सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी वातावरण तयार झालेले दिसेल. बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक वाढलेले दिसते. सततचे ढगाळ वातावरणामुळे वेलीस आवश्यक तो सूर्यप्रकाशही मिळत नाही. यामुळेच बाष्पीभवनही कमी आहे. अशा वेळी बागेत उपलब्ध वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना... १) ओलांड्यावर मुळे येणे वेलीची महत्त्वाची व कार्यक्षम मुळे जमिनीमध्ये बोदात असतात. ही मुळे जमिनीत उपलब्ध केलेल्या अन्नद्रव्य व पाण्यांपैकी वेलीस आवश्यक ती अन्नद्रव्ये वर उचलून वेलीच्या वाढीसाठी मदत करते. ही मुळे कार्यक्षम राहण्यासाठी जमिनीतील परिस्थिती महत्त्वाची असते. उदा. हवा खेळती राहणे गरजेचे असेल. परंतू, बागेत पाऊस जास्त झाल्याने जमिनीतील प्रत्येक कणांमध्ये पाणी जमा झाले असल्यास उपलब्ध मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ही मुळे काळी पडताना दिसून येतात. ही मुळे काळी पडण्यासाठी फक्त पाऊसच जबाबदार नसेल, तर बोदावरील यंत्रे व माणसांची होणारी हालचाल, दोन ओळीतील कमी केलेले अंतर व त्यामुळे मुळीच्या कक्षेवरूनच चालणारा ट्रॅक्टर यांचाही परिणाम मुळीच्या कार्यक्षमतेवर होतो. तसेच पांढरी मुळे तयार होत नसल्याचे दिसून येईल. अशा या बऱ्याच स्थितीमध्ये बोदातील मुळे काळी पडलेली असतील. द्राक्ष वेल या अकार्यक्षम मुळांमुळे आपली गरज पूर्ण करण्याकरिता खोड, ओलांडा यासारख्या वरील भागांवर मुळे तयार करते. (याला इंग्रजीमध्ये एरियल रुट्स म्हणतात.) वर तयार झालेल्या या मुळांद्वारे हवेतील बाष्प व अन्नद्रव्यांचा पुरवठा करून आपली तात्पुरती गरज पूर्ण करते. जेव्हा पाऊस संपून तापमान वाढताना बोदातील पाणी कमी झाल्यानंतर वापसा स्थिती निर्माण होते, तेव्हा बोदातील मुळे कार्य करायला लागतात. अन्नद्रव्यांचा पुरवठा सुरळीत होतो. यानंतर ओलांडा किंवा खोडावर असलेली मुळे काळी पडून कार्य करणे बंद करते. या परिस्थितीचा वेलीवर जास्त विपरीत परिणाम होत नसला तरी वरील मुळे सुकणे व बोदातील मुळे कार्यरत होणे यामध्ये काही कालावधी राहू शकतो. या कालावधीमध्ये जर वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये तफावत निर्माण झाल्यास अडचणी तयार होतात. बागेतून पाण्याचा निचरा जितका चांगला होईल, तितकी मुळे कार्यक्षम राहण्यास मदत होते. एकतर बोद मोकळा राहण्याकरिता बोद टाचून घ्यावा. किंवा दोन ओळीमध्ये एक तास नांगराचा सुमारे दोन फूट खोल टाकून घेतल्यास बोदातील पाणी या चारीद्वारे निचरा होईल. नांगराचे तास टाकल्याने मुळे तुटून त्याचा वेलीच्या वाढीवर काही विपरीत परिणाम होतील का, अशा शंका बागायतदारांना येतात. मात्र, काडी परिपक्तवेच्या अवस्थेत वाढ नियंत्रणात असते किंवा ठेवली जाते, त्यामुळे ही चारी घेण्याचे बरेच फायदे दिसून येतील. २) काडी परिपक्वतेच्या अडचणी बऱ्याचशा बागेमध्ये सततच्या पावसामुळे वेलीमधील जिबरेलीन्सचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. परिणामी शेंडा वाढ जास्त प्रमाणात होताना दिसून येईल. ही शेंडा वाढ होण्याकरिता आवश्यक असलेली अन्नद्रव्ये नुकत्याच परिपक्व होत असलेल्या किंवा झालेल्या काडीमधून घेतले जाते, त्यामुळे या काडीत लिग्निन या घटकांचे उत्पादन कमी होते. या वाढीचा वेग जितका जास्त असेल, तितक्याच प्रमाणात अन्नद्रव्ये काडीतून व पानातून शोषून घेते. वेलीमधील जुन्या पानांवर अन्नद्रव्यांची (लोह, मॅग्नेशिअम आणि पोटॅश) कमतरता दिसून येते. या वेलीवर पाने अशक्त झाल्यामुळे रोगांना लवकर बळी पडतात. काडीवर आवश्यक असलेल्या १६ ते १७ पानांनंतर आलेल्या नव्या फुटी आणि पाने ही अनावश्यक असतात. ही पाने राखल्यास फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. उपाययोजना ः
३) तणनाशकाच्या फवारणीमुळे येणाऱ्या अडचणी
पावसाळी वातावरणामध्ये बागेत तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. जितक्या प्रमाणात वेलीची वाढ होत असते, तितक्याच प्रमाणात बागेत कधी न दिसणारे गवतेही जोमाने वाढलेली दिसून येतात. या गवतामध्ये मुख्यतः हराळी, लव्हाळा, केना, पार्थेनियम, घोळ यांचा समावेश असतो. उपलब्ध मजुरांची गरज यावेळी शेंडा खुडणे, बगलफुटी काढणे व फुटी तारेवर बांधणे यासाठी अधिक असते. त्यामुळे खुरपणी करिता मजूर मिळत नाहीत. यामुळेच बागायतदारांचा तणनाशकांचा वापर करण्याकडे कल वाढत आहे. तणनाशकांमुळे गवताचा नायनाट होतो. मात्र, जर वापर योग्य प्रकारे केला न गेल्यास अडचणी येऊ शकतात. बऱ्याच वेळा लगतच्या ऊस क्षेत्रामध्ये तणनियंत्रणासाठी फवारलेल्या २ -४ डी सारख्या तणनाशकांमुळे द्राक्षबागेचे नुकसान झालेले दिसून येते. द्राक्षबागेमध्ये केवळ स्पर्शजन्य तणनाशकांना लेबल क्लेम आहेत. मात्र, आसपासच्या शेतामध्ये फवारणीसाठी वापरली जाणारी स्पर्शजन्य व आंतरप्रवाही तणनाशके फवारणी करतेवेळी वेलीवर हवेमुळे उडतात. त्यामुळे द्राक्ष पानांवर स्कॉर्चिंग येते, पाने जाड व खरबरीत होतात. तसेच पानाच्या वाट्याही झालेल्या दिसतात. जर रुट स्टॉकची सकर्स तसेच राहिलेले असल्यास आंतरप्रवाही तणनाशके वेलीच्या शरीरात जाऊन फुटी सुकायला सुरुवात होते. काही परिस्थितीत शेंडे वाकलेले दिसतील, तर वेल सुकलेली दिसेल. वेलीवर होणारे तणनाशकांचे अनिष्ट परिणाम हे तणनाशक किती प्रमाणात उडाले यावर अवलंबून असेल.
ही परिस्थिती टाळण्याकरिता...
४) रोग नियंत्रण सततचा पाऊस व वाढलेल्या आर्द्रतेमुळे बऱ्याचशा बागेत नव्या फुटींची वाढ जास्त होताना दिसते. पाऊस जर सतत दोन तीन दिवस सुरू असल्यास करपा, जिवाणूजन्य करपा व डाऊनी मिल्ड्यू या तिन्ही रोगांची समस्या दिसून येईल. रोग नियंत्रणाकरिता उपाययोजना -
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.