मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्क
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्क

मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्क

नुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये बऱ्यापैकी तापमान कमी झाले, आर्द्रता वाढली असून, पाऊस संपल्यानंतर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये बऱ्यापैकी तापमान कमी झाले, आर्द्रता वाढली असून, पाऊस संपल्यानंतर पुढे काही अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. मणी तडकणे व कुजण्याची समस्या ः पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेत द्राक्षघड असलेल्या बागांमध्ये पाऊस झालेला असल्यास मणी तडकण्याची समस्या जास्त आढळत आहे. या बागेत प्रत्येक घडामध्ये एक किंवा दोन मणी तडकलेले दिसत असल्यास असे मणी आधी काढून घ्यावेत. ते बागेच्या बाहेर सुमारे दोन फूट खोलीच्या खड्ड्यात पुरावेत. या तडकलेल्या मण्यामुळे मणी सडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याच प्रमाणे तडकलेल्या मण्यांवर माश्‍या किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा स्थितीत काटेकोरपणे व्यवस्थापन महत्त्वाचे असेल. या बागेत ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या घेतल्यास फायदा होईल. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढलेली असल्याने जैविक रोगनियंत्रण घटक चांगल्या प्रकारे कार्य करतात. ज्या द्राक्ष भागामध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तिथे मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागांमध्ये आधीच योग्य तितका ओलावा (फिल्ड कॅपॅसिटी) असल्याची खात्री करून घ्यावी. परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पाणी दिल्यामुळे मण्यातील अंतर्गत दाब (टर्गर प्रेशर) आधीच तयार होतो, त्यामुळे पुढे पाऊस आल्यास दाब येत नाही. या उपाययोजनेमुळे पुढील काळात मणी क्रॅकिंग होण्याची शक्यता कमी असेल. पाऊस झालेल्या स्थितीतील बागेत एकतर पावसापूर्वी किंवा पाऊस संपल्यानंतर लगेच कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी. यामुळे परिस्थिती काही अंशी नियंत्रणात राहील. दहिवर, दव व धुके वाढण्याची शक्यता ः पाऊस झालेल्या ठिकाणी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत धुके टिकून राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वेलीच्या पानावर दवबिंदूही जास्त काळ टिकून राहतील. यामुळे काही दिवसापूर्वी नियंत्रणात आलेले डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू या वेळी पोषक वातावरण मिळाल्यामुळे पुन्हा कार्यरत होतील. यापुढील काळात तापमान जरी वाढले आर्द्रता काही काळ टिकून राहिल्यामुळे रोगाचे बीजाणू नियंत्रणात आणण्यात अडचणी येतील. पाणी उतरल्यानंतरच्या अवस्थेतील द्राक्ष बागांमध्ये या वेळी बुरशीनाशकांची फवारणी करणे टाळले जाते. अशा काळात रोगनियंत्रण कसे करावे, ही समस्या पुढे येते. या वेळी ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस सबटिलिस या जैविक घटकांचा वापर करणे फायद्याचे होते. या सोबत अवशेष राहू नये याकरिता द्राक्ष संशोधन केंद्राने तयार केलेल्या ‘अनेक्श्‍वर ५’चा वापर करणे गरजेचे समजावे. बागेत निघालेल्या बगलफुटी वेळीच काढून घडाच्या विकासात आवश्यक असलेल्या पानांची योग्य संख्या ठेवलेली असल्यास या वेळी अडचणी कमी येतील. उपलब्ध कॅनोपी किंवा पाने या गोष्टीचा विचार आधीच नियोजनात केलेला असल्यास समस्या फारशा जाणवणार नाही. अनावश्यक फुटी, घडाच्या मागील दोन ते तीन व घडाच्या पुढील एक पान काढून टाकल्यास त्या घडाला आवश्यक तो सूर्यप्रकाश व्यवस्थितरीत्या मिळेल. उपलब्ध कॅनोपीमध्ये हवा खेळती राहील. या वेळी जरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला तरी बुरशीनाशकांची फवारणी केल्यास कव्हरेज चांगली होऊन परिस्थिती लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल. कमी तापमान ः बऱ्याचशा भागामध्ये अजूनपर्यंत हिवाळ्याची चाहुल जाणवलेली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या पावसानंतर पूर्ण ढगाळ वातावरण निघून गेल्यानंतर थंडी वाढण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान कमी झाल्यास पिंक बेरी येण्याची समस्याही उद्‍भवू शकते. यावर प्रभावी उपाययोजना सध्या जरी उपलब्ध नाही. मात्र पेपरने घड झाकून घेणे, हाच एक उपाय दिसत आहे. वातावरणातील कमाल व किमान तापमानात फार तफावत पडल्यास वेळी मण्यातील उपलब्ध हिरव्या रंगद्रव्यांचे रूपांतर गुलाबी रंगात होते. यालाच आपण ‘पिंक बेरी` असे म्हणतो. मण्यात पाणी उतरण्याच्या १२ ते १५ दिवसांपूर्वीपर्यंतच्या बागेत ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. या वेळी बागेत वातावरण ढगाळ व कमी तापमान असल्यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असू शकतो. तेव्हा द्राक्ष घड पेपरने झाकण्यापूर्वी भुरी रोग व मिलीबगच्या नियंत्रणासाठी आपण प्रभावी उपाययोजना केलेल्या आहेत, याची खात्री करून घ्यावी. तापमान कमी झालेल्या परिस्थितीत वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग कमी झालेला दिसतो. अशा परिस्थितीत मण्याचा विकासात अडचणी येतात. या वेळी मुळांची कार्यक्षमता कमी झाल्याचे दिसून येते. मण्याच्या विकासाची अवस्था संपली की आवश्यक त्या आकाराचा द्राक्ष घड मिळणे शक्य होत नाही. या गोष्टीचा विचार करून बागायतदार संजीवकांच्या एक ते दोन फवारण्यांची (जीए आणि सीपीपीयू, ६ बीए) घाई करतात. हे चुकीचे ठरू शकते. यामुळे मण्याची साल जाड होऊन मण्यात गोडी उतरण्यास विलंब होतो. बऱ्याचदा अशा बागेत फळ काढणीही उशिरा होते व वेलीस ताण बसतो. तेव्हा बागेत संजीवकांची फवारणी करण्यापेक्षा मुळांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. मुळांचे कार्य सुरू होण्यासाठी बोद थोडेफार खोदून घ्यावेत किंवा मोकळे करावेत किंवा बोदाच्या बाजूने छोटीशी चारी घ्यावी. मात्र असे करताना वेलीची मुळे ५ टक्क्यांपेक्षा जास्त तुटणार नाही, याची काळजी घ्यावी. या सोबत बोदावर मल्चिंग करून बागेमध्ये जास्त प्रमाणात पाणी दिल्यास बागेतील वातावरणात तसेच मुळांच्या कक्षेत तापमान वाढण्यास मदत होईल. मुळे पूर्ववत कार्य करून वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढेल. या वेळी स्फुरदयुक्त खतांचा वापर करणे तितकेच गरजेचे असेल. फॉस्फोरिक ॲसिड किंवा ०-४०-३७ किंवा ०-५२-३४ अशा खतांचा वापर या वेळी फायद्याचा ठरू शकतो.

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे, महाराष्ट्र)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com