रोगाच्या प्रादुर्भावाची संभाव्य कारणे जाणून करा उपाययोजना
रोगाच्या प्रादुर्भावाची संभाव्य कारणे जाणून करा उपाययोजना

द्राक्ष : रोगाच्या प्रादुर्भावाची संभाव्य कारणे जाणून करा उपाययोजना

गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये साधारणपणे रोज पाऊस सुरू आहे. यामुळे बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यू, करपा, जिवाणूजन्य करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. नाशिक, सोलापूर, सांगली व कर्नाटक येथील विजापूर भागामध्ये काही ठिकाणी ही समस्या आढळून येते. बागेमध्ये बुरशीनाशकांची फवारणी करूनबी रोगनियंत्रणामध्ये येत नसल्याचे चित्र आङे. महागड्या बुरशीनाशकांचा वापर करून बागेमध्ये रोग पुन्हा तसाच असल्याचे समजते. अन्य रोगापेक्षा डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त बागेत आहे. हा रोगनियंत्रणामध्ये येत नसल्याची ही कारणे असू शकतात. १) सततचा पाऊस ः सततच्या पावसामध्ये बागेतील तापमान कमी झाले असून आर्द्रता वाढली आहे. या परिस्थितीमध्ये द्राक्ष वेलीची पानेही अधिक काळ ओळी राहत असून, बागेतील कॅनोपीमध्ये रोगासाठी पोषक वातावरण तयार झाले. बुरशीनासशकांची फवारणी केल्यानंतर पुन्हा काही काळामध्ये पाऊस सुरू झाला. फवारणीचे चांगले निष्कर्ष मिळण्यासाठी काही काळ कोरडे वातावरण गरजेचे असते. याच सोबत थोडाफार सूर्यप्रकाशसुद्धा गरजेचा असतो. यामुळे रोगनियंत्रण शक्य झाले नसावे. २) छाटणी झाली नसलेली बाग ः या बागेत सततच्या पावसामुळे नवीन फुटी जास्त प्रमाणात निघाल्यात. या फुटींकडे दुर्लक्ष झाले. बराच काळ या फुटी काढल्या गेल्या नसल्यामुळे डाऊनी मिल्ड्यू, करपा, बॅक्टेरियल ब्लाइट या रोगाचा प्रादुर्भाव या कोवळ्या फुटीवर जास्त दिसून येतो. डाऊनी मिल्ड्यूचे जिवाणू हवेतून, मातीतूनही प्रसार करतात. म्हणजेच छाटणी झालेल्या बागेच्या जवळपास असलेली ही जुनी छाटणी न झालेली बाग जास्त कारणीभूत ठरू सकते. या बागेत जास्त प्रमाणात सर्वच रोगाच्या प्रसाराकरिता रोगकारक घटक उपलब्ध असतात. बऱ्याच बागेमध्ये ही परिस्थिती दिसून येते. ३) एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतींचा वापर न करणे ः रोगाच्या नियंत्रणासाठी एकाच बुरशीनाशकांचाय वापर सातत्याने करण्याचे टाळले जाते. कारण यामुळे पानांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. बागेत फळछाटणी झाल्यानंतर वातावरणातील तापमानानुसार प्रत्येक ३-४ दिवसांत एक नवीन पान निघताना दिसून येईल. या पानांच्या अंतर्गत भागामध्ये बुरशीनाशक गेल्यास किंवा या पानांद्वारे फवारणीचे बुरशीनाशक शोषून घेतले गेल्यास पानांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. या करिता आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा फवारणी पानांच्या या अवस्थेत करणे गरजेचे असते. एका फवारणी झाल्यानंतर पानांद्वारे रसायनांचे परिणाम मिळण्याकरिता २-३ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. याचा अर्थ बागेत रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या फवारणीचे वेळापत्रक वाढीच्या अवस्थेनुसार ठरवल्या जाते. कदाचित फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर आपल्या बागेमध्ये जास्त प्रमाणात झाला असल्यामुळेही डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढला असावा.

४) वेलीच्या वाढीचा जोम ः पावसाळी वातावरणामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली जास्त जोरात होतात. याचाच अर्थ या वेळी बागेत वाढ जास्त जोमात होते. ही वाढ जास्त जोमात झाल्यास वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. या वेळी पानांची लवचिकता वाढल्यामुळे पानांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते. अशा या परिस्थितीमुळे वेलीची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वेलीत उपलब्ध असलेले जैवरसायने उदा. फिनॉलिक्सचे प्रमाण घटते. त्यामुळेच ही वेल रोगास लवकर बळी पडते. तेव्हा बागेत या फुटी जर वेळीच काढल्यास व त्या सोबतच वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता उपाययोजना केल्यास त्याचा फायदा होतो. यासाठी वेलीस पालाशची उपलब्धता गरजेची असते. रोगनियंत्रणासाठी उपाययोजना ः

  • बागेतील कॅनॉपी ः बागेतील कॅनॉपी मोकळी राहील, याची काळजी घ्यावी. यामद्ये फेलफूट शक्य तितक्या लवकर काढणे. या वातावरण नवीन फुटीवर बगलफुटी जास्त प्रमाणात येताना दिसतील. तेव्हा बगलफुटी काढून टाकाव्यात. सोबतच नवीन फुटींच्या तळातील २-३ पाने काढावीत. यामुळे रोगास आवश्यक ते वातावरण तयार होणार नाही.
  • ज्या बागेत फुलोरा व त्यापुढील अवस्था आहे, अशा ठिकाणी घडाच्या पुढील काळात भुरी रोगाचा प्रादुर्भावसुद्धा कमी करण्यास मदत होईल.
  • बागेत पालाशची उपलब्धता फुटीचा जोम बघूनच करावी. या वेळी पालाशची गरज महत्त्वाची आहे.
  • ज्या बागेत दाट कॅनॉपी आहे, अशा ठिकाणी डाऊनी मिल्ड्यूच्या जास्त दिसतो. या वेळी पानांवर फवारणीचे कव्हरेज महत्त्वाचे असते.
  • बऱ्याच वेळा आपण ५० टक्के कॅनॉपी कव्हरेज झाले, की रोगनियंत्रण होईल असे समजतो. परंतु बिघडलेल्या वातावरणामुळे रोगाचा प्रसार पन्हा जलद गतीने होतो.
  • काही बागेत मोकळ्या कॅनॉपीमध्ये किंवा एकदम वरच्या भागात डाऊनी मिल्ड्यूचा प्रसार झालेलाही दिसून येईल. याला कॅनॉपी नाही तर निर्माण झालेले पोषक वातावरण कारणीभूत असेल, तेव्हा या वेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा फायदा होऊ शकतो.
  • दाट कॅनॉपी असलेल्या बागेत धुरळणी काम करेल.
  • बागेत बऱ्याच वेळा अमिनो ॲसिड रूपातील संजीवके देण्याचा आपण प्रयत्न करतो. हे एक टॉनिकच्या रूपात कार्य करते. बागेत आधीच वाढीचा जोम जास्त आहे. पुन्हा या संजीवकांच्या वापरामुळे वाढ जास्त होईल. त्याने पान अशक्त होऊन नंतर रोगास बळी पडते.
  • डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com