काजू फुलोरा ते फळधारणा अवस्था
काजू पिकामध्ये उशिराने येत असलेल्या नवीन पालवीवर ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. पालवीचे किडीपासून संरक्षणाकरिता फवारणी प्रतिलिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. फुलोरा अवस्थेत असलेल्या काजूची फळधारणा वाढविण्यासाठी इथेफॉन या संजीवकाची १० पी.पी.एम. किंवा १० मिलीग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास फुलोरा ते फळधारणा अवस्थेत काजूला पाणी देण्याची व्यवस्था करावी. काजू बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढविण्यासाठी प्रतिझाड ताज्या किंवा आठ दिवसापर्यंत साठविलेल्या २५ टक्के गोमुत्राची फवारणी (५ लिटर द्रावण) आणि २५ टक्के गोमुत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी (१० लिटर द्रावण) करावी. काजू बिया पूर्ण तयार झाल्याशिवाय बियांची काढणी करू नये. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी. नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूस रस शोषतात. माशीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट स्त्रावाकडे मुंग्या आकर्षित होतात. त्यांच्यामुळे स्त्राव सर्वत्र पानांवर पसरतो. पानांवरील स्रावावर कालांतराने काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. चक्राकार पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी झाडावर नियमित पाण्याची फवारणी करावी. पानावरील काळी बुरशीच्या व्यवस्थापनासाठी पानांवर पाण्याचा स्टार्च सोल्युशन (१ टक्के ) फवारावे. तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी - आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. सुपारी तापमानात वाढ संभवत असल्याने सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
फळबाग रोपवाटिका वाढीची अवस्था
तापमानात वाढ संभवत असल्याने फळबाग रोपवाटिकेस नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. फळबाग रोपवाटिकेतील गवत काढून स्वच्छता ठेवावी. गरजेनुसार रोपांसाठी सावली करावी. आंबा मोहोर अवस्था ते फळधारणा मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा पिकावर फुलकिडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार तिसरी फवारणी मोहोर फुलण्यापूर्वी (दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी) करावी. फवारणी प्रतिलिटर पाणी - इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि. ली.अधिक हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि. ली. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम. टीप : फवारणी करताना मोहोर नुकताच फुलत असल्यास आणि फळधारणा झालेली नसल्यास शक्यतो फवारणी फळधारणा होईपर्यंत टाळावी. कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास आणि फवारणी करणे गरजेचेच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांचा परागीकरणाचा कालावधी वगळून फवारणी करावी. वाटाणा अवस्थेतील फळे असताना
फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये वाटाणा आकाराच्या अवस्थेत तुडतुड्याचा, फुलकिडीचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता आहे. तिथे मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) करावी लागेल. प्रमाण प्रतिलिटर पाणी. थायामेथाक्झाम (२५ टक्के डब्ल्यू. जी.) ०.१ ग्रॅम अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के )०.५ मि.लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २ ग्रॅम. फळधारणा ते वाटाणा अवस्थेतील आंबा बागेमध्ये फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाडास या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना, उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १० ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात फवारणी करावी. फळे गोटी ते अंडाकृती आकाराचे विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फळगळ कमी करणे, फळाचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळे मिळणे, फळामधील साक्याचे प्रमाण कमी करणे, आणि फळमाशीपासून संरक्षण करणे या उद्देशाने २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. हापूस फळे वाटाण्याचा आकाराची असल्यापासून पुढे आठवड्याच्या अंतराने अधिक उत्पादन मिळण्यासाठी ५५ टक्के तीव्रतेचे गोमूत्र, उपलब्धतेनुसार ३ ते ६ वेळा फवारावे. ः ०२३५८ - २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)