भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
टेक्नोवन
तुषार सिंचनाने वाढवले कडधान्य पिकांचे उत्पादन
कडधान्य पिकांमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीमुळे पाण्यामध्ये सुमारे ४० टक्के बचत झाली असून, उत्पादनामध्ये ३४.८ टक्क्यानी वाढ झाली
हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी गटासोबत कडधान्य पिकांमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. या पद्धतीमुळे पाण्यामध्ये सुमारे ४० टक्के बचत झाली असून, उत्पादनामध्ये ३४.८ टक्क्यानी वाढ झाली. या तंत्राचा प्रसार आता सर्व बुंदेलखंड प्रांतामध्ये करण्याचे नियोजन फळबाग विभाग करत आहे.
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रांतातील हमिरपूर जिल्हा हा कडधान्यांचे कोठार म्हणून ओळखले जातो. या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी असून, सिंचनाच्या सुविधा फारशा नाहीत. येथील केवळ २७.७ टक्के कृषिक्षेत्र हे सिंचनाखाली असून, उर्वरित ७२.३ टक्के कोरडवाहू आहे. जे भाग सिंचनाखाली आहेत, तिथे कालवे हा सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. या टप्प्यामध्ये जमिनीमध्ये अधिक ओलावा राहत असल्याने कडधान्य पिकांमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवतो. या प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचन तंत्राचा अवलंब वाढविण्यासाठी हमिरपूर येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला. त्यांनी या विभागामध्ये सिंचन पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच कडधान्य पिकांचे मर रोगाने होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले.
सामान्यतः येथील कडधान्य उत्पादक शेतकरी पाटपाणी पद्धतीचा अवलंब करतात. मात्र पिकांच्या चांगल्या वाढीसाठी संवेदनशील अवस्थेमध्ये जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा असणे आवश्यक असते. पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच पाणी देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने तुषार सिंचन पद्धतीचा पुरस्कार केला.
निष्कर्ष ः
- कडधान्याची पेरणी ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरणी यंत्राद्वारे ३० सेंमी बाय १० सेंमी अंतरावर केली. रोपावस्थेमध्ये आणि फुलोरा अवस्थेच्या किंचित आधी असे दोन पाणी तुषार पद्धतीने देण्यात आले.
- तुषार सिंचन पद्धतीखालील कडधान्यांचे उत्पादन १७.३१ क्विंटल प्रति हेक्टर म्हणजेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये ६.०४ क्विंटल प्रति हेक्टरने जास्त होते. (३४.८ टक्के)
- तुषार सिंचन पद्धतीच्या शेतातील उत्पादन खर्च हा २२,७०० रुपये प्रति हेक्टर म्हणजेच २५०० रुपयांनी (११.० टक्के) कमी होता.
- एकूण हेक्टरी उत्पन्न ७९९७२ रुपये मिळाले. जे पारंपरिक पिकापेक्षा हेक्टरी २७,९०५ रुपये (३४.८ टक्के) जास्त होते.
- निव्वळ हेक्टरी उत्पन्न ५७,२७२ रुपये मिळाले, जे पारंपरिक पिकापेक्षा हेक्टरी ३०,४०५ रुपये (५३.० टक्के) जास्त होते.
- तुषार सिंचन पद्धतीचे नफा खर्च गुणोत्तर हे २.५२ ः १ इतके राहिले. पारंपरिक पिकामध्ये ते केवळ १.३२ ः१ इतके होते.
यशाचे तोरण
१) शेतकरी गट आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी राबवलेल्या या तुषार सिंचन तंत्राचे विश्लेषण करण्यात आले. त्यात नफा आणि खर्च यांचे गुणोत्तर हे ३४ टक्क्यांपासून ५२ टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आले. या तंत्रज्ञानाच्या यशामुळे राज्याच्या फळबाग विभागाने त्याचा प्रसार केवळ हमिरपूर जिल्ह्यापुरताच न करता संपूर्ण बुंदेलखंड प्रांतामध्ये करण्याचे नियोजन केले आहे.
२) पाण्याची बचत ः कडधान्य पिकांच्या आवश्यकतेइतकेच हलके पाणी पिकांच्या योग्य अवस्थेमध्ये तुषार सिंचन पद्धतीने दिल्याने पारंपरिक पाट पाणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पाण्यामध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी बचत झाली. अधिक पाण्यामुळे होणारा मर रोगाचा प्रादुर्भाव घटला.
---
(स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, हमिरपूर, उत्तर प्रदेश)
फोटो गॅलरी
- 1 of 22
- ››