कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे तंत्र उपयुक्त

प्रक्षेत्र चाचण्यांमध्ये कीटकनाशके, खतांचा वापर आणि हाताने केलेल्या परागीभवनामुळे पडणाऱ्या उत्पादनातील फरकांचा अभ्यास केला आहे. त्यात कोणत्याही रसायनांच्या वापरापेक्षाही परागीभवनाचे महत्त्व लक्षात आले आहे.
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे तंत्र उपयुक्त
कोको उत्पादनवाढीसाठी हाताने परागीभवनाचे तंत्र उपयुक्त

कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र, परागीभवनाअभावी पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत असल्याचे समोर येत आहे. गॉटिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी इंडोनेशियन वन विभागामध्ये केलेल्या प्रक्षेत्र चाचण्यांमध्ये कीटकनाशके, खतांचा वापर आणि हाताने केलेल्या परागीभवनामुळे पडणाऱ्या उत्पादनातील फरकांचा अभ्यास केला आहे. त्यात कोणत्याही रसायनांच्या (खते, कीटकनाशके) वापरापेक्षाही परागीभवनाचे महत्त्व लक्षात आले आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘जर्नल अॅग्रीकल्चर, इकोसिस्टिम्स अॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट’ मध्ये प्रकाशित केले आहेत. कोको पिकाचे परागीभवन हे छोट्या माश्या, वास्प या किटकांमार्फत होते. परागीभवनानंतर फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते. अर्थात, यातील कोकोचे परागीभवन करणारा नेमका व महत्त्वाचा घटक कोणता, याविषयी फारशी माहिती अद्याप उपलब्ध नाही. सामान्यतः किंवा नैसर्गिक स्थितीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक फुलांना किटक अजिबात भेट देत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी या फुलांपासून फळ तयार होत नाही. कोकोची फायदेशीरता लक्षात आल्यानंतर कोकोची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. पुढे त्यात मोठ्या प्रमाणात रसायनांचाही वापर सुरू झाला. मात्र, रसायनांच्या वापरानंतरही अपेक्षित उत्पादन वाढ होत नसल्याचेच स्पष्ट होते. गॉटिंग्टन विद्यापीठातील संशोधक मॅन्युअल टोलेडो-हर्नान्डेझ, प्रा. तेजा त्शारत्के, प्रा, थॉमस सी. वांगर यांनी इंडोनेशियन ताडूलको विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह कोको झाडांचे हाताने परागीभवन करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगामध्ये हाताने परागीभवन केलेल्या झाडांचे उत्पादन १६१ टक्क्याने वाढल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.       माणसांच्या साह्याने परागीभवन करण्यासाठीचा खर्च विचारात घेतला तरी सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये ६९ टक्क्यांने वाढ झाली.      अन्य एका प्रक्षेत्रामध्ये केलेल्या खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये कोणताही फरक पडला नाही.

कोणत्याही जैविक प्रक्रियांचा वेग वाढवण्यासाठी कृषी आणि पर्यावरणीय घटकांचा एकत्रीकरणाची आवश्यकता असते. पर्यावरणातील किटकांसारखे लहान घटक हे आपल्या हातात नक्कीच नसतात. अशा वेळी हाताने परागीकरण करण्याचे नावीन्यपूर्ण तंत्र उपयुक्त ठरू शकते. - मॅन्युअल टोलेडो-हर्नान्डेझ, पीएच. डी., गॉटिंग्टन विद्यापीठ. अलीकडे उष्ण किंवा शीत कटिबंधातील विविध पिकांमध्ये परागीभवनाची समस्या प्रामुख्याने जाणवत आहे. परागीभवनाच्या कमतरतेमुळे उत्पादन घसरत आहे. भविष्यामध्ये परागीभवनाची समस्या अत्यंत तीव्र होत जाणार आहे. त्यावर कशा प्रकारे मार्ग काढायचा, यासाठी अधिक संशोधन करावे लागणार आहे. - प्रा. तेजा त्शारत्के, प्रमुख, कृषी-पर्यावरणशास्त्र विभाग, गॉटिंग्टन विद्यापीठ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com