जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन गरजेचे : गीताराम कदम

ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात शेतमाल प्रक्रिया उद्योगावरील चर्चासत्रात गीताराम कदम यांनी मार्गदर्शन केले.
ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात शेतमाल प्रक्रिया उद्योगावरील चर्चासत्रात गीताराम कदम यांनी मार्गदर्शन केले.

औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी घेतो, तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक काळजी काढणीनंतर घेतली पाहिजे. शेतमालाचे मूल्यवर्धन प्रतवारी आणि पुढील प्रक्रियेतूनच साधू शकते. अगदी नियमित भाज्यांच्या निर्जलीकरणातूनही चांगले पैसे मिळू शकतात. कोणत्याही शेतमालासाठी ब्रॅड महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी एकत्र येत विपणन साखळी उभी करणे गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्ह्यातील न्हावरे येथील प्रक्रिया उद्योजक गीताराम कदम यांनी व्यक्त केले. सकाळ ॲग्रोवनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योग या विषयावर कदम बोलत होते. श्री. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडण्यासाठी प्रक्रिया उद्योग महत्त्वाचे ठरणार आहेत. यातून शेतीमालाला दर मिळण्यासोबत अन्य लोकांना रोजगारही उपलब्ध होतील. धान्याची स्वच्छता, प्रतवारी करून विक्री करावी. शेतकऱ्यांनीही व्यापारी दृष्टिकोनातून विचार करायला शिकले पाहिजे. आपल्याला शेतमालाचा भाव ठरवता येत नाही. ही बाब अर्धवट सत्य आहे. कारण शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी केल्यास दर्जानुसार दर मागता येतो. त्यातही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या उत्पादनासाठी स्वतःचा ब्रॅड विकसित करावा. आपली वेगळी विपणन साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडे विजेची समस्या सातत्याने जाणवते. त्यावर मात करण्यासाठी पवनचक्की आणि सौरऊर्जा अशा पर्यायांचा विचार करावा. अगदी नाशवंत मानल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्यास चौपट दर मिळतो. निर्जलीकरण केलेल्या भाजीपाल्यात पोषणमूल्य अधिक असते. आपल्या शेतामधील किमान ७० टक्के भाजीपाला प्लॅस्टिक डोममध्ये वाळवून त्याची योग्य दर मिळताच विक्री करावी. मूल्यवर्धन होईल. स्वच्छता -प्रतवारी, पवन ऊर्जा आणि सौरऊर्जाचा संयुक्त वापर, निर्जलीकरण हे माॅडेल शेतकऱ्यांना उद्योजक बनवू शकेल. शेतकऱ्याला किमान एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे नियोजन करावे. शेवग्याच्या शेंगांपेक्षा पानालाही मागणी आहे. ती चांगल्या प्रकारे वाळवून विक्री केल्यास शेंगांपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. कमी पाण्यावर येणारा शेवगा अनेक ठिकाणी उसापेक्षा अधिक उत्पन्न देऊ शकतो. एकरी एक लाखाचे उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांना विकण्याची सवय लागली पाहिजे. आपल्या वाटचालीमध्ये ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर गीताराम कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्रिया उद्योगातील प्रश्न व शंका यांचे समाधान केले. पुरस्कारप्राप्त राजू घोडके या शेतकऱ्याने प्रातिनिधिक विचार व्यक्त केले. युवा शेतकरी पुरस्कार या चर्चासत्रादरम्यान ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड आणि गीताराम कदम यांच्या हस्ते ॲग्रोवन युवा शेतकरी सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यामध्ये संदीप करपे (जवळा, जि.बीड), अपर्णा विलास एस्के (नागापूर, जि.बीड), शरद चव्हाण (हातोला, जि.बीड), अण्णासाहेब जगताप (सावरगाव, जि.बीड), राजेंद्र जाधवर (सावरगाव, जि.बीड), पाराबाई मारग (कडेगाव, जि.बीड), दीपक बुनगे (रामगव्हाण, जि.जालना), शिवाजी घाडगे (शिवणी, जि.जालना), जयकिसन शिंदे (वरुडी, जि.जालना), राजू घोडके (डोणगाव, जि.जालना). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com