अवस्था - फुलोरा ते दाणे भरणे काही विभागांत पर्जन्यमान कमी असल्याने आणि निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत व गरवे भात फुलोरा अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत ठेवावी. हळवे भात पक्व होऊ लागल्यास कापणीपूर्वी ८-१० दिवस भात खाचरातील पाणी बाहेर काढून टाकावे. गरव्या भात पिकास नत्र खताची तिसरी मात्रा ७१ किलो युरिया प्रति हेक्टरी पीक फुलोऱ्यात असताना द्यावी. पावसाची उघडीप व ढगाळ वातावरणामुळे पाणथळ भागात लावलेल्या भात पिकावर पाणी साठून राहिल्यास निळे भुंगेरे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे खाचरात पाणी जास्त काळ साठू देऊ नये. २-३ दिवसांच्या अंतराने फोडून, नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. निळे भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि. -ढील पाच दिवस पावसाची उघडीप असून, ढगाळ वातावरण राहू शकेल. पाणी साचून राहणाऱ्या, घन लागवड आणि नत्र खताची अवाजवी मात्रा दिलेल्या भात खाचरात तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवावे. जर रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास फिप्रोनिल (५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि प्रति लिटर पाणी याप्रमाणे चुडाच्या बुंध्यावर पडेल अशा प्रकारे फवारणी करावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता नवीन पाणी घेत राहावे. पावसाची उघडीप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस आणि उतार असलेल्या जमिनीतील हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पिकाचे निरीक्षण करून प्रादुर्भाव असलेल्या भातखाचरात एकरी तीन ते चार पक्षी थांबे उभे करावेत. पक्ष्यांकडून अळ्या खाल्ल्या जातील. सकाळी किंवा सायंकाळी भातखाचरात जाऊन चूड उघडून पाहावेत. त्यामध्ये अळी/कोष प्रतिचुड १ याप्रमाणे आढळल्यास शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. पुढील पाच दिवस पावसाची उघडीप दिसते. आंबा बागेतील गवत काढून स्वच्छता करावी. बांडगुळे, मृत फांद्या तसेच निर्जीव फांद्या कापून फांद्यांची विरळणी करावी. हवेतील आर्द्रतेमुळे फांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी १ टक्के बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण झाडावर फवारणी करावी. वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर तुडतुडे, शेंडे पोखरणारी आणि मिजमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. पावसाची उघडीप असताना फवारणी करावी. पुढील पाच दिवस पावसाच्या उघडीपीमध्ये काजू बागांची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या, मृत आणि अशक्त फांद्या कापून विरळणी करावी. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. तसेच १ टक्के बोर्डोमिश्रणाची संपूर्ण झाडावर फवारणी करावी. वाढत्या तापमानामुळे काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी नवीन पालवी फुटण्याच्या वेळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. भाजीपाला पिके अवस्था ः फळधारणा भेंडी पिकामध्ये वाढत्या तापमानामुळे हळद्या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. असा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगग्रस्त रोपे उपटून टाकावीत. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १ मि. लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड लावावीत. ०२३५८ -२८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)