पावसाची उघडझाप आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यातून आंब्याला पालवी फुटण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. या पालवीचे तुडतुडे आणि मिज माशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी, डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी. आंबा बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी. नंतर कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. नवीन लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीची अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पडून आत शिरते. आतील भाग पोखरून खाते. परिणामी कीडग्रस्त फांदी सुकून जाते. प्रादुर्भावित भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात. अशा फांद्या अशक्त राहतात. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव कमी असताना कीडग्रस्त पालवी किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावी. आवश्यकता वाटल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट १ मि.लि. ढगाळ व दमट वातावरणामुळे, काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मोस्कीटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येईल. कीड पालवीतील रस शोषून घेत असल्याने नवीन पालवी सुकून जाते. नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली. काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी. नंतर कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. (टीप : कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, ॲग्रेस्को शिफारस आहे.) जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड आणि गुहागर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तसेच तापमानात वाढ संभवत असल्याने नारळ बागेला पाण्याचा ताण बसू शकतो. नारळ बागेस संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाच वर्षावरील नारळाच्या प्रति झाडास ७५० ग्रॅम युरिया व ६६७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा खताचा दुसरा हप्ता द्यावा. खते नारळाभोवती १.५ ते १.८ मीटर अंतरावर मातीत मिसळून द्यावीत. खते दिल्यानंतर माडास पाणी द्यावे. वर दिलेली खताची मात्रा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी २/५ पट, तिसऱ्या वर्षी ३/५ पट आणि चौथ्या वर्षी ४/५ पट द्यावीत. नारळ बागेतील वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. बागेची साफसफाई करावी आणि नंतर खताची मात्रा द्यावी. खते दिल्यानंतर माडास पाणी द्यावे. नारळामध्ये सोंड्या भुंग्याच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. किडीच्या अळ्या माडाच्या खोडातील मऊ गाभा खाऊन खोड आतून पोखरून काढतात. अळ्या खोडाच्या आत असल्याने प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी बुंध्यावर छिद्रे दिसतात. त्यातून ताजा भुस्सा व तांबूस तपकिरी स्राव वाहताना दिसतो. या किडीच्या नियंत्रणासाठी छिद्रातून शक्य असतील तेवढ्या अळ्या कोयतीच्या सहाय्याने काढून टाकाव्यात. माडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास तिथे बोर्डो पेस्ट लावावी. सोंड्या भुंग्याच्या व्यवस्थापनासाठी बागेत गंध सापळे लावावेत. पावसाची उघडीप आणि तापमानातील वाढ शक्यता यामुळे सुपारी बागेला पाण्याचा ताण बसण्याची शक्यता आहे. यामुळे सुपारी तडकण्याची शक्यता असते. यासाठी सुपारी बागेस संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी. सुपारी बागेतील रोगट शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट करून बागेत स्वच्छता ठेवावी. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे सुपारी फळांच्या देठावर कोळेरोग बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येऊ शकतो. या रोगामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डो मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३.७ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पानांच्या बेचक्यात फवारणी करावी. जनावरांचे वाढत्या उष्णतेपासून योग्य ते संरक्षण करावे. जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था करावी. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. फुलोऱ्यावर असलेल्या हिरवा चाऱ्याची मुरघास पद्धतीने साठवण करावी. यासाठी प्रत्येकी १०० किलो बारीक तुकडे केलेल्या गवतावर ५ ते ६ लिटर पाण्यामध्ये तयार केलेले द्रावण (२ कि. गूळ + अर्धा कि. युरिया + १ कि. मीठ) शिंपडावे. प्रक्रिया केलेल्या गवताचे थर रचून बाजारात सहज उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक सायलो पूर्ण भरावेत. पाऊस आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी सायलो शेडमध्ये ठेवावेत. अशा पद्धतीने २-३ महिन्यामध्ये मुरघास जनावरांना खाण्यासाठी तयार होतो. डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)