पानांवरील अतिसूक्ष्म जलकणांवर तग धरतात जिवाणू

पानांवरील अतिसूक्ष्म जलकणांवर तग धरतात जिवाणू
पानांवरील अतिसूक्ष्म जलकणांवर तग धरतात जिवाणू

पानाच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म पाण्याच्या कणांमुळे जिवाणू तग धरून राहू शकतात. असे पाण्याचे कण उपलब्ध नसल्यास कोरड्या आणि दिवसाच्या वेळी जिवाणू तग धरणे शक्य नसल्याचे संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे संशोधन ‘इलाईफ’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. पिकांमध्ये जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे विविध रोग होऊन उत्पादनामध्ये मोठी घट होत असते. त्याच प्रमाणे वनस्पतींसाठी उपयुक्त ठरणारेही अनेक जिवाणू कार्यरत असतात. या सर्वांच्या जगण्यासाठी किंवा तग धरण्यासाठी पाण्यांची सूक्ष्म प्रमाणात तरी आवश्यकता असते. सरासरी आकाराच्या पानांच्या पृष्ठभागावर सुमारे १० दशलक्ष सूक्ष्म जीव असतात. ते वनस्पतीच्या दैनंदिन कार्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असतात. संशोधकाच्या दृष्टीने दिवसाच्या कडाक्याच्या सूर्यप्रकाशामध्ये तीव्र तापमानामध्ये जिवाणू कशा प्रकारे तग धरतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याविषयी माहिती देताना इस्राईल येथील हेब्र्यू विद्यापीठातील रॉबर्टे एच. स्मिथ कृषी, अन्न आणि पर्यावरण विभागामध्ये पीएच. डी. करत असलेले मायोर ग्रिनबेर्ग यांनी सांगितले, की दिवसाच्या वेळी आपल्याला पाने कोरडी वाटत असली तरी साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म आकाराच्या जल कणांचे आवरण पानांवर असल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत. मात्र, इतक्या कमी प्रमाणातील ओलाव्याचा जिवाणूंना तग धरण्यासाठी उपयोग होऊ शकेल का, याबाबत स्पष्टता नव्हती. जिवाणूंना तग धरण्यासाठी आवश्यक ओलाव्याचे प्रमाण मिळवण्यासाठी ग्रिनबेर्ग यांच्यासह तोमेर ओरेवी आणि त्यांच्या गटाने संशोधन केले. त्यांनी काचेच्या प्लेटवर पानाप्रमाणे पृष्ठभाग प्रयोगशाळेमध्ये तयार केला. तो आर्द्रतेच्या विविध प्रमाणामध्ये ठेवला. त्यानंतर एक डझन जिवाणूंच्या प्रजातींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. साध्या डोळ्यांनी पाहिले असता कोरडे दिसणारे हे पृष्ठभाग सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यात आले. त्यामध्ये जिवाणूंच्या पेशी या पाण्यांच्या अत्यंत सूक्ष्म अशा कणांमध्ये सुरक्षित असल्याचे दिसून आले. लक्षणीय बाब म्हणजे मोठ्या पाण्याच्या कणाभोवती अनेक जिवाणू पेशी जमा झाल्याचे दिसून आले. याय सूक्ष्मदर्शकीय ओलावा तयार होण्याच्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये डेलिक्वेस्केन्स (deliquescence) असे म्हणतात. हवेतील अत्यंत सूक्ष्म असे कण (त्याला इंग्रजीमध्ये एअरोसोल्स म्हणतात.) पानांवर असतात. ते वातारणातून आर्द्रता शोषतात, त्यात विरघळतात आणि त्यातून पाण्याचा अतिसूक्ष्म थेंब तयार होतो. ओरेवी म्हणाले, की आम्हाला पाण्याच्या अतिसूक्ष्म अशा कणांमध्ये जिवाणूंच्या पेशी २४ तासापेक्षा अधिक काळ तग धरून असल्याचे दिसून आले. त्यांच्या तग धरण्याचा दर हा मोठ्या जलकणांमध्ये अधिक होता. या पेशी स्वतः एकत्रित होतात. या एकत्रिकरणातून सातत्याने कोरडेपणाला सामोरे जावे लागणाऱ्या पेशी आपल्या तग धरण्याच्या संधी वाढवत असल्याचे दिसून आले. कृषी क्षेत्रासाठी या संशोधनाचे महत्त्व ः कृषी क्षेत्रामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे जिवाणूंच्या तग धरण्याच्या या पद्धतीला मदत होत असते. ओलाव्याच्या स्थितीमुळे पिकांचे किंवा नैसर्गिक वनसंपदेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, असे मत हेब्र्यू विद्यापीठातील सहायक प्रो. नॅडव कॅश्टन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पानांवरील अत्यंत सूक्ष्म पातळीवरील या ओलाव्यामुळे पिकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले सूक्ष्मजीव समुदाय कशा प्रकारे जोपासता येतील, याकडे लक्ष द्यावे लागेल. या ओलाव्यावर परिणाम करणाऱ्या कृषी पद्धती आणि मानवाकडून होणारे विविध सूक्ष्म धुळींच्या कणांचे उत्सर्जन याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. माती, माणूस किंवा प्राण्याच्या त्वचेवर सूक्ष्मजीवांचा एक थर कायम असतो. त्याला तग धरण्यासाठी आवश्यक ओलावाही उपलब्ध होत असतो. त्यामुळे या संशोधनाचे महत्त्व केवळ पानांवरील सूक्ष्मजीवाचे तग धरण्यापुरते मर्यादित नक्कीच राहणार नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com