जगात 'या' भागात भविष्यात दुष्काळाची तीव्रता वाढणार

भविष्यातील वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढणार असून, त्याचे विपरीत परिणाम वनस्पतींवर होणार आहेत. दुष्काळाची वाढती वारंवारिता, त्यातही अधिक तीव्रतेच्या दुष्काळाचे वाढते प्रमाण, यामुळे वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचा फटका मानवासह सृष्टीला बसू शकतो. हे संशोधन ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
भविष्यात दुष्काळाची तीव्रता, वारंवारितेमध्ये होणार वाढ
भविष्यात दुष्काळाची तीव्रता, वारंवारितेमध्ये होणार वाढ

वातावरणातील बदलामध्ये तापमानातील वाढ आणि कार्बनडाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण असे दोन मुख्य घटक राहण्याची शक्यता आहे. त्यातील वाढत्या कर्बवायूमुळे वनस्पतीच्या वाढीसाठी फायदा होणार असल्याचे अनुमान शास्त्रीय वर्तुळामध्ये मांडले जात असले तरी तीव्र दुष्काळाच्या स्थितीचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत लॉस ॲलामोस नॅशनल लॅबोरेटरीतील शास्त्रज्ञ चोंगगॅंग क्षू यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते तीव्र दुष्काळाची स्थिती ही विशेषतः ॲमेझॉन, दक्षिण आफ्रिका, मध्यपूर्व, ऑस्ट्रेलिया आणि नैऋत्य अमेरिका येथे वाढणार आहे. भविष्यातील दुष्काळाच्या स्थितीमध्ये आर्द्रतेचे कमी होत जाणारे प्रमाण, कमी पाऊस, उच्च तापमान आणि सातत्याने लागणाऱ्या वणव्यांमुळे उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूंचे वाढते प्रमाण यांचा प्राधान्याने समावेश असेल. या अभ्यासातील विश्लेषणानुसार, भविष्यातील २०७५ ते २०९९ या काळात इतिहासातील १८५० ते १९९९ या काळाच्या तुलनेमध्ये उच्च हरितगृह वायू उत्सर्जनाच्या स्थितीमध्ये तीव्र दुष्काळाच्या वारंवारितेचे प्रति वर्ष प्रमाण हे ३.८ गुणांकाने वाढण्याचा अंदाज आहे. तर मध्यम हरितगृह वायू उत्सर्जनाच्या स्थितीमध्ये ते प्रमाण ३.१ वाढू शकते. वास्तविक दुष्काळातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेच्या ताणामुळे आधीपासूनच वनस्पतीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या सरळ परिणामाच्या तुलनेमध्ये अप्रत्यक्ष परिणामामध्ये वाढती वारंवारिता आणि तीव्रताही महत्त्वाची ठरणार आहे. त्यातही वणव्यांचे आणि किडीच्या उद्रेकांचे वाढते प्रमाण यामुळे वातारणामध्ये उत्सर्जित होणाऱ्या कर्बवायूच्या प्रमाणामध्ये वेगाने वाढ होणार आहे. वनस्पती कार्बनडाय ऑक्साईडचा वापर प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये करत असतात. या क्रियेचा वातावरणातील एकूण कर्बवायूच्या प्रमाणावर परिणाम होतो. भविष्यातील वाढत्या कर्बवायूच्या प्रमाणामुळे वनस्पतीच्या वाढीला चालना मिळणार आहे. मात्र, त्याच्या जोडीला जमिनीमध्ये पाण्याची कमतरता, उष्णतेचा ताण या गोष्टीही असणार आहेत. या गोष्टीमुळे वाढत्या प्रकाश संश्लेषणाचे परिणाम कमी होणार आहेत. संशोधकांच्या गटाने १३ अर्थ सिस्टिम मॉडेल्सद्वारे प्राप्त माहितीचे विश्लेषण केले आहे. त्यासाठी त्यांनी १८५० ते १९९९ या काळातील दुष्काळ, त्यांची तीव्रता, वनस्पतींच्या वाढीवर झालेले परिणाम यांचा अभ्यास केला आहे. त्यावरून भविष्यातील वातावरणाचे वनस्पतींवरील परिणाम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. वनस्पती किंवा झाडे हलक्या आणि मध्यम दुष्काळाच्या स्थितीमध्ये लगेच मरत नाहीत. मात्र, भविष्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे धोक्यामध्ये वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर कार्बन साखळीमध्ये विपरीत परिणाम होऊ शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com