उत्तम उत्पादनासाठी बटाटा लागवडीमध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीकसंरक्षण या बाबींचा साक्षेपाने वापर केला पाहिजे.
बटाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि ट्युबरलायझेनच्या वेळी (बटाटा विकास काळ) विशेष तापमानाची गरज असते. बटाटा लागवड करताना रात्रीचे तापमान १८-२० अंश सेल्सिअस असणे महत्त्वाचे असते. साधारणतः नोव्हेंबरअखेरीस लागवड केल्यास पुढे वाढीसाठी २० ते २४ अंश सेल्सिअस आणि ट्युबरलायझनसाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान उपलब्ध असेल.
बटाटा कंदाची साठवण शीतगृहांमध्ये केलेली असल्यास, लागवडीपूर्वी किमान एक आठवडा बटाटे बाहेर काढून ठेवावेत. कंदावरील डोळे ज्वारीच्या दाण्याच्या आकाराचे असावेत. लागवडीसाठी साधारणतः २५ ते ४० ग्रॅम वजनाचा बटाटा कंद वापरावा. त्यापेक्षा मोठे बटाटे असल्यास आकार व वजनानुसार त्याचे दोन अथवा चार समान भाग करावेत. अशा कापणी केलेल्या कंदावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तो टाळण्यासाठी लागवडीपूर्वी प्रति हेक्टर कंदासाठी एक किलो मॅन्कोझेबची सुकी प्रक्रिया करून घ्यावी (बटाटा संशोधन केंद्र, डीसा, सरदार कृषी नगर, दांतीवाडा कृषी विद्यापीठ यांची शिफारस). नत्रयुक्त घटकांच्या पूर्ततेसाठी कंद ॲझोटोबॅक्टर २.५ किलो आणि द्रवरूप ॲसिटोबॅक्टर ५०० मिली प्रति १०० लिटर पाणी या द्रावणांमध्ये अर्ध्या तासासाठी बुडवून बीज प्रक्रिया करावी. जैविक घटकांच्या प्रक्रियेनंतर रासायनिक घटकांची प्रक्रिया करू नये. पश्चिम महाराष्ट्रासाठी, ६० x २० सें. मी. अंतराने लागवड करण्यासाठी प्रतिहेक्टरी १५-२० क्विंटल बियाणांची गरज असते. (महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी शिफारस) एक ओळ गादीवाफा पद्धतीने ५० सें.मी. x १५-२० सें.मी. अंतरावर लागवड करण्यासाठी २५-३० क्विंटर प्रतिहेक्टरी बियाणांची गरज असते. (सरदार कृषी नगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात शिफारस) दोन आणि चार ओळ गादीवाफा पद्धतीने लागवड करण्यासाठी ३५-४० क्विंटल प्रतिहेक्टरी बियाणांची गरज असते. दोन ओळ गादीवाफा पद्धतीने लागवड करण्यासाठी ७५ सें.मी. x १५-२० सें.मी. तसेच चार ओळ गादीवाफा पद्धतीने लागवड करण्यासाठी १५० सें.मी. x १५-२० सें.मी. अंतरावर लागवड करावी. बटाटा लागवडीपूर्वी सेंद्रिय खत २० टन, १०० किलो नत्र (युरिया २१७ किलो), ६० किलो स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट ३७५ किलो) आणि १२० किलो पालाश (२०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रतिहेक्टरी द्यावे. त्यातील ५० किलो नत्र (युरिया १०९ किलो) भर लावतेवेळी (लागवडीनंतर ३० ते ४० दिवसानंतर) द्यावे. (पश्चिम महाराष्ट्रासाठी, मफुकृवि, राहुरी शिफारस) बटाटा पिकासाठी विद्राव्य खतांची ठिबक पद्धतीने मात्रा दिल्यास खत मात्रेमध्ये बचत होऊन उत्पादनात देखील वाढ होते. ठिबक सिंचनासाठी २२० किलो नत्र , ११० किलो स्फुरद , २२० किलो पालाश प्रतिहेक्टर ठिबक पद्धतीतून द्यावे. पूर्ण नत्र आणि पालाश बटाटा लागवडीनंतर ९ दिवसांनी ६३ दिवसांपर्यंत ७ दिवसांच्या अंतराने ठिबकमधून (समान विभागून ९ वेळेस) द्यावे. स्फुरद पायाभूत स्वरूपात द्यावे. ठिबक पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास चार लिटर प्रतितास क्षमतेच्या ड्रीपरचा वापर करावा. दोन लॅटरलमधील अंतर दोन फूट ठेवावे. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये तापमान फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी असते म्हणून या महिन्यादरम्यान ४५ मिनिट दिवसाआड; तसेच फेब्रुवारी महिन्यात ६८ मिनिटे दिवसाआड ड्रिप चालू ठेवावे. एक ओळ गादीवाफा पद्धतीने लागवडीसाठी ठिबक पद्धतीने पाणी देण्यासाठी प्रत्येक ओळीसाठी एक लॅटरल वापरावी. दोन ओळ गादीवाफा पद्धतीसाठी दोन ओळींमध्ये एक आणि चार ओळ गादी वाफा पद्धतीसाठी दोन लॅटरल वापरावी. (बटाटा संशोधन केंद्र, डीसा शिफारस) पाण्याची गरज जमिनीचा प्रकार व वातावरणावर अवलंबून असते. ठिबक पद्धतीची उपलब्धता नसल्यास काळी पोयटायुक्त जमिनीमध्ये ८ ते ९ दिवसांच्या अंतराने एकूण आठ ते दहा पाण्याची जरुरी असते.मात्र, जमिनीत रेती मिश्रित कणांची मात्रा जास्त असल्यास पाच ते सात दिवसाच्या अंतराने एकूण १४ ते १५ पाण्याची गरज असते. शेतामध्ये जास्त पाणी साठल्यास मुळांची कूज होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. बटाटा पिकामध्ये ३० ते ४० दिवसांनी बटाटा कंदाची वाढ आणि विकास अवस्था सुरू होते. या काळात तण नियंत्रणासाठी खुरपणी करणे, वखरणी करणे सोयीस्कर नसते. कीड नियंत्रण बटाटा पिकांमध्ये रसशोषक किडी, स्पोडोप्टेरा अळी किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी...
बटाटा मुख्य पिकाच्या बॉर्डरवर मक्याची सापळा पीक म्हणून लागवड करावी. प्रतिहेक्टर ४० चिकट सापळे (स्टिकी ट्रॅप) लावावेत. लागवडीनंतर महिन्याच्या अंतराने निंबोळी तेल ५ मि.ली प्रतिलिटर पाणी तसेच गोमूत्र फवारणी करत राहावे. रासायनिक नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड (१७. ८ एसएल) ०.५ मिली प्रतिलिटर पाणी फवारणी करावी. स्पोडोप्टरा अळी नियंत्रणासाठी
रात्रभर गवताचे ढीग पिकात ठेवून सकाळी त्याखाली गोळा होणाऱ्या अळ्यांसह ते नष्ट करावेत. प्रतिएकर ४ ते ५ पक्षीथांबे करावेत. हेक्टरी ५ ट्रायकोकार्ड वापरावेत. रासायनिक नियंत्रणासाठी, क्विनॉलफॉस (२५ % ईसी)२ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. रोग नियंत्रण ः बटाटामध्ये स्कॅब, लवकर आणि उशिरा येणारा करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.
एकाच जमिनीमध्ये सातत्याने बटाटा लागवड करू नये. पिकांची फेरपालट करावी. बटाटा पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन तापवून द्यावी. बियाणे प्रक्रिया ः मॅन्कोझेब १ किलो याची सुकी प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रतिहेक्टर ५ किलो लागवडीच्या वेळी सेंद्रिय खतांमधून द्यावे. लवकर तसेच उशिरा येणारा करपाच्या रासायनिक नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. किंवा हेक्साकोनॅझोल (५ टक्के ) ०.५ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे लक्षणांच्या तीव्रतेनुसार फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. स्कॅब रोगाच्या नियंत्रणासाठी ठिबक पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करावे. एकाच जमिनीमध्ये वारंवार बटाटा पीक घेऊ नये. ः डॉ. पी. ए. साबळे ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, सरदारकृषिनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.)