित सामुदायिक प्रयत्न आवश्यक
गाजरगवत निर्मूलनासाठी नियमित सामुदायिक प्रयत्न आवश्यक

पडीक जमिनी, मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडा या बरोबर फळबागा, शेतामध्येही गाजरगवताने चांगलेच ठाण मांडलेले आहे. या आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या तणामुळे वेगाने वाढणाऱ्या या तणाने भारतातील ३५ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक जागा व्यापली आहे. या तणाच्या नियंत्रणासाठी जागरूकता, नियमित सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. गाजरगवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टिरोफोअर्स (Parthenium hystirophores) आहे. त्याला भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये काँग्रेस गवत, नक्षत्र फूल, पांढरफुली, वय्यारी भामा अशा अनेक नावांनी ओळखले जाते. गाजर गवत अॅस्ट्रेसिअॅसी (Asteracea/Compositae) च्या वर्गवारीत मोडते. याचा उगम मेक्सिको येथे झाला असून, इंग्रजीमध्ये पार्थेनिअमला ‘नो मॅन्स् वीड’ असेही संबोधले जाते. मात्र, या तणाची पाने गाजराच्या पानांप्रमाणे दिसत असल्याने सर्वाधिक लोकप्रिय नाव गाजरगवत हेच आहे. हे एक बारमाही तण आहे. भारतात गाजर गवत १९५५ मध्ये पुणे येथे प्रथम ठळकपणे आढळले. त्यानंतर ते संपूर्ण भारतात झपाट्याने सर्वदूर पसरले. सद्य स्थितीत गाजर गवताने हे गवत रस्त्याच्या बाजूला, तळ्या शेजारी, नदी-नाल्या काठी, रेल्वे रूळांच्या आजूबाजूला, कॅनाल-विहीरी, पाईप, पडीक जमिनी व पिका खालील जमिनी सहीत प्रत्येक ठिकाणी आढळते.  ओळख व पसरण्याची कारणे  नावाप्रमाणेच गाजर गवताची पाने ही गाजरासारखी आहेत. हे अतिशय वेगाने वाढणारे गवत असून, त्याची उंची १ ते २ मीटरपर्यंत वाढू शकते. झाडाची पाने व खोड संपूर्णतः काटेरी असतात. त्याला पांढऱ्या रंगाची छोटी-छोटी असंख्य फुले येतात.  गाजरगवताच्या बिया अत्यंत हलक्या व छोट्या असतात. त्या वाऱ्याने सहज उडून एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी पोचतात. अगदी माणसांच्या हस्तक्षेपामुळेही बीज पसरू शकतात. एक गाजरगवताचे झाड साधारण ५ हजार ते २.५ लाखांपर्यंत बी तयार करू शकते.  पार्थेनिअयमचा वेगाने व मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पार्थेनिअमची बीज उत्पादकक्षमता. गाजरगवत एका चौरस मीटर क्षेत्रात सुमारे एक ते दोन लाख बीज उत्पादित करू शकते. तसेच कापलेले पार्थेनिअम पुन्हा-पुन्हा उगवू व वाढू शकते. या गवतावर किडी, रोगांचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. याच्या मुळांतून निघणाऱ्या द्रवामुळे देखील प्रादुर्भाव व विस्तार होण्यास मदत होते.  पार्थेनिअमचे आरोग्यावरील दुष्परिणाम  नियंत्रणासाठी कठीण असलेले गाजरगवत अत्यंत विषारीही आहे. त्यामुळे मनुष्य व जनावरांना अॅलर्जी उद्भवते. अंगावर लाल पुरळ येणे. तसेच अस्थमा, खोकला, त्वचा खराब होणे अशा आजारांचे मूळ कारण गाजर गवत आहे. गाजरगवत रिकाम्या शेताप्रमाणेच विविध पिके, फळ व फूल बागांमध्ये वेगाने वाढते. पार्थेनिअममुळे पिकांची उत्पादनक्षमता कमी होऊ शकते. जैवविविधता, पिकांची उत्पादकताही धोक्यात येते. पर्यावरण दूषित होते. बागा व खेळांच्या मैदानांचे सौंदर्य लुप्त पावते.  एकात्मिक व्यवस्थापन  गाजरगवताच्या नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांनी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. अत्यंत वेगाने वाढणारे तण असल्यामुळे केवळ एखाद्या पद्धतीच्या वापरातून ही समस्या कमी होत नाही.   जागरूकता व प्रेरणा  गाजरगवत नियंत्रणाची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे गाजर गवतापासून होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल जागरूकता. पार्थेनिअमसंदर्भात शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, शेतकरी, शास्त्रज्ञ, नगरपालिका, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ यांच्या साह्याने ग्रामीण भागामध्ये जागरूकता निर्माण करावी. त्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे. छोटे कार्यक्रम यांचा उपयोग होईल. गाजरगवताकडे एक सामाजिक काळजीचा विषय म्हणून पाहून त्यानुसार नियोजन करावे. १६ ते २२ ऑॅगस्ट, २०१९ दरम्यान केंद्रिय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्र, नागपूर यांच्याद्वारे गाजर गवत जागरुकता व निर्मूलन अभियान आठवडा साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे २१ ऑॅगस्ट रोजी गाजर गवत जागरूकता व निर्मूलन हा कार्यक्रम टाकळघाट, ता. हिंगणा, जिल्हा नागपूर येथील ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आला. ‘मेरा गाव मेरा गौरव’ कार्यक्रमाअंतर्गत २३ ऑॅगस्ट रोजी उमरेड तालुक्यातील बेंडोळी गावात ‘एक दिवसीय गाजरगवत जागृकता शिबिर’ घेण्यात आले. कायदेशीर नियंत्रण  भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात कायदेशीर पद्धतीने गाजरगवत व्यवस्थापनासाठी प्रयत्न करण्यात आले. असे कायदे व नियम बनवून भारतातील अन्य राज्यांनी योजनाबद्ध कार्यक्रम राबवला पाहिजे.  यांत्रिकी नियंत्रण  यंत्राच्या सहाय्याने किंवा विळ्याने पार्थेनिअम मुळासकट काढावे. मुळासहीत गाजरगवत उपटल्यावर त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. गाजर गवत योग्य प्रकारे नष्ट न केल्यास ते पुन्हा-पुन्हा उगवू शकते. गाजरगवत मुळापासून उपटण्यासाठी पावसाळा हा सर्वात चांगला काळ आहे. पावसाळ्यात जमिनीत ओलावा असल्याने पार्थेनिअम सहज उपटता येते. फुले नसल्याने त्याच्या बिया पसरण्याचा धोकाही नसतो. हाताने गाजरगवत उपटतांना हात मोज्यांचा वापर करावा. त्या वेळी चेहऱ्यावर रूमाल अथवा कापडाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.  नैसर्गिक नियंत्रण  विविध लागवडी पद्धतींप्रमाणे गाजरगवत वेगवेगळ्या पिकांचा फेरबदल करूनही कमी करता येऊ शकते. उदा. ज्वारी, बरसिम, झेंडू, धैंचा इ. मुळे गाजरगवताचा प्रसार कमी होतो. गाजरगवताची वाढ खुंटते. गाजरगवत जास्त वाढू नये, यासाठी शेतकऱ्यांनी गाजरगवताशी स्पर्धा करणाऱ्या पिकांचे व फूल फळांचे बी शेताच्या चहूबाजूने फेकून द्यावे. 

कंपोस्टिंगद्वारे नियंत्रण  गाजरगवताच्या काढणीनंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या तणांचे अनेक दुष्परिणाम असले तरी त्यापासून सेंद्रिय खत, कंपोस्ट बनवता येते. कंपोस्टिंगसाठी शेतात खड्डा करून व्यवस्थित गाडून टाकावा. अन्य कंपोस्ट पद्धतीमध्ये गाजरगवताचे बी पूर्णतः मरत नाही.    कंपोस्टिंग पद्धत ः खड्डा बनवून कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धतीत ५ किलो शेणाचा संपूर्ण थर बनवतात. त्यामध्ये ५०० ग्रॅम युरिया  टाकतात. सगळ्यात खाली गाजरगवताचे चांगले बारीक तुकडे करून टाकावे. खत बनविण्यासाठी फुलांवर येण्याआधीचे गाजरगवत मुळासकट काढून वापरावे. गांडूळ खत निर्मितीमध्येही गाजरगवताचा वापर करता येतो.   गाजरगवताची मुळे व खोड अधिक मजबूत व कडक असल्यामुळे परिपक्व झाडांपासून फळ्या, बोर्ड बनवता येतात.    गाजरगवताचे व्यवस्थापन एका वर्षामध्ये साध्य होत नाही. त्यासाठी सामुदायिकरीत्या दरवर्षी प्रयत्न करायला हवेत.

जैविक नियंत्रण  गाजरगवताला आळा घालण्यासाठी अनेक उपायांपैकी जैविक पद्धतसुद्धा वापरात आणावी. या मध्ये गाजरगवताच्या शत्रू किडींचा वापर गाजर गवताला मारण्यासाठी किंवा कमजोर करण्यासाठी केला जातो. १९८२ मध्ये मेक्सिको या देशातून ‘मेक्सिको बीटल‘ (भूंगा) या गाजरगवताच्या नैसर्गिक शत्रू कीटकांची आयात केली होती. त्याचे शास्त्रीय नाव Zygogramma bicolorata Pallister असे आहे. साधारणपणे जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये शेतात हे भुंगेरे सोडावेत. हे भुंगेरे पांढरे व लालसर रंगाचे असतात. यांच्या पंखांवर उभ्या रेषा दिसतात. या किड्यांची मादी पिवळसर रंगाची अंडी पानाच्या खालच्या आतील बाजूस देते. नर व मादी दोन्ही गाजरगवताचे भक्षण करतात. मुख्यतः नवीन व कोवळ्या गाजरगवताच्या झाडाकडे ते आकर्षित होतात. जैविक नियंत्रण पद्धती पर्यावरण पूरक, कमी खर्चिक आहे.  

 रासायनिक नियंत्रण   पडीक जमिनीमध्ये, कोणतेही पिके, फळझाडे नसलेल्या ठिकाणी ग्लायफोसेट (४१ टक्के एसएल) ८ ते १० मि.लि. किंवा २, ४-डी (५८ टक्के) २ ते २.५ मि.लि. प्रति लिटर या तणनाशकाची शिफारस आहे.  तथापि २-४ डीचा वापर करताना परिसरात द्विदल पीक नाही किंवा द्विदल पीक असलेल्या शेतामध्ये ही फवारणी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.  शेतात पीक उभे असताना तणनाशकाचा वापर करणे टाळावे. किंवा उगवणपूर्व तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

 ः जी. आय. रामकृष्णा, ८३०८३५९६१७ ,  (केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com