यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या गुणवत्तेचा तांदूळ

यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या गुणवत्तेचा तांदूळ
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या गुणवत्तेचा तांदूळ

पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध विज्ञान आश्रम संस्थेने हातसडीच्या गुणवत्तेचा तांदूळ तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या तांदळाची उत्पादकता चांगली आहे. श्रम, मजुरी या बाबींत बचत करणाऱ्या या यंत्राची कार्यक्षमताही चांगली आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला बचत गटांना अशा प्रकारे यंत्राद्वारे तांदूळ तयार करून त्याचा ब्रॅंड विकसित करून आपले अर्थकारण उंचावणे शक्य होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील विज्ञान आश्रम संस्था सर्वत्र प्रसिद्ध आहे. संस्थेला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून समाजासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी निधी मिळाला. संस्थेने शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञानांची निर्मिती केली आहे. त्याचाच भाग म्हणून यंत्राद्वारे हातसडीच्या गुणवत्तेचा तांदूळ तयार करण्याच्या संकल्पनेला चालना मिळाली. उज्ज्वला गोसावी यांची स्वयंचलित तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करणारी संस्था हे उत्पादन विकसित करण्याचे काम करते. सुमारे दोन वर्षांपूर्वी या यंत्रावर काम सुरू झाले. विविध चाचण्या घेतल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये पहिले यंत्र उपलब्ध करण्यात आले. सुरुवातीला सुमारे १८ शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर यंत्रे देण्यात आली. त्यानंतर १० शेतकरी हे यंत्र घेऊन गेले. आत्तापर्यंत नाशिक, नगर, भोर, परभणी, भंडारा, तळेगाव आदी मिळून एकूण २८ एकूण यंत्रे वापरात आली आहेत. शेतकऱ्यांसाठी सक्षम पूरक व्यवसाय सध्या सर्वत्र मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. भातकाढणीनंतर त्यावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणे ही महत्त्वाची पायरी असते. अनेक भागांत त्यासाठी मजूर बळाचा वापर करतात. हे काम मुख्यत्वे महिला करतात. त्यांचे कष्ट कमी करणे हा यंत्रनिर्मितीमागील हेतू होताच. शिवाय यांत्रिक तांदळाचा दर्जा राखणे तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय देता यावा असेही उद्देश त्यामागे होते. शेतकरी सध्या बाजारातून तांदूळ तयार करून तो ४० रुपये प्रति किलो दराने विकतो आहे. मात्र त्याने यंत्र घेतले तर घरच्या घरीच तयार केलेला हातसडीच्या गुणवत्तेचा तांदूळ दीडपट ते दुप्पट दराने बाजारात विकण्याची त्याला संधी आहे. यातून त्याचे उत्पन्नदेखील वाढणार आहे. सध्या यंत्रातून तयार केलेला इंद्रायणी तांदूळ ८० रुपये दराने शेतकरी विकतदेखील आहेत. शिवाय तांदळाच्या साळीपासून शिल्लक राहिलेला भुस्सा जनावरांच्या खाद्यासाठी उपयोगात आणता येत असल्याने त्यातूनही शेतकऱ्याला अधिकचे उत्पन्न मिळत आहे. हातसडीच्या तांदूळ यंत्राचे फायदे सध्या बाजारात पांढरा तांदूळ तयार करण्याचे यंत्र उपलब्ध आहे. त्याद्वारे साळीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के तांदूळ मिळतो. तांदूळ अधिक शुभ्र होण्यासाठी तो घासला जातो. त्या वेळी त्याचा बारीक तुकडा होऊन जातो. हातसडीच्या तांदळाची गुणवत्ता देणाऱ्या यंत्राद्वारे मात्र ७० ते ८० टक्के म्हणजे दीडपट ते दुप्पट तांदूळ मिळतो. अधिक प्रमाणात तांदूळ आणि दरही अधिक त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांबरोबरच महिला बचत गट, बेरोजगारीच्या गर्तेत अडकलेल्या तरुणांना हा व्यवसाय म्हणजे उत्पन्नाचे साधन मिळणार आहे. पोषक घटक टिकून प्रचलित तांदूळ प्रक्रियेत दाण्यांवरील थर घासल्याने निघून जात असल्याने त्यातील पोषक घटकही निघून जातात. शिल्लक तांदळात अधिक प्रमाणात कर्बोदके राहतात. महिलांद्वारे हे काम होत असताना साळी कुटून त्याची टरफले काढतात. हीच प्रक्रिया यंत्राद्वारे केली जाते. यात साळीचे एकमेकांवर घर्षण करून साल काढली जाते. त्यामुळे पोषक घटक कायम राहतात. तसेच साळ कुटून तांदूळ करताना तुकडा अधिक होतो. मात्र यंत्रामध्ये तुकडा होत नाही. त्यात तुकड्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजे २ ते ३ टक्के आहे. तर येणाऱ्या साळीचे प्रमाणही १ ते २ टक्के आहे. असे चालते यंत्राचे काम तांदूळ निर्मिती यंत्रात एक अश्व शक्तीची मोटर, ब्लोअर आणि गिअर बॅाक्स आहे. तांदळाची साळ यंत्रात टाकण्यासाठी २० किलो क्षमतेचा हॉपर आहे. साळ एकमेकांवर घासण्यासाठी लाकूड आणि रबराचा वापर करून ब्लेड तयार करण्यात आले आहे. मोटारीद्वारे जाते फिरवले जातात. त्यावर हॉपरमधून हळूहळू साळी खाली सोडल्यानंतर तांदूळ एकमेकांवर घासून त्याची साल निघते. ब्लोअरच्या मदतीने तयार झालेला भुस्सा उडून बाहेर पडतो. तर तांदूळ दुसरीकडून गोळा करता येतो. विशिष्ट प्रकारच्या ब्लेडमुळे तांदूळ एकमेकांवर घासताना गरम होत नाही. तापमान नियंत्रित राहिल्याने तांदळातील पोषक घटकही टिकून राहतात. देशभरातील कोणत्याही प्रकारचा तांदूळ तयार करण्याची सुविधा या यंत्रात आहे. तांदळानुसार जात्यांमधील अंतर कमी अधिक करता येते. मात्र तुकडे होऊ नये म्हणून साळीचा ओलावा आठ टक्के असणे आवश्यक आहे. ओलावा तपासण्याठी उपकरणही यंत्राबरोबरच देण्यात येणार आहे. किमान देखभाल खर्च हे यंत्र सिंगल फेजवर चालते. यापुढे जाऊन सौर ऊर्जेवरही ते चालविणे शक्य आहे. गोंदियामध्ये असे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रासाठी मध्यम जागाही पुरेशी होते. यंत्राची देखभाल दुरुस्ती सहजपणे करता येते. फक्त गिअरबॉक्समधील ऑइल बदलावे लागते. पाच ते सहा टन तांदूळ निर्मिती केल्यानंतर त्याचे ‘जाते’ बदलावे लागते. हे जाते पुन्हा पूर्ववत करता येत असल्याने तेदेखील बदलून देण्यात येते. त्यासाठीचा खर्च अत्यल्प आहे. या जात्याचे वजन केवळ चार किलो आहे. वेळ, कष्टात बचत पारंपरिक पद्धतीत दिवसभरात एक महिला पाच किलो तांदूळ तयार करते. यंत्राद्वारे ताशी १५ किलो या क्षमतेने तांदूळ निर्मती होते. यंत्राचा वेग मर्यादित असल्याने तांदूळ तयार होत असतानाच स्वच्छता, पॅकेजिंग व अन्य कामे करता येतात. घरच्या घरी एक कुटुंब हे यंत्र सहजपणे चालवू शकते. घरच्या तांदळासह परिसरातील शेतकऱ्यांनाही तांदूळ तयार करून देणे शक्य होते. ब्रॅंडिंग करून तांदळाची विक्री केल्यास दरही चांगले मिळतील. यंत्राची किंमत ७० हजार रुपये आहे. वाहतूक खर्च आणि ‘जीएसटी’ हे स्वतंत्र आहेत. यंत्र खरेदी करणाऱ्यांना त्याचा वापर करण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. या वेळी शेतकऱ्यांकडे असलेल्या साळीचा वापर केला जातो. यंत्राविषयी आकडेवारी

  • यंत्र चालविण्याचा कालावधी- १० तास
  • लागणारा कच्चा माल अर्थात तांदळाची साळ - १५० किलो (ताशी १५ किलो)
  • कच्च्या मालासाठी खर्च - प्रतिकिलो २५ रुपये
  • वीजबिल प्रति युनिट १० रुपये
  • पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च - २५० रु.
  • तांदूळ उत्पादन १०० किलो (सरासरी ७० टक्के)-
  • दर- प्रति किलो ७० रुपये
  • संपर्क ः विज्ञान आश्रम जे. पी. नाईक सेंटर फॉर एज्युकेशन कोथरूड, पुणे संपर्क- ०२०- २५३६०२०३ -उज्ज्वला गोसावी- ९३२५८७९९४५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com