फळछाटणीच्या काळामध्ये द्राक्षवेलीची उत्पादकता ही प्रामुख्याने अन्नद्रव्ये आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. सततच्या पावसाच्या स्थितीमध्ये द्राक्षवेलींवर विपरीत परिणाम झाला आहे. विशेषतः नाशिक आणि सांगली परिसरातील सततच्या पावसामुळे खते देणे आणि मातीच्या व्यवस्थापनाच्यामध्ये अडचणी आणल्या आहेत. बहुतांश भागातील जमिनी या चिकण कणांचे प्रमाण अधिक असलेल्या भारी प्रकारामध्ये मोडतात. या मातीमध्ये पाणी धरून ठेवतात. अशा जमिनीमध्ये माती व्यवस्थापनाशी संबंधित कामे केल्यास मातीच्या संरचनेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः हवा खेळती राहत नाही आणि मुळांच्या कक्षेतील जैविक घटकांवर परिणाम होतो. खतांचा वापर वाफसा स्थिती आल्याशिवाय करता येत नाही.
ज्या बागांची फळछाटणी उशिरा झाली आहे, अशा ठिकाणी काडीची परिपक्वतेला उशीर होईल. जेव्हा पावसामध्ये खंड पडून चांगला सूर्यप्रकाश मिळेल, त्या वेळी सल्फेट ऑफ पोटॅश ५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे एक दोन फवारणी करून घ्याव्यात. तसेच वाफसा असल्यास मातीतूनही सल्फेट ऑफ पोटॅश (०-०-५०) १५ ते २० किलो प्रति एकर प्रमाणे पूर्तता करावी. ज्या ठिकाणी फळछाटणी अद्याप व्हावयाची आहे आणि पानगळीसाठी फवारणी झालेली नाही, अशा स्थितीमध्ये पोटॅशिअमची फवारणी सुरू ठेवावी. कारण वेलीवरील पाने अन्नद्रव्यांचा साठा करत असल्यामुळे महत्त्वाची आहेत. फळछाटणीपू्र्वी मुळाच्या कक्षेतील सुमारे ३० सेंमी खोलीपर्यंतचे मातीचे नमुने काढून तपासणीसाठी पाठवावेत. तसेच सिंचनाचे पाणीही तपासून घ्यावे. भूजलाचे पाणी सिंचनासाठी वापरत असल्यास या पाण्यामध्ये नत्र, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम इत्यादी घटक चे पाणी कमीअधिक प्रमाणात उपलब्ध होत असतात. माती आणि पाण्याच्या विश्लेषणानुसार व पिकाच्या वाढीच्या स्थितीनुसार खते देणे योग्य ठरते. फळछाटणीनंतर सामान्यतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये द्यावयाच्या खतांचे नियोजन पुढे दिले आहे. त्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश (N, P२O५ आणि K२O) या अन्नद्रव्यांचे आपल्या माती, पाणी आणि गत हंगामातील देठ परीक्षणानुसार योग्य प्रमाण ठरवावे. वाढीची स्थिती | फळछाटणीनंतर कालावधी (दिवस) | कामाचा महिना | अन्नद्रव्यांचा पुरवठा (किलो प्रति एकर) |
नत्र | स्फुरद | पालाश |
फुटीची वाढ | १-४० | ऑक्टोबर- नोव्हेंबर | ३२ | ०० | ०० |
फुलोरा ते मणिगळ | ४१-५५ | नोव्हेंबर- डिसेंबर | ०० | ११ | ०० |
मण्याचा विकास | ५६-७० | डिसेंबर - जानेवारी | ०० | ११ | ०० |
मण्याचा विकास | ७१-१०५ | डिसेंबर - जानेवारी | ३२ | ०० | ३२ |
मण्यात पाणी उतरणे ते फळ काढणी | १०६- काढणी | जानेवारी - मार्च | ०० | ०० | ३२ |
विश्रांतीचा काळ | काढणी ते खरड छाटणी (२० दिवस | मार्च ते एप्रिल | १०.५ | १८ | १०.५ |
मातीमध्ये असलेल्या चुनखडीचे प्रमाण व प्रकार (कॅल्शिअम कार्बोनेट) कमी अधिक असल्यामुळे जस्त, लोह आणि मॅंगेनीज या घटकांच्या विशिष्ट शिफारशी करता येत नाहीत. सद्यःस्थितीमध्ये ज्या घटकाची कमतरता जाणवत असेल, त्याची पूर्तता करावी. प्रति हंगाम सरासरी एकरी २० किलो प्रमाणामध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि मॅंगेनीज सल्फेट प्रमाणे देता येईल. बोरॉनची पूर्तता देठाच्या विश्लेषण अहवालानुसारच करावी. चांगले कुजलेले कंपोस्ट खत हे वेलीच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटकांची व उपयुक्त सूक्ष्मजीवांची पूर्तता करते. हे सूक्ष्मजीव अन्नद्रव्याच्या वहनामध्ये किंवा मातीतील उपलब्धतेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. प्रति एकर किमान १० टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी कंपोस्ट खत, हिरवळीची खते, सेंद्रिय आच्छादन (ज्वारी, मका, सोयाबीन, उसाचे पाचट यांच्या पानांचे जमिनीवर आच्छादन) याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. मातीतील क्षारांचे प्रमाण तपासून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे कुजलेलेच प्रेसमड वापरावे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा वापर
मातीच्या परीक्षणामध्ये माती चुनखडीयुक्त असल्याचे दिसून आले असल्यास, त्याचा परिणाम नत्र, स्फुरद, मॅग्नेशिअम, पालाश, मॅंगेनीज, जस्त, तांबे आणि लोह यांच्या उपलब्धतेवर होत असतो. या जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी केवळ मातीचा सामू कमी करून चालत नाही, तर कॅल्शिअम कार्बोनेट उदासीन करण्याकडेही लक्ष द्यावे लागते. छाटणीच्या हंगामामध्ये कॅल्शिअम कार्बोनेटच्या प्रमाणानुसार एकरी ५० ते १०० किलो या प्रमाणात साधारण गंधक (सल्फर) मातीमध्ये चांगले मिसळून देणे उपयुक्त ठरू शकते. जर माती अधिक चुनखडीयुक्त असेल, तर सल्फरचा वापर किमान दोन, तीन वर्षे करणे आवश्यक आहे. यातून आम्लाची निर्मिती होतेवेळी सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी गंधकासोबत कंपोस्ट किंवा शेणखत मिसळावे. अशा स्थितीमध्ये नत्राचा वापर वाढवावा. अमोनिअम सल्फेट किंवा युरिया विभागून पाण्यासोबत द्यावा. त्यामुळे अमोनियामध्ये रूपांतरणामुळे होणारा ऱ्हास रोखता येईल. बहुतांशी जमिनी या अल्कली स्वरूपाच्या असून, खते ही प्रामुऱ्याने आम्लधर्मी असल्याने खत वापराची कार्यक्षमता चांगली राहण्यास मदत होते. स्फुरदाचे स्थिरीकरण ही मोठी समस्या असून, विद्राव्य स्फुरद (फॉस्फरिक आम्ल, ट्रिपल सुपर फॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट इ.) यांचा वापर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उपयुक्त ठरतो. तसेच या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा अधिक वापर केल्यास स्फुरदाची वेलीसाठी उपलब्धता वाढते. सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर सेंद्रिय खतांसोबत केला तरच उपयुक्त ठरू शकतो. अधिक कॅल्शिअमच्या पातळीमुळे मातीतील मॅग्नेशिअम आणि पालाशच्या पिकांच्या शोषणावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मातीतून त्यांचा वापर करून पानांतील मॅग्नेशिअम आणि पालाशचे प्रमाण वाढवणे कठीण होते. यामुळे ‘बंच स्टेम नेक्रॉसिस’ होऊ शकतो. विद्राव्य पालास स्रोत उदा. सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशिअम नायट्रेट इ. यांचा वापर जमिनीद्वारे विभागून करावा. तसेच ३-४ फवारणीद्वारे पालाशची पूर्तता फाउंडेशन आणि फळछाटणीच्या काळात करण्याची शिफारस केली जाते. त्याच प्रमाणे विद्राव्य मॅग्नेशिअम स्रोत उदा. मॅग्नेशिअम सल्फेट, मॅग्नेशिअम नायट्रेट इ. जमितीतून विभागून द्यावेत. त्यासोबत ३-४ फवारण्या फाउंडेशन आणि फळछाटणीच्या हंगामात करण्याची शिफारस आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाची कमतरता ही मोठी समस्या असते. त्यासाठी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोहाच्या कमतरेतमुळे झालेले क्लोरासिस (आयर्न क्लोरोसिस) समस्या दिसत असल्यास फेरस सल्फेट २-३ ग्रॅम प्रति लिटर फवारणीद्वारे द्यावे. सोबत फेरस सल्फेट २५ ते ३० किलो प्रति एकर या प्रमाणे अनेक वेळा विभागून द्यावे. किंवा मातीमध्ये चिलेटेड स्वरूपातील फेरस (Fe-EDDHA) द्यावे. झिंकमुळे झिंक हायड्रॉक्साइड आणि झिंक कार्बोनेट यांचा साका तयार होतो. तो अविद्राव्य असून, वेलींना घेता येत नाही. त्यामुळे चिलेटेड स्वरूपातील झिंकचा वापर करावा. ते तुलनात्मक अधिक काळ वेलींना उपलब्ध राहते. छाटणीच्या एका हंगामामध्ये १५ ते २० किलो झिंक सल्फेट देताना अनेक वेळा विभागून द्यावे. सोबत १ ते २ ग्रॅम झिंक सल्फेट फवारणीद्वारे दिल्यास पानांतील झिंकचे प्रमाण सुधारता येईल. आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असल्यामुळे काढणीनंतर आवश्यक अन्नद्रव्यांची पूर्तता करणे आवश्यक ठरते. वेलीवरील पाने टिकवून ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण होऊन वेलीतील कर्बोदकांचे साठे सुधारण्यास मदत होते. पुढील हंगामासाठी ते उपयुक्त ठरतात. या काळात वार्षिक खताच्या सुमारे १० टक्के खते द्यावीत. क्षारयुक्त (सोडिअमयुक्त) जमिनीची सुधारणा जर जमिनी सोडियअयुक्त असल्यास, त्या सुधारण्यासाठी त्यामध्ये जिप्सम किंवा सल्फर वापर करावा. जिप्सम (कॅल्शिअम सल्फेट -CaSO४·२H२O) मिसळल्यानंतर भरपूर पाणी देऊन त्याचा निचरा केल्यास मातीतील सोडिअमचे मुक्त कण कमी होतात. सोडिअमयुक्त जमिनींची सुधारणा ही सावकाश होते. कारण जमिनींची संरचना एकदा बिघडल्यानंतर सुधारण्यासाठी वेळ लागतो. मातीची संरचना सुधारण्यासाठी व सोडियम सिंचनाच्या पाण्यासोबत निचरा होण्यासाठी हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, सल्फ्युरिक ॲसिड, मोलॅसिस असे घटक उपयुक्त ठरू शकतात.