आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन 

आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन 
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन 

जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. उस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर करावा. पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार खतांची मात्रा द्यावी.  आडसाली हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा १६ ते १८ महिन्यांचा असतो. एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत तीन वर्षे राहते. या तिन्ही वर्षी उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्‍यक असते.  सेंद्रिय खत व्यवस्थापन ः  १) जमिनीची मशागत करताना एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत मिसळून घ्यावे. त्यानंतर ऊस लागवडीच्या अगोदर एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खतांचा पहिला हप्ता लागणीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा.  २) सेंद्रिय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो.  ३) शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.  जिवाणू खतांचा वापर ः  जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा वापर आवश्‍यक आहे. द्रवरूप जिवाणू खते अनेक बाबतीत सरस आहेत.  हिरवळीचे आंतरपीक ः  १) आडसाली हंगामामध्ये आपणाला ताग किंवा धैंचा घेऊन ऊस लागवड करणे शक्‍य होत नाही. अशावेळेस सरी पद्धतीने ताग घेणे फायदेशीर ठरते. म्हणजेच आपण उसासाठी जशा सऱ्या पाडतो त्याप्रमाणे लांब सऱ्या पाडून सरीमध्ये ऊस लागवड न करता तागाचे बी टाकावे. ताग बी मातीआड होईल याची काळजी घ्यावी. ताग पाच ते दहा टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर सरीमध्ये पाडावा.  २) ताग सरीमध्ये पाडण्यासाठी सरीच्या रूंदीची लोखंडी चौकट तयार करून बैलांच्या साहाय्याने ओढल्यास उभा ताग मोडला जाऊन सरीमध्ये चांगल्याप्रकारे पाडला जातो.  ३) ताग सरीत पाडल्यानंतर रिजरच्या साहाय्याने वरंब्याच्या ठिकाणी सरी पाडावी म्हणजे वरंबा फुटून सरीमधल्या तागावर माती पडते. त्या ठिकाणी नवीन वरंबा तयार होतो. तयार झालेल्या सरीमध्ये लगेचच ऊस लागण करता येते.  ४) ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक घेऊ शकतो. ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यावर जमिनीत वापसा आल्यावर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतर पीक लावून बाळ बांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे.  रासायनिक खतांचा वापर ः  १) आडसाली ऊस पिकास प्रतिहेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश अशी शिफारस आहे. मात्र, ही खतमात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. माती परिक्षमामुळे जमिनीचा सामू, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सुक्ष्मअन्नद्रव्यांची स्थिती कळते.  २) को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्‍त खतांची २५ टक्के जास्त मात्रा म्हणजेच ५०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे.  ३) शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्र खताची मात्रा चार हप्त्यात विभागून द्यावी. जमीन हलकी असेल तर नत्र पाच-सहा वेळा विभागून द्यावे.  ४) उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा.  ५) उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्‍यक आहे. ६) लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही आणि ती देऊही नयेत, दिल्यास त्याचा उसाच्या रसाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्‍यता असते.  ७) खतांची निवड करताना नेहमी सरळ खतेच निवडावीत. मिश्र खते अथवा संयुक्त खते वापरावयाची झाल्यास लागणीच्या आणि मोठ्या बांधणीच्या वेळीच वापरणे योग्य असते.  खतांचा वापर करताना ः  १) रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांच्या साहाय्याने द्यावीत.  २) उभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वापसा असावा.  ३) रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्‍यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.  ४) स्फुरदयुक्त खते मुळांच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. हेक्‍टरी २.५ लिटर द्रवरूप स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.  ५) पालाशयुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्‍यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.  ६) लागवडीची खत मात्रा शेणखतात मिसळून द्यावी. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपयुक्तता वाढून ती पिकास लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.  ७) खत मात्रा ठिबक संचाद्वारे दिल्यास खतांची उपयुक्तता वाढते आणि खर्चात बचत होते.  गंधकयुक्त खते, अन्नद्रव्यांचा वापरः  १) राज्यातील जमिनीत गंधकाची कमतरता लक्षात घेता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ऊस लागवडीच्या वेळी ६० किलो मूलद्रवी गंधक प्रतिहेक्‍टरी द्यावे. त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते २४ आणि १५ ते ३० टक्के साखर उत्पादनात वाढ झाली आहे.  २) ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्‍यकता आहे तेवढीच सुक्ष्मअन्नद्रव्यांची सुद्धा आवश्‍यकता असते. प्रतिहेक्‍टरी व्हीएसआयनिर्मित मल्टिमायक्रोन्युट्रीयंट ५ लिटर आणि मल्टिमॅक्रोन्युट्रीयंट ५ लिटर ही द्रवरूप खते प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि पुन्हा दोन्ही प्रतेकी ७.५ लिटर द्रवरूप खते प्रती ७५० लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.  ३) हेक्‍टरी २५ किलो व्हीएसआय मायक्रोसोलची मात्रा द्यावी. हे विद्राव्य खत दोन पध्दतीने देता येते. हे खत सेंद्रीय आम्लयुक्त असून पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्यामुळे ठिबक सिंचन आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहे. ठिबक संचाद्वारे प्रत्येक वेळी हेक्‍टरी ६.२५ किलो प्रती २५० लिटर पाण्यात विरघळून लागणी वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. ठिबक संच नसल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून लागणीचे वेळी हेक्‍टरी १२.५ किलो आणि ऊस बांधणीचे वेळी १२.५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.  ४) ऊस हे पीक जमिनीतून ५०० ते ७०० किलो सिलीकॉन जमिनीतून घेते. जमिनीत सिलीकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशोधनानुसार लागणीच्या वेळी प्रती हेक्‍टर १.५ टन बगॅसच्या राखेमध्ये २.५ लिटर सिलीकेट विरघळविणाऱ्या जिवाणू खताचा वापर करावा.  संपर्क ः ०२०- २६९०२२७८  (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com