मुसळधार पावसाने दाणादाण

बीड : नागापूर (ता. परळी, वैजनाथ) येथील वाण धरण भरले आहे
बीड : नागापूर (ता. परळी, वैजनाथ) येथील वाण धरण भरले आहे

पुणे : हवेचा दाब कमी झाल्याने राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, हवेली, वेल्हा, खेड, मावळ, मुळशी तालुक्‍यांतही पावसाने चांगली हजेरी लावली. वडगाव मावळ तालुक्‍यातील काले मंडळात ४५, कार्ला मंडळात २५ मिमी पावसाची नोंद झाली. दौंड तालुक्यातील देऊळगाव व पाटस मंडळांत अतिवृष्टी झाली. देऊळगाव मंडळात १०० मिलिमीटर तर पाटस मंडळात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. बुलडाणा तालुक्‍यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आल्याने काही काळ बुलडाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्‍यांमध्येही पाऊस झाला. विदर्भातील कवठळ मंडळात ४० मिलिमीटर, उंद्री ४२.२, बुलडाणा ५३, मेहकर ४४, शेलगाव ४८, लोणी ५३, अंजनी ५०, दुसरबीड ६५, शेगाव ४१, मनसगाव ४४, दाताळा ४९, नरवेल ५१, जांभूळधाबा ६५, पिंपरी ५०, महाळुंगी ४४, आलेगाव ४५, कापशी ७३, बोरगाव ५८, शिवणी मंडळात ५९ मिलिमीटर झाला.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडळांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील जांब (ता. मुखेड) येथे सर्वाधिक १०५ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर, जळकोट, निलंगा तालुक्‍यांत दमदार पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, भूम व परंडा तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी तालुक्‍यांत पावसाची हजेरी दमदार राहिली.

नांदेड जिल्ह्यातील ३७ मंडळांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. जांब मंडळामध्ये १०५ मिलिमीटर, मुखेड ४५, लोहगाव ४०. परभणी जिल्ह्यातील सावंगी म्हाळसा मंडळामध्ये ४० मिलिमीटर, बोरी ३६, बामणी २०, झरी २६ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सिरम मंडळामध्ये ३८ मिलिमीटर, तर हिंगोली २६, माळहिवरा २६, आखाडा बाळापूर ३३, डोंगरकडा ३२, साखरा १७, औंढा नागनाथ २५, येळेगाव २२, साळणा १७ मिलिमीटर पाऊस झाला. 

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, ऊस, बाजरी मका आदी पिके कोलमडून पडली आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील बेलवडे व तासवडे परिसरांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील केळीच्या बागा तसेच उसाचे पीक झोपल्याने मोठे नुकसान झाले आहे. सलग पाऊस सुरू असल्याने शेतात साचलेले पाणी तसेच राहत असल्यामुळे पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे ४२.७ मिलिमीटर पाऊस पडला. भुसावळ, रावेरातही पाऊस पडला. पावसासह सुसाट वारा असल्याने काहीसे पिकांचे नुकसान झाले. तर बैलजोडी, म्हशींचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मंडळात १०.१ मिलिमीटर, भुसावळ ३६.५, यावल २५.९, रावेर १९.६, मुक्ताईनगर २२.३, बोदवड मंडळात ४२.७ मिलिमीटर पाऊस झाला.

मांजरा, तेरणा नदीला पूर जोरदार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा व तेरणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील जवळपास ५० हेक्‍टरवरील सोयाबीन, कापूस, तूर, उडदाची पिके पाण्यात गेल्याची स्थिती शुक्रवारी सकाळी निर्माण झाली. दुसरीकडे कसबे तडवळे, दुधगाव, जवळा, सातेफळ, सौदाणा, दहीफळ, गौर वाघोली, भोसा आदी गावशिवारांत झालेल्या जोरदार पावसामुळे तेरणा नदीही दुथडी भरून वाहत होती.

अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू  शेगाव तालुक्‍यातील जानोरी शिवारात जगन्नाथ ढोले यांच्या शेतात निंदण सुरू असताना पाऊस आला. यामुळे मजूर महिला निंबाच्या झाडाखाली उभ्या राहल्या. याच झाडावर वीज पडल्याने मीरा जगन्नाथ ढोले (वय २१) व रेखा लक्ष्मण वानखडे (वय ३७) या दोघी घटनास्थळीच ठार झाल्या. कांताबाई जगन्नाथ ढोले, वंदना संतोष वानखडे या जखमी झाल्या. मोताळा तालुक्‍यातील गुगळी शिवारात दुपारी वीज पडून विशाल भागवत कानडजे (वय २२, रा. रिधोरा खंडोपंत) याचा मृत्यू झाला. विशाल हा गुरे चारण्यासाठी गेला असता वीज पडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथे जनावरे चारण्यासाठी गावालगतच्या डोंगरावर गेलेल्या ज्ञानेश्वर उत्तम दिवटे (वय २५) याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथील गावालगतच्या डोंगरावर गुरुवारी (ता. १४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. 

जनावरे दगावली विल्हाळे (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथे वीजतारा तुटून त्याचा धक्का लागल्याने प्रशांत बाळकृष्ण पाटील यांच्या गोठ्यात बांधलेल्या एका बैलजोडीसह एक बकरी, एक बैल व तीन म्हशींचा मृत्यू झाला. भानखेडा (ता. बोदवड) येथे जगन ओंकार सुरवाडेस यांच्या सहा शेळ्या वीज पडल्याने दगावल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com