वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे लक्ष द्यावा
द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण बदललेले दिसते. त्याच सोबत बऱ्याचशा भागात चक्रीवादळाचा तडाखा बसलेला दिसून येईल. बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते रिमझीम पाऊस व त्यासोबत वादळी वारे पाहण्यात आले. या मुळे जमिनीत पूर्ण ओलावा तयार झाला असून, विविध वाढीच्या अवस्थेतील द्राक्षबागेत बागायतदारांना येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणी व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ. १) वेलीचा वाढता जोम ः द्राक्षबागेत उशिरा छाटणी व लवकर छाटणी या सोबतच नवीन बाग अशा तीनही स्थितीतील बागेत वेलीचा वाढीचा जोम हा जास्त राहील. अ) लवकर छाटलेल्या बागेत सूक्ष्म घड निर्मितीची अवस्था संपलेली असेल व वेलीने या वेळी काडीच्या परिपक्वतेच्या कालावधीत प्रवेश केलेला असेल. बऱ्याचदा सूक्ष्म घड निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात काडीवर डोळ्यामध्ये सूक्ष्म घड मजबूत होण्याच्या दृष्टीने वेलीची वाढ नियंत्रणात असणे गरजेचे असते. मात्र, आपल्या भागात पाऊस जर जोरात झालेला असल्यास वेलीमध्ये जिबरेलीन्सच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होते. आपल्याला फुटीची वाढ जोमात होताना दिसते. अशा वेळी फुटीच्या पेऱ्यातील अंतरसुद्धा वाढते. परिणामी काडी परिपक्वता लांबणीवर जाते. सायटोकायनीनचे प्रमाण वेलीमध्ये कमी झाल्यामुळे ही परिस्थिती दिसून येते. संजीवकांचा वापर जास्त प्रमाणात न करता शेंडा खुडणी, बगलफूट काढणे व स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची पूर्तता करून घ्यावी. उदा. ०-५२-३४ हे खत ३ ग्रॅम प्रति लीटर प्रमाणे फवारणी करणे. यामुळे वेलीची वाढ नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. काडीची परिपक्वता लवकर करून घेता येईल. ब) उशिरा छाटलेल्या बागेत एकतर सबकेन होऊन बगलफुटी निघालेल्या असाव्यात किंवा सरळ काडी असलेल्या वेलीवर नुकताच शेंडा पिंचिंग करून एक ते दोन पाने आल्याची स्थिती असेल. काही ठिकाणी नुकतेच सबकेन झाले अशी स्थिती असेल. अशा बागेत नुकत्याच झालेल्या पावसामुळे दोन ओळीमधील उपलब्ध व यापूर्वी वापरात न आलेली वेलीची मुळी जोमात कार्य करायला सुरुवात करते. आपल्या बागेत वेलीचे बोद व्यवस्थितरीत्या तयार होत नसल्यामुळे बोदामधून पाणी व त्यासोबत अन्नद्रव्ये मुळाच्या कक्षेतून वाहून जातात. ही अन्नद्रव्ये दोन ओळीच्या मध्यभागी जमा होतात. ज्या वेळी जोरात पाऊस होतो व मातीमध्ये ओलावा निर्माण होतो. पाणी मुळांपर्यंत पोचते. अशा वेळी पांढरी मुळी फार लवकर तयार होते. ही मुळी दोन ओळीच्या मध्यभागातून उपलब्ध असलेले अन्नद्रव्ये वर उचलून पुरवठा करते. या परिस्थितीला वेलीच्या वाढीस पोषक वातावरण आहे, असे म्हणतो. या वेळी नुकतेच सबकेन झालेले असल्याने सूक्ष्म घड निर्मितीची फक्त सुरुवात झालेली दिसेल. ही वेल वाढीच्या दुसऱ्या अवस्थेत ( सूक्ष्म घड निर्मितीची अवस्था) प्रवेश केलेली असेल. यावेळी मात्र काडीच्या प्रत्येक डोळ्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश पडणे गरजेचे असते. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे वेलीस आवश्यक तो सूर्यप्रकाश मिळणे शक्य नाही. अशा परिस्थितीतील बागेत संजीवकांचा वापर महत्त्वाचा असेल. यावेळी ६ बीए १० पीपीएम ची फवारणी केल्यानंतर चार ते पाच दिवसाने पुन्हा युरासील २५ पीपीएम प्रमाणे एक फवारणी करून घ्यावी. जमिनीत जास्त ओलावा व ढगाळ वातावरण असल्यास वाढीच्या या अवस्थेत ०-४०-३७ हे खत दोन ते तीन ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे तिसऱ्या दिवशी अशा चार ते पाच फवारण्या कराव्यात. यासोबत दीड ते दोन किलो प्रती एकर या प्रमाणे तीन दिवसाच्या अंतराने पाच ते सहा वेळा ठिबकद्वारे अन्नद्रव्याची उपलब्धता करावी. ज्या बागेत जोम जास्त आहे व जमीन सुद्धा काळी आहे, अशा बागेत ०-०-५० हे खत तीन किलो प्रती एकर या प्रमाणे एकदा जमिनीतून द्यावे. क) नवीन बागेत ओलांड्यावर मालकाडी तयार होत असल्याची परिस्थिती दिसून येईल. या वेळी तयार होत असलेल्या मालकाडीमध्ये सूक्ष्म घड निर्मिती सुरळीत व्हावी व तयार होत असलेला द्राक्ष घड मजबूत असावा, याकरिता खतांचा व संजीवकांचा वापर महत्त्वाचा असतो. सध्या झालेल्या पावसामुळे वेलीमध्ये आवश्यक असलेले सायटोकायनीन व जिबरेलीन्सचे गुणोत्तर संतुलित ठेवणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये ६ बीएच्या १० पीपीएम प्रमाणे एक ते दोन फवारण्या व युरासील ची २५ पीपीएम प्रमाणे एक फवारणी करून घ्यावी. ( ही फवारणी नेहमीच्या फवारणी व्यतिरिक्त असेल.) पहिल्या वर्षीच्या बागेत आवश्यक असलेली मालकाडी एकाच वेळी तयार करणे शक्य होत नसल्यामुळे ओलांडा दोन टप्प्यात तयार केला जातो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात झालेल्या काडीवर सूक्ष्म घड निर्मिती जवळपास होत आलेली असेल. परंतु, ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार करतेवेळी ओलांड्यावर निघालेल्या काड्या सूक्ष्म घड निर्मितीच्या अवस्थेत नुकताच प्रवेश केला होता. यावेळी पाऊस आल्यामुळे वेलीमधील शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये अडथळे तयार झाले. त्यामुळे यावेळी आपल्याला संजीवकांची मात्रा वाढवावी लागेल. या सोबतच ०-४०-३७ दोन ते तीन ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे काडी तळातून अर्ध्यापर्यंत दुधाळ रंगाची होईपर्यंत तीन दिवसाच्या अंतराने फवारणी करत राहावी. तसेच जमिनीतून एक ते दीड किलो प्रती एकर प्रमाणे दिवसाआड ठिबकद्वारे देत राहावे. ही उपलब्धता काडीवरील डोळा ठिसूळ होईपर्यंत सुरू ठेवावी. २) वादळी वाऱ्यामुळे फुटीचे नुकसान ः सध्या आलेल्या निसर्ग वादळामुळे बऱ्याचशा बागांचे नुकसान झालेले दिसते. या वादळामुळे काही बागा कोलमडल्या तर जोरदार वादळ, वारे व जोरदार पावसामुळे काडीवरील उपलब्ध पाने फाटली, काड्या मोडल्या तर काही ठिकाणी चांगल्या काडीवर जखम झालेली दिसून येते. मागे मंगळवार, ता. १२ मे रोजी ॲग्रोवन मध्ये प्रकाशित गारपीट संदर्भात लेखामध्ये या विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. सध्या वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता तयार झाल्यामुळे मोडलेल्या काडीवर झालेली जखम अडचणीची ठरू शकते. तेव्हा यावेळी बागेत कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटर किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे फवारणी करून घ्यावी. असे केल्यास पुढील काळात होणारा रोगाचा धोका टाळता येईल. पाऊस संपल्यानंतर या बागेत पानांच्या वाट्या होताना दिसून येतील. अशा परिस्थितीत ०-०-५० हे खत ३ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे दोन ते तीन फवारण्या करून घ्याव्यात. वातावरण सामान्य झाल्यास चिरलेल्या पानांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक फुटीवर दोन ते तीन पाने पुन्हा वाढवून घ्यावीत. काडीचा शेंडा मोडला असल्यास जखम झालेल्या एक डोळा खाली काप घेऊन पुन्हा फूट वाढवून घ्यावी. हे करताना फक्त स्फुरद आणि पालाश उपलब्ध असलेल्या ग्रेडचा वापर करावा. (उदा. ०-४०-३७) ३) रोग नियंत्रण ः सध्याच्या स्थितीत प्रत्येक द्राक्ष विभागात पावसाळा सुरू झाल्याची चिन्हे दिसत आहेत. वादळी वाऱ्यासोबत पाऊसही तितक्याच जोमात येत आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसून येते. या भागात जास्त प्रमाणात काळ्या रंगाच्या द्राक्ष जातींची लागवड आहे. या बागांत डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव सुरू होत असलेल्या स्थितीत पानांच्या वरील बाजूस तेलकट पिवळे गोलाकार डाग दिसून येतील. त्याच पानाच्या खालील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग म्हणजे मायसेलिया बिजाणूंच्या वाढीच्या रूपात दिसून येतील. शक्यतोवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जुलै व ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. मात्र, इतक्या लवकर दिसलेली लक्षणे ही मागील हंगामातील शिल्लक राहिलेल्या बिजाणूंमुळे असावीत. वाळवा या भागात मागील वर्षी पाऊस जास्त प्रमाणात व जास्त काळ टिकून राहिला. बऱ्याच बागा १० दिवसापेक्षा जास्त वेळ पाण्यात बुडून राहिल्या. परिणामी वेली अशक्त राहून रोग प्रतिकारक्षमता कमी झाली. अशा प्रकारच्या वेली कोणत्याही रोगास लवकर बळी पडतात. या रोगावर नियंत्रण ठेवण्याकरिता त्वरित मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू पी) दीड ते दोन ग्रॅम प्रती लीटर पाणी किंवा प्रोपीनेब (७० डब्ल्यू पी) ३ ग्रॅम प्रती लीटर पाणी यांची फवारणी फायद्याची ठरेल. कोणत्याही बुरशीनाशकाची फवारणी ही पाऊस नसलेल्या कालावधीत किंवा पाऊस संपल्यानंतर एक ते दोन तासाने करावी. ज्या बागेत जास्त प्रमाणात डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येतो, अशा बागेत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फोरीक अॅसिड ४ ग्रॅम प्रती अधिक मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रती लीटर पाणी चार ते पाच दिवसाच्या अंतरात दोन फवारण्या कराव्यात. या वर्षी डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर टाळावा. ट्रायकोडर्माची वेलीस नियमित उपलब्धता केल्यास या रोगाच्या बिजाणूंची संख्या कमी करण्यास मदत होईल. येत्या हंगामात जर जास्त जोरात पाऊस झाल्यास मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) किंवा प्रोपीनेब (७० डब्ल्यूपी) किंवा मेटीराम ३ ते ५ किलो प्रती एकर या प्रमाणे बागेत धुरळणी करून घेता येईल. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ डॉ. सुजय साहा, ०२०- २६९५६०३२ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.