पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संगणकीय प्रारूप विकसित

पीक फेरपालटाची सांगड रोगांच्या उत्क्रांतीशी घालणारे प्रारूप विकसित
पीक फेरपालटाची सांगड रोगांच्या उत्क्रांतीशी घालणारे प्रारूप विकसित

येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा उद्रेक होण्याची स्थिती सातत्याने येणार आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ कीडनाशके उपयुक्त राहणार नाहीत; तर अन्य एकात्मिक मार्गांचा वापर वाढवावा लागणार आहे. पिकांची फेरपालट हा सर्व शेतकऱ्यांना ज्ञात असलेला एक चांगला मार्ग आहे. पिकांच्या फेरपालटीचे वेगवेगळे पॅटर्न कशाप्रकारे काम करतील, याचा अभ्यास जर्मनी येथील मॅक्स प्लॅन्क उत्क्रांती जीवशास्त्र संस्थेतील संशोधक करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक संगणकीय प्रारूप तयार केले आहे. पिकांच्या फेरपालटीसाठी योग्य ठरतील, अशी पिके निवडून त्याचे कीड रोगांवरील नियंत्रण, परिणाम व अर्थशास्त्रीय उपयुकत्ता तपासणे ही तशी वेळखाऊ बाब आहे. मॅक्स प्लॅन्क उत्क्रांती जीवशास्त्र संस्थेतील संशोधक मारिया बार्ग्युएस-रिबेरा आणि चैतन्य गोखले यांनी त्यासाठी खास संगणकीय प्रारूप तयार केले आहे. त्याची माहिती प्लॉस कॉम्प्युटेशनल बायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. पिकांची उत्क्रांती होत असताना त्यावरील सूक्ष्मजीव आणि किडी यामध्येही उत्क्रांतीची एक प्रक्रिया समांतरपणे सुरू असते. पूर्वीच्या अनेक संशोधनामध्ये पिकांची फेरपालट ही किडीच्या नियंत्रणासोबतच मातीच्या सुपीकतेसाठी फायद्याची ठरत असल्याचे पुढे आले आहे. त्याचप्रमाणे शेतीतील परिस्थिती किंवा पर्यावरणामध्ये बदल झाल्याने सूक्ष्मजीवांच्या वाढ, पुनरुत्पादन यावर मर्यादा येतात. त्यांना त्यांच्या एकूण जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावे लागतात. त्यासाठी त्यांची तयारी किंवा उत्क्रांती पूर्ण होण्याच्या आधी पुढील पीक फेरपालटाची वेळ येते. आतापर्यंत पीक फेरपालटाचा अभ्यास हा प्राधान्याने कीड, रोग नियंत्रण किंवा मातीच्या सुपीकतेच्या अनुषंगाने झाला आहे. तो उत्क्रांतीच्या अनुषंगाने फारसा झाला नाही. या अभ्यासामध्ये मारिया बार्ग्युएस-रिबेरा आणि चैतन्य गोखले यांनी या दोन्ही संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याला संगणकीय प्रणालींची जोड दिल्याने अभ्यासाचा वेग वाढणार आहे. आर्थिक व पर्यावरणाच्या फायद्यासाठी आर्थिक फायद्याच्या दृष्टीने घेतली जाणारी नगदी पिके किंवा व्यावसायिक पिके, जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीने घेतली जाणारी आच्छादन पिके यांचा पीक फेरपालटामध्ये प्राधान्याने विचार केला जातो. त्यातही रोगांचा उद्रेक हा प्राधान्याने नगदी पिकांवर अधिक होतो. मात्र, नियमितपणे हे बदल होत राहिल्यास त्यातील फायद्यांचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे दीर्घकालीन विचार करता पिकांची फेरपालट ही मातीची सुपीकता आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण काढणीपर्यंतच्या काळामध्ये कमी करण्यासाठी केली पाहिजे. त्याविषयी माहिती देताना मारिया बार्ग्युएस-रिबेरा म्हणाल्या की, आमच्या प्रारुपामध्ये उत्क्रांतीच्या सिद्धांतातील महत्त्वाच्या बाबींचा अंतर्भाव केला आहे. आजवर या गोष्टीकडे प्राधान्याने पाहिले गेले नव्हते. भविष्यामध्ये पर्यावरणाच्या समस्या आणि उत्क्रांतीची तत्त्वे यांचा सांगड वाढत्या अन्नधान्यांच्या मागणीशी घालावी लागणार आहे. कार्यक्षम, शाश्वत शेतीसाठी हे प्रारूप महत्त्वाची भूमिका निभावेल. भविष्यातील पिकाच्या फेरपालटासंदर्भात होणाऱ्या सर्व संशोधनामध्ये या प्रारुपांचा वापर करणे शक्य आहे. परिणामी, विशिष्ठ पिके आणि त्यावरील किडी, रोग यांना मर्यादित ठेवणे शक्य होणार आहे. त्याचा फायदा बुरशीनाशकांच्या वापरामध्ये घट होण्यासोबतच पर्यावरणासाठीही होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com