जलसंधारणांच्या कामातून राऊतवाडी झाले टँकरमुक्त

जलसंधारणांच्या कामातून राऊतवाडी झाले टँकरमुक्त
जलसंधारणांच्या कामातून राऊतवाडी झाले टँकरमुक्त

सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून लोकसहभाग, जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे होत आहेत. त्या जोरावर टँकर बंद होत आता सिंचनाची सुविधा तयार होऊन शेतकऱ्यांना बागायती पिके घेणे शक्य झाले आहे. सातारा जिल्ह्यातील राऊतवाडी (ता. कोरेगाव) हे या पैकीच गाव आहे. ग्रामस्थांच्या एकीतून झालेल्या कामांमधून पिण्याची पाण्याची टंचाई दूर होण्याबरोबरच गाव टँकरमुक्त झाले. आता फळबागा, ऊस आदी क्षेत्रात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव हा दुष्काळी भाग असल्याने परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. ही टंचाई दूर करण्यासाठी अनेक गावे संघटीत झाली. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाला लोकसहभागाची जोड दिली. कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी हे त्यातीलच एक उदाहरण. सुमारे ११७७ लोकसंख्या असलेल्या या गावचे ९३७ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ५५० हेक्टर पिकांखाली आहे. मुरा डोंगरालगतच्या या गावात पाणी टंचाई पाचवीला पुजलेली होती. आजूबाजूंच्या गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू असताना आपणही आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे, असा ग्रामस्थांमधून सूर येऊ लागला. पाण्याच्या मुद्द्यावर गाव झाले एक पाण्याच्या मुद्यावर राऊतवाडीतील ग्रामस्थ एक आले. सन २०१५ मध्ये गावाच्या शिष्टमंडळाने नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांची भेट घेत गावातील पाणीटंचाई बद्दल माहिती दिली. ग्रामस्थ लोकसहभाग देणार असतील मदत करण्याचे मंत्री महोदयांनी आश्वासन दिले. गावचे नवनियुक्त सरपंच गणेश जगताप यांना ॲग्रोवनच्या सरपंच महापरिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केलेले मार्गदर्शन त्यांच्यासाठी मोलाचे ठरले. पुढील दिशा त्यातून पक्की झाली. जलयुक्त शिवार कामांची आखणी गावचे संघटन पाहून राज्यमंत्री सागर यांनी यंत्रांसाठी लागणाऱ्या डिझेलसाठी जलयुक्त शिवार योजनेतून निधी उपलब्ध केला. जलसंधारण कामांची संख्या जास्त असल्याने स्वतही आर्थिक मदत केली. गावाच्या हद्दीत असलेल्या पवनचक्क्यांचा कर तसेच ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा झाली. त्यातून गावातील पूर्वीच्या तीन पाझर तलावांची दुरूस्ती झाली. तलावाचे खोली- रूंदीकरण झाले. निघालेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. यामुळे शेतजमीन सुपीक होण्यास चालना मिळाली. ग्रामस्थांच्या श्रमदानातून सलग समतल चर, शेतीला बांधबंदिस्ती, वृक्षारोपणासाठी खड्डे अशी कामे झाली. आदर्श गाव योजनेत निवड गाव आदर्श योजनेत पात्र होण्यासाठी पोपटराव पवार व सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. कैलाश शिंदे यांनी ग्रामसभेचे आयोजन करण्यास सांगितले. त्यात पात्रतेसाठी परिक्षा घेण्यात आली. त्यात ५० पैकी ४८ गुण मिळून गावाची आदर्श गाव योजनेत निवड झाली. या योजनेतून मिळालेल्या निधीचा मग पाझर तलाव जोड कार्यक्रम सुरू झाला. पाझर तलाव जोड कार्यक्रम गावच्या हद्दीत मुरा डोंगरालगत पाझर तलाव आहे. पाऊस झाल्यानंतर तलाव भरून वाहायचा. उर्वरित पाणी वाया जायचे. गावालगतचा एक तलावही कोरडा असायचा. मग डोंगरालगतच्या तलावापासून बंदिस्त पाइपलाइन करण्यास प्रारंभ केला. सोबत उताराचा उपयोग, तसेच ओढ्याचा वापर करत पाणी गावालगतच्या तलावात आणून सोडण्यात आले. यामुळे डोंगरलगतच्या पाझर तलावातील वाया जाणारे पाणी पूर्णपणे या तलावात येऊ लागले. सायफन पध्दतीचा वापर यात केल्याने वीज लागत नाही. आता दोन्ही तलावात पाणी साठले असून विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. एप्रिलपर्यंत पुरेल एवढे पाणी असल्याने टंचाई भासणार नाही. कामांची गती सुरूच निधी येईल तसतशी कामे सुरू राहणार आहेत. आराखड्यात पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरविण्यासाठी सलग समतल चरी, सिमेंट बंधारे, वृक्षारोपण आदी कामांचा समावेश आहे. मुरा डोंगरलगत जात असलेल्या वसना सिंचन रखडलेल्या योजनेचा पाठपुरावाही ग्रामस्थांकडून झाला. त्यासही निधी प्राप्त झाला असल्याने योजना पूर्ण झाल्यावर शंभर टक्के क्षेत्र बागायत होणार आहे. जलंसधारणाच्या कामांचे झालेले फायदे

  • गावास गेल्या चार वर्षांपासून टँकरची गरज भासलेली नाही.
  • तलावातील गाळामुळे पडीक शेतजमीन सुपीक होण्यास मदत
  • विहिरीच्या पाणापातळीत व बागायत क्षेत्रात
  • वर्षभर हंगामी पिके घेण्याबरोबर ऊस, आले यांचही लागवड .
  • फळबाग क्षेत्रात वाढ. डाळिंब, सीताफळ यासह सागवानाची मोठ्या प्रमाणात लागवड.
  • ठिबक सिंचन करण्यावर भर
  • गावातील एकीमुळे एक गाव एक गणपती यासह विविध धार्मिक सण, हरिनाम पारायण सप्ताह उत्साहात साजरे होतात.
  • वाघोली येथील शंकरराव जगताप आर्टस ॲण्ड कॅामर्स या महाविद्यालयाने राऊतवाडी गाव दत्तक घेतले आहे. चार वर्षांपासून निवासी शिबिर तसेच महिन्यातून एकवेळ श्रमदान केले जाते. यामुळे गावात अनेक विधायक कामे झाली आहेत.
  • गावाच्या विकासात तत्कालीन उपजिल्हाधिकारी पराग सोमण, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, तसेच कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे.
  • गणेश जगताप-९१४५७७३९२३ सरपंच, राऊतवाडी  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com