फळछाटणीपूर्वी करावयाच्या उपाययोजना

फळछाटणीचा कालावधी सुरू होत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी माहिती घेऊ.
grapes advice by Dr. Somkuwar
grapes advice by Dr. Somkuwar

सध्या द्राक्षबागेत पावसाची उघडीप अनुभवास येत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अजूनही द्राक्षबागेत मुळांच्या कक्षेत पाणी जमा झालेले आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे बऱ्यापैकी पानगळ झालेली आहे. वाढीची परिपक्वता अजूनही झालेली नाही. या गोष्टींचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. फळछाटणीचा कालावधी सुरू होत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी माहिती घेऊ. मुळांचा विकास महत्त्वाचा फळछाटणीच्या पूर्वी मुळे कार्यरत असणे महत्त्वाचे असते. गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे मुळांच्या कक्षेत जास्त प्रमाणात पाणी जमा झालेले असेल. हलक्या जमिनीमध्ये जास्त पाऊस होऊनही मुळे इतकी खराब झालेली नसतील. कारण अशा प्रकारच्या जमिनीत मातीच्या कणांची संख्या कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. परिणामी मुळे खराब होत नाहीत. याच तुलनेत भारी जमिनीत असलेल्या द्राक्ष बागेत मुळांच्या कक्षेत उपलब्ध मातीच्या कणांची संख्या जास्त असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. म्हणून अशा जमिनीत मुळे काळी पडतात. या मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी होते. फळछाटणीनंतर डोळे फुटणे व घडाच्या विकासाचा विचार करता कार्यक्षम पांढरी मुळे विकसित होणे आवश्यक असते. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून नवीन मुळ्या तयार होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते. फळछाटणी पूर्वी नवीन मुळांची सुरवात होण्याकरिता बोद मोकळे असणे गरजेचे असेल. आपण प्रत्येक हंगामात जरी चारी घेऊन शेणखत टाकण्याची शिफारस केली जाते. मात्र, फळछाटणीच्या वेळी पाऊस सुरू असतो किंवा बोदातील माती ओली असते, त्यामुळे हे शक्य होत नाही. मात्र, अशा परिस्थितीत एकतर बोदाच्या बाजूने नांगराचे तास टाकून चारी घेणे फायद्याचे असेल. किंवा ज्या परिस्थितीत शक्य होते, तिथे बोदसुद्धा मोकळे करून घ्यावेत. फळछाटणीच्या पूर्वी चारी घेताना वेलीची मुळे १० टक्क्यांपेक्षा जास्त तुटणार नाही, याची काळजी घ्यावी.  हलक्या जमिनीमध्ये चारी घेणे शक्य होईल. तेव्हा घडाच्या विकासाच्या दृष्टीने मुळांचा विकास महत्त्वाचा समजावा.

फळछाटणीपूर्वी पानगळ गरजेची

  • द्राक्षबागेत फुटी एकसारख्या निघण्याच्या दृष्टीने छाटणीपूर्वी डोळे फुगणे महत्त्वाचे असेल. डोळे फुगण्याकरिता पानगळही महत्त्वाची असते. बागेतील पानांच्या उपलब्ध परिस्थितीनुसार (सशक्त कॅनोपी किंवा पानगळ झालेली कॅनोपी) पानगळीचा कालावधी ठरतो. 
  • ज्या बागेत वेलीवर पाने हिरवीगार, सशक्त आहेत, अशा ठिकाणी फळछाटणीच्या पंधरा दिवस आधी पानगळ करणे गरजेचे असेल. जर ५० ते ६० टक्क्यापर्यंत पानगळ झालेली असल्यास ८ ते १० दिवस आधी पानगळ करणे गरजेचे असेल. 
  • पानगळ ही दोन पद्धतीने केली जाते. 
  • रसायनांद्वारे 
  • हाताने पानगळ करणे.
  • पानगळ करून घेण्यापूर्वी वेलीस पाच ते सहा दिवस आधी पाणी बंद करावे. असे केल्यास वेलीस ताण बसून, त्याचे निष्कर्ष चांगले मिळतात. पुढील काळात छाटणीपर्यंत डोळे पूर्णपणे फुगलेले असतात. जर अन्नद्रव्ये काडीमध्ये पुरेसे असल्यास प्रत्येक डोळा चांगला फुगेल व फळछाटणीनंतर एकसारखी फूट निघून घडसुद्धा एकाच वेळी निघतील.     
  • काडीची परिपक्वता

    फळछाटणी घेतल्यानंतर परिपक्व काडीतून डोळा फुटण्याकरिता ७ ते ८ दिवस लागतात. काडी परिपक्व असल्यामुळे या काडीत अन्नद्रव्याचा साठासुद्धा तितकाच चांगला असावा. त्यामुळे फूटसुद्धा व्यवस्थित निघेल. घडसुद्धा मजबूत राहील.  काडी परिपक्व झालेली नसल्यास फळछाटणीनंतर पाच ते सहा दिवसामध्ये डोळा फुटायला सुरवात होईल. या काडीवर निघालेली फूट सुरवातीस जोमात वाढून पुढे वाढ थांबेल. अशा काडीवरून निघालेला घड एकतर बाळीत रुपांतरीत होईल किंवा गोळीघड तयार होण्याची शक्यता जास्त असेल. कोवळी असलेल्या काडीमध्ये अन्नद्रव्यांचा अभाव असतो. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. याकरिता फळछाटणीपूर्वी काडी परिपक्व करून घेणे गरजेचे असते. अन्यथा काडीच्या परिपक्वतेकरिता पुढील उपाययोजना कराव्यात. 

  • शेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात राहील, याकडे लक्ष द्यावे.
  • काडीवर निघालेल्या बगलफुटी काढून टाकाव्यात.
  • बागेत पाणी बंद करावे किंवा खत देण्यापुरताच पाण्याचा पुरवठा करावा.
  • पालाशची उपलब्धता जमिनीतून तसेच फवारणीद्वारे करावी. फवारणीद्वारे सल्फेट ऑफ पोटॅश ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दिवसाआड तीन ते चार फवारण्या कराव्यात. किंवा ०-४०-३७ हे खत २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ३ ते ४ फवारण्या दिवसाआड कराव्यात. 
  • प्रत्येक काडी उन्हात येईल, याकरिता काड्या तारेवर मोकळ्या कराव्यात. 
  • काडी पूर्णपणे परिपक्व झाली याची खात्री करण्याकरिता सबकेन असलेल्या बागेत सबकेनच्या गाठीच्या दोन डोळे पुढे कात्रीच्या साह्याने काडीचा काप घ्यावा. सरळ काडी असलेल्या परिस्थिती ८ व्या ते ९ व्या डोळ्याच्या मध्यभागी काप घ्यावा. या दोन्ही प्रकारच्या काडीवर दिसत असलेला पीथ जर पूर्ण तपकिरी रंगाचा असेल, तर छाटणीला सुरवात करण्यास हरकत नाही, असे समजावे.   : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ ( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com