रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणाम
रेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प असून, साधन व निविष्ठा ही शेतकऱ्यांना ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होतील अशा आहेत. त्यासाठी दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री उद्योगाप्रमाणे सहकार आणि खासगी उद्योगांच्या सहकार्याने रेशीम उत्पादन आणि उत्पन्नामध्ये शाश्वतता आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. उत्पादनावर परिणाम करणारा हवामान हा महत्त्वाचा घटक असून, त्याचा या लेखामध्ये विचार करू.
रेशीम शेती उद्योगामध्ये रोजगार उपलब्धतेची प्रचंड क्षमता आहे. जागतिक पातळीवर कच्च्या रेशीम उत्पादनामध्ये १.२ लाख मे. टन उत्पादनासह चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा दुसऱ्या क्रमांकावर असून, उत्पादन ३५,२६१ मे. टन इतके आहे. भारतामध्ये सुमारे आठ लाख शेतकरी कुटुंबे रेशीम उद्योगामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभाग हा रेशीम उद्योगामध्ये अग्रेसर आहे. तुती लागवडीखालील क्षेत्र ११,६४५ एकर (सन २०१८-१९) असून, कोषाचे उत्पादन १२०७ मे. टन झाले आहे. मराठवाड्यातील भौगोलिक स्थिती रेशीम उत्पादनासाठी पूरक असून, सध्याच्या लहरी वातावरणामुळे या शेतीमध्ये नुकसान वाढत आहे. बदलत्या हवामानाचा आधीच अंदाज घेऊन योग्य ती सल्ला सेवा विकसित झाल्यास रेशीम उत्पादनातील नुकसान कमी करणे शक्य आहे.
कीटक संगोपनगृहातील सापेक्ष आर्द्रता, तापमान, हवा, प्रकाश इ. घटकांचा वाढीच्या रेशीम कीटकांच्या विविध अवस्थांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होतो. दर्जेदार कोषनिर्मितीसाठी हवामान घटकांवर व त्यात होत असलेल्या बदलांवर सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे.
रेशीम कीटकांवरील हवेचा परिणाम रेशीम कीटकांच्या वाढीसाठी शुद्ध हवा लागते. संगोपनगृहात दोन्ही बाजूने जमिनीलगत व छताजवळ झरोके ठेवावेत. थंड हवा आत येणे आणि उष्ण हवा बाहेर जाणे, यासाठी ते उपयुक्त राहतात. संगोपनगृहामध्ये तयार होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया यासारखे वायू बाहेर टाकण्यासाठी हवा खेळती राहणे अत्यंत गरजेचे असते. हवा खेळती राहत असल्यास रेशीम कीटकांची मरतूक कमी होते. खाद्य खाण्याची क्रिया वाढते. त्यांचे पचन चांगले होते. परिणामी कीटकांच्या वजनात, कोषावर जाण्याच्या प्रमाणात आणि कोष उत्पादनामध्ये वाढ होते.
रेशीम कीटकांवरील प्रकाशाचा परिणाम कीटक संगोपनगृहामध्ये लख्ख प्रकाश किंवा गडद अंधार टाळावा. प्रकाशाची तीव्रता मंद म्हणजेच (२० लक्स ) इतकी ठेवावी. प्रौढ कीटक संगोपनगृहात १६ तास प्रकाश व ८ तास अंधार राहील, याची काळजी घ्यावी. बाल्य रेशीम कीटक संगोपनात त्याच्या उलटे म्हणजेच १६ तास अंधार आणि ८ तास प्रकाश ठेवावा. सतत प्रकाश किंवा अंधार ठेवल्यास कीटकांच्या अळी अवस्थांची वाढ आणि कोषांचे वजन यावर परिणाम होतो.
ः डॉ. चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२ (प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.