संरक्षित शेतीमुळे मंगरुळच्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती 

मंगरूळ- प्रयोगशीलतेबाबत ठळक बाबी ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचा काटेकोर वापर तुलनेने कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद, आले यांचे उत्पादन घेण्याकडे कल कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राशी सातत्याने संपर्क. त्यामुळे गावात नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार कृषी प्रदर्शने, प्रशिक्षणांतही सहभाग
मंगरूळ येथील शेतकऱ्यांनी गुलाबाची गटशेती सुरू केली आहे.
मंगरूळ येथील शेतकऱ्यांनी गुलाबाची गटशेती सुरू केली आहे.

काही वर्षांपासून उद्भवत असलेल्या दुष्काळामुळे हतबल न होता शेतीव्यवसायात टिकून राहण्याचा निश्‍चय करीत मंगरुळ (जि. परभणी) येथील शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्र आले. बदलत्या हवामान स्थितीत शेडनेट, हरितगृहातील गुलाब शेतीचा पर्याय त्यांनी निवडला. संरक्षित सिंचनासाठी शेततळ्याची निर्मिती केली. मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत उत्पन्नवाढीवर त्यांनी भर दिला आहे.  परभणी जिल्ह्यातील मंगरुळ (ता. मानवत) गावची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे.  गावशिवारातील सुमारे ६० टक्के जमीन हलक्या प्रतीची आहे. कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, करडई  या हंगामी पिकांबरोबरच विविध भाजीपाला पिके, ऊस, हळद, आले, पपई आदी पिकांची विविधता गावात आढळून येते. पारंपरिक शेतीत जेमतेम कुटुंबाच्या उपजीविकेपुरते उत्पन्न मिळायचे. हलक्या बरड जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना खरिपावर समाधानी राहावे लागे. त्यानंतर अनेकांना स्थलांतर करावे लागे.  गावाचे शिवार जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते. परंतु, धरण दर वर्षी भरत नसल्यामुळे सिंचनासाठी कालव्याचे पाणी मिळण्याची खात्री नसते. दरम्यान, गौंडगाव (ता. गंगाखेड) येथील एका शेतकरी गटाच्या शेडनेटमधील शेतीची माहिती मंगरुळ येथील शेतकऱ्यांना मिळाली. तेथे भेट देऊन त्यांनी हे तंत्र समजावून घेतले.  शेडनेटमधील शेतीतून बदल  भाजीपाला शेतीत दरांमध्ये चढउतार व्हायचे. त्यापेक्षा गुलाबशेती भावली. शेडनेट शेतीचे महत्त्व, अर्थकारण पटल्यानंतर २०१५ मध्ये कृषी विभागाकडे मंगरुळ येथील जय मल्हार शेतकरी गटाची नोंदणी झाली. गटात बहुतांश अल्पभूधारक शेतकरीच आहेत. त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान मिळाले. बॅंकेकडून अर्थसाहाय्यही घेतले. सन २०१६-१७ मध्ये १० (प्रत्येकी २० गुंठ्यांची) शेडनेटस तर २०१७-१८ मध्ये १ शेडनेट उभे राहिले. पॉलिहाऊसेस नऊ उभी राहिली.  डच गुलाबाचे मार्केटिंग साधले  पावसाळ्याचे एक-दोन महिने सोडले, तर वर्षातील अन्य महिने गुलाबाचे उत्पादन सुरू राहते.  साधारण २० गुलाबाच्या गड्डीचे पॅकिंग केले जाते. कागदी पुठ्ठ्याच्या बाॅक्स रूपात पार्सल तयार केले जाते. गटातील शेतकऱ्यांना गुलाबाच्या मार्केटिंगसाठी विविध ठिकाणी जाऊन प्रयत्न करावे लागले. हळूहळू व्यापाऱ्यांच्या ओळखी झाल्या. आता नांदेड, परभणी, लातूर, नागपूर, पुणे आदी ठिकाणी मागणीनुसार गुलाब पाठविण्यात येतो. विशेष म्हणजे अनेक ठिकाणचे व्यापारी आगाऊ मागणी नोंदवितात. त्याच वेळी संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा करतात. पुणे येथे गुलाबाचे पार्सल आधी पाठवावे लागते. त्यानंतर लिलावामध्ये मिळालेल्या दरांनुसार ‘पेमेंट’ अदा केले जाते. वर्षभर गुलाबला प्रतिफूल एक रुपया ते अडीच रुपये, असा दर मिळतो. खर्च वजा जाता सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. काहींनी शेडनेट उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही केली आहे. पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण, तसेच हिवाळ्यात तापमान योग्य नियंत्रित ठेवता यावे, यासाठी काहींनी पॉलिहाऊसचा मार्ग निवडला आहे.  शेततळ्याचा आधार  काही वर्षांपूर्वी मंगरुळ येथील शेतकरी जमीन वापरली जाते, या कारणावरून शेततळे घेण्यास नाखूष असत. मात्र, कृषी अधिकारी व सहायकांनी त्याचे महत्त्व समजावून दिले. त्यानंतर मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गंत पंधराहून अधिक जणांनी शेततळ्याचा लाभ घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ज्ञानेश्वर देशमाने, गुलाब देशमाने यांनी शेततळी उभारली. सहा शेतकऱ्यांनी शेततळ्याला अस्तरीकरण केले. संरक्षित शेती त्यामुळे अधिक सुकर झाली. उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेंतर्गंत गावात तीन ट्रॅक्टर्सचे वाटपही झाले आहे.  थेट ग्राहकांना विक्री  ‘आत्मा’ अंतर्गत सुमारे ५० शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करू लागले आहेत. परभणी येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजारात गटातर्फे थेट फळविक्री केली जात आहे.  रेशीम शेतीस सुरुवात सन २०१८ मध्ये दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न देणाऱ्या रेशीम उद्योगाकडे गावातील काही शेतकऱ्यांची पाऊले वळली. गावशिवारात आजमितीस ३० एकरांवर तुती लागवड आहे. संबंधित रेशीम उत्पादकांनी बंगळूर येथे रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेत कोष उत्पादनास सुरुवात केली आहे. 

योजनाची अंमलबजावणी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक भास्कर शिंदे  यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घेतली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले आहे.  प्रतिक्रिया  गटाच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आल्यामुळे शेडनेट शेती आकारास आली. कमी क्षेत्रात अधिक व गुणवत्ताप्राप्त उत्पादन मिळू लागले. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य होत आहे. त्यामुळे गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.  -मोहन कापसे,  अध्यक्ष, जय मल्हार शेतकरी गट  मंगरुळ  संपर्क- ९३२५४७९६६४  बांध टाकून नाल्याचे पाणी अडविले. ते पंपाव्दारे विहिरीत व त्यानंतर शेततळ्यामध्ये भरले जाते.  त्याद्वारे शेडनेटगृहात डच गुलाबाचे उत्पादन घेण्यासाठी उन्हाळ्यातही पाणी मिळत आहे. शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडून अतिरिक्त उत्पन्न घेणार आहोत.  -अशोक देशमाने,  मंगरुळ  संपर्क- ९८८१६३८६५०  माझ्या चार एकरांत सिंचनाची सुविधा आहे. पारंपरिक पीक पद्धतीतून खर्च वजा जाता  वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळायचे. काही वर्षे साखर कारखान्यात नोकरी केली.  आता शेडनेटमधील २० गुंठ्यांत दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. उत्पन्नाची खात्री झाली आहे. त्यामुळे नोकरी सोडून शेतीवरच लक्ष केंद्रित केले आहे.  -देविदास कदम  संपर्क- ८६००२६६४४७    शेतकऱ्यांचे नेहमीच सहकार्य असल्याने कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता आली.  -भास्कर शिंदे  कृषी सहायक,  मंगरुळ  संपर्क- ९४२३६८७०४८  शेडनेटमधील संरक्षित शेतीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी फायदा झाला. मंगरूळ गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.  -बाळासाहेब शिंदे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,  परभणी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com