उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड निर्मिती

काही भागामध्ये खरड छाटणी ही मे महिन्याच्या अखेरीपासून जून मध्यापर्यंत सुरू राहते. या भागामध्ये ढगाळ वातावरणामुळे सूक्ष्मघड निर्मितीमध्ये अडथळे येऊ शकतात. त्या टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना.
उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड निर्मिती
उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड निर्मिती

सध्याचे वातावरण ः सध्या द्राक्ष विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. त्याचे प्रमाण ६० ते ११३ मिलिमीटर इतके असल्याचे कळते. परिणामी तापमानात बऱ्यापैकी घट झाली असून, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रतासुद्धा ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोचलेली दिसेल. ज्या भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला, त्या भागात ही आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा अधिक झाली असावी. द्राक्ष बागेत खरड छाटणी ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत घेतली जाते. या स्थितीतील बागेत सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी हा मे महिन्याच्या शेवटपर्यंत असतो. यावेळी उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश व तापमान फायदेशीर असल्यामुळे सूक्ष्मघड निर्मितीला कोणतीही अडचण येताना दिसत नाही. परंतु, काही भागामध्ये खरड छाटणी ही मे महिन्याच्या अखेरीपासून जून मध्यापर्यंत सुरू राहते. सोलापूर जिल्ह्यातील पुळूज व कासेगाव (ता. पंढरपूर) या भागात ही छाटणी प्रामुख्याने उशिरा घेतली जाते. सूक्ष्मघड निर्मितीकरिता आवश्यक बाबी ः वेलीच्या काडीवरील डोळ्यात तयार होत असलेला प्रथिनाचा गोळा म्हणजेच सूक्ष्मघड होय. सूक्ष्मघड तयार होण्याकरिता आवश्यक बाबी खालील प्रकारे असतील. १) तापमान - सूक्ष्म घडनिर्मिती होण्याकरिता तापमान महत्त्वाची भूमिका निभावते. २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान हे सूक्ष्मघड निर्मितीकरिता फायदेशीर असते. जास्तीत जास्त सरासरी तापमान १८ अंश सेल्सिअस असल्यास सूक्ष्म घड निर्मिती चांगली होते. तापमान किमान व कमाल जर योग्य मर्यादेत असल्यास सूक्ष्म घड निर्मितीला कोणत्याही परिस्थितीत अडचण येत नाही. हे योग्य तापमान काही ठरावीक महिन्यातच उपलब्ध असते. २) सूर्यप्रकाश - काडीवर असलेल्या प्रत्येक डोळ्यावर एक सारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश जो पर्यंत मिळत नाही, तो पर्यंत सूक्ष्मघड निर्मिती होत नाही. ढगाळ वातावरण किंवा वेलीवरील दाट कॅनोपी हे दोन घटक बऱ्याच वेळा डोळ्यावर सूर्यप्रकाश न मिळण्यासाठी कारणीभूत ठरतात. दाट कॅनोपीमुळे जरी वातावरणात सूर्यप्रकाश उपलब्ध असला तरी त्या डोळ्यावर सूर्यप्रकाशाची उपलब्धता होत नाही. परिणामी त्या डोळ्यातील प्रथिनांचे उत्पादन अनालागन या अवस्थेत न होता बाळीमध्ये त्याचे रूपांतर होते. या करिता सूर्यप्रकाश सूक्ष्मघड निर्मितीच्या संदर्भातून आवश्यक असतो. प्रखर व जास्त काळ सूर्यप्रकाश असल्यास सूक्ष्मघड निर्मितीस चालना मिळते. या तुलनेत कमी प्रमाणात कमी वेळ उपलब्ध सूर्यप्रकाशामुळे त्याच डोळ्यामध्ये घड निर्मितीचे रूपांतर बाळीमध्ये होते. ३) अन्नद्रव्याची उपलब्धता ः सूक्ष्मघड निर्मिती होण्याकरिता अन्नद्रव्यांची भूमिकाही महत्त्वाची असते. अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे तीन महत्त्वाचे घटक असून, त्यामुळे सूक्ष्मघड निर्मिती चांगल्या तऱ्हेने होते किंवा नुसतीच वेलीची शाकीय वाढ करून घड जिरण्याची समस्या उत्पन्न होते. फुटीची वाढ होण्याकरिता नत्राची उपलब्धता गरजेचे असते. खरड छाटणीनंतर सुरुवातीच्या काळात नत्राचा वापर महत्त्वाचा असतो. नत्रामध्ये युरिया, अमोनिअम सल्फेट, डिएपी, १२.६१.० इ. ग्रेड्स उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून आपण वेलींची शाकीय वाढ करून घेतो. शाकीय वाढ झाल्यामुळेच काडीची वाढ होते. यावर उपलब्ध पानांमुळे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून काडीमध्ये गोळा होते. याच काडीवर आवश्यक असा जाड डोळा मिळतो. म्हणजेच सुरवातीच्या अवस्थेत नत्राची गरज आवश्यक असते. वाढीची दुसरी अवस्था म्हणजे सूक्ष्मघड निर्मितीची अवस्था होय. या अवस्थेत वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असेल. ही वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता नत्राचा वापर पूर्णपणे बंद करून स्फुरदाचा वापर करावा लागतो. स्फुरदाच्या वापरामुळे सूक्ष्मघड निर्मितीस काडीवरील डोळ्यामध्ये न्युक्लिक अॅसिड वाढवण्यास मदत होते. न्युक्लीक अॅसिडचे गुणोत्तर वाढल्यास काडीवरील डोळा ठिसूळ होतो. त्यामध्ये गर्भधारणा होण्यास चालना मिळते. स्फुरदामध्ये फॉस्फोरीक अॅसिड, १२,६१.०, ०-५२-३४, ०-४०-३७ इ. ग्रेडस उपलब्ध असतील. जमिनीचा प्रकार व बागेतील वेलीच्या वाढीची अवस्था पाहून वरील खताचा वापर करावा. ४) पाणी ः वेलीच्या वाढीकरिता व सूक्ष्मघड निर्मितीकरिता पाण्याची गरज वेगवेगळी असते. वाढीकरिता जास्त प्रमाणात पाणी आवश्यक असते. तर सूक्ष्मघड निर्मितीकरिता वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. परिणामी पाण्याची मात्रा अर्ध्यापर्यंत आणावी लागेल. परंतु, उशिरा छाटलेल्या बागेत जास्त असलेल्या ओलाव्यामुळे सूक्ष्मघड धारणेत अडचणी येतात. काही उपलब्ध अहवालानुसार पाण्याची उपलब्धता बाष्पोत्सर्जनाच्या ६० आणि ८० टक्के असल्यास सूक्ष्मघड निर्मिती चांगली होते. आपल्या बागेत या अवस्थेत किती बाष्पोत्सर्जन झाले, यावर सूक्ष्मघड निर्मिती अवलंबून असेल. सूक्ष्मघड निर्मितीच्या कालावधीत एकतर जास्त पाऊस झाला असेल किंवा बागेत ठिबकद्वारे जास्त पाणी दिले गेले असेल. यांपैकी कोणत्याही परिस्थितीत फुटीची वाढ जोमात होईल. परिणामी दाट कॅनोपी तयार होईल. अशा प्रकारच्या कॅनोपीमध्ये सूक्ष्मघड निर्मितीकरिता आवश्यक सूर्यप्रकाश मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे सूक्ष्मघड होणार नाही. फुटींची वाढ जोमात होईल, पेऱ्यातील अंतर वाढेल, काडी हिरवी राहील. याचा परिणाम सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे सूक्ष्मघड निर्मिती होण्यास अडचणी येतील. ५) संजीवकांचे असंतुलन ः सूक्ष्मघड निर्मितीकरिता द्राक्ष वेलीमध्ये सायटोकायनीन व जिबरेलिनचे गुणोत्तर सांभाळणे गरजेचे असते. सायटोकायनीन हे सूक्ष्मघड तयार करण्याकरिता आवश्यक (अॅनालागनच्या) विकासास चालना देते. याच तुलनेमध्ये जिबरेलिनच्या वाढत्या प्रमाणामुळे याच सूक्ष्म घडाचे बाळीत रूपांतर होते. थंड वातावरण आणि दाट कॅनोपी ही वेलीमध्ये जिबरेनिनचे प्रमाण वाढण्यास फायदेशीर ठरते. सायटोकायनीन हे मुळांच्या टोकावर जास्त प्रमाणात तयार होते. मुळाचा विकास हा मातीचे व मुळाच्या कक्षेतील तापमान व्यवस्थित असल्यास (२५ ते ३० अंश सेल्सिअस) नवीन मुळी चांगल्या रितीने तयार होते. या मुळांच्या टोकावर सायटोकायनीनचे उत्पादन चांगले होते. सायटोकायनीनचे उत्पादन व वहन मुळाच्या टोकापासून झायलमद्वारे होते. हे वहन होण्याकरिता मातीतील वातावरण व तापमान महत्त्वाचे असते. जर मुळीच्या कक्षेत तापमान जास्त असल्यास सायटोकायनीनचे उत्पादन व वहन सहजरित्या होईल. उपलब्ध परिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे किंवा पाऊस झाल्यामुळे आवश्यक तापमान नाही. याचाच अर्थ सूक्ष्मघड निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या सायटोकायनीनची उपलब्धता या ठिकाणी शक्य नाही. अशा परिस्थितीतील बागेत काही ठिकाणी नुकतेच सबकेन झाले असावे. काही ठिकाणी फक्त फुटींची वाढ होत आहे. अशी परिस्थिती दिसून येईल. सूक्ष्मघड निर्मिती चांगली होण्यासाठी उपाययोजना ः अ) कॅनोपी व्यवस्थापन - या वातावरणात एकतर सूर्यप्रकाश कमी असेल व फुटीची वाढ जास्त जोमात होताना दिसून येईल. सूक्ष्मघड निर्मितीच्या कालावधीत वर चर्चा केल्याप्रमाणे आवश्यक तो सूर्यप्रकाश शेंडा पिंचिंग करणे, बगलफूट काढणे व डोळ्याच्या बाजूला असलेले टिकलीच्या आकाराचे पान काढणे महत्त्वाचे समजावे. डोळ्यावर सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असल्यामुळे यावेळी कॅनोपीमध्ये गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. या करिता वेली मिळालेल्या क्षेत्रफळानुसार काड्यांची संख्या निर्धारीत करून इतर फुटी काढून घ्याव्यात. (प्रमाण - उपलब्ध प्रती वर्गफूट अंतरासाठी अर्धी काडी). बऱ्याच बागेमध्ये काड्यांची संख्या यापेक्षा जास्त असते. परंतु उशिरा छाटलेल्या बागेमध्ये सूक्ष्मघड निर्मिती चांगली होण्यासाठी काड्यांची संख्या वर दिल्या प्रमाणे असावी. ब) संजीवकांचा वापर - सूक्ष्मघड निर्मितीकरिता आवश्यक असलेली संजीवके म्हणजे सायटोकायनीन. सायटोकायनीन उपलब्ध संजीवकांपैकी (उदा. ६ बीए, युरासील, सीपीपीयू इ.) ६ बीए आणि युरासीलचा वापर केला जातो. हा वापर सबकेनच्या नंतर निघालेल्या बगलफुटीच्या तीन ते चार पानाच्या अवस्थेपासून करता येईल. सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे संजीवकांची मात्रा कदाचित वाढवावी लागेल. बगलफुटीवर सात ते आठ पानाच्या अवस्थेपर्यंत तसेच सरळ काडी ठेवलेल्या बागेत १० ते ११ पानावर शेंडा पिंचिंग केल्यानंतर निघालेल्या फुटीच्या दोन पानापासून सहा पानांपर्यंत करता येईल. साधारणतः दोन वेळा ६ बीए आणि एक वेळा युरासीलची फवारणी सूक्ष्मघड निर्मिती करिता पुरेशी असते. बरेच बागायतदार उशिरा छाटलेल्या बागेत संजीवकांचा भडिमार करतात, त्यामुळे काडीवर गाठी येणे, काडीवर चिरा जाणे व वाढ थांबणे इ. गोष्टी आढळून येतात. हे टाळण्याकरिता मोजक्या फवारण्या करून कॅनोपी व अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनावर जोर देता येईल. यामध्ये स्फुरदाचा वापर महत्त्वाचा ठरेल. ०-४०-३७ हे खत २ ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे पाच ते सहा फवारण्या करता येतील. जमिनीतून सुद्धा वीस दिवसापर्यंत ठिबकद्वारे एकरी एक ते दीड किलो या प्रमाणे पूर्तता करता येईल. जास्त काळी जमीन असलेल्या बागेत ०-०-५० ची उपलब्धता फवारणी व ठिबकच्या माध्यमातून केल्यास वाढ नियंत्रणात ठेवता येईल. क) कीड व रोग व्यवस्थापन ः ज्या बागेत नुकताच पाऊस संपला व तापमान वाढीस लागले, अशा बागेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे फुटीची वाढ जोमात होईल. शेंडा वाढत असलेल्या परिस्थितीत नवीन फुटीची लवचिकता वाढेल. अशा वेळी थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव दिसून येईल. याचा परिणामी शेंड्याकडील पानांच्या वाट्या होताना दिसून येतील. किडीने रस शोषून घेतल्यामुळे आवश्यक तितका पानांचा आकार मिळणार नाही व वाढ खुंटेल. काडी बारीक राहून अन्नद्रव्यांचा साठासुद्धा होणार नाही. सतत दोन ते तीन पाऊस सुरू असल्यास याच फुटीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून येईल. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी कोवळ्या फुटी काढून टाकण्याची शिफारस असते. परंतु, उशिरा छाटलेल्या बागेत कॅनोपी पूर्ण झालेली नसल्यामुळे शेंडे खुडणे शक्य नाही. अशा वेळी करपा रोगाचे नियंत्रण गरजेचे होईल. थ्रिप्स नियंत्रणाकरिता, फवारणी प्रती लीटर पाणी इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम किंवा फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६ ग्रॅम करपा नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम. जैविक नियंत्रणाचे उपाय यावेळी फायद्याचे ठरू शकतात. त्यासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे एक ते दोन फवारण्या उपयुक्त ठरतील. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com