सांगली जिल्ह्यातील तांबवे (ता. वाळवा) या ऊस पट्ट्यात शहाजी यशवंत शेळके यांनी जंबो पेरू लागवडीचा प्रयोग केला आहे. साधारण दोन फळ हंगामांत त्यांना अनुक्रमे आठ टन व बारा टन असे उत्पादन मिळाले आहे. दरही नेहमीच्या पेरूच्या तुलनेत चांगले मिळाले आहेत. उसाच्या जोडीला जंबो पेरूची शेती आश्वासक ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कासेगावपासून पूर्वेला तांबवे (जि. सांगली) गावचे शिवार लागते. गावाजवळून वाहणारी कृष्णा नदी, अथांग पसरलेले पाणी तांबव्याचा डोह म्हणून प्रसिद्ध आहे. उसाचा हा हुकमी पट्टा. रासायनिक खते व पाणी यांचा अति वापर, त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक जमिनी क्षारपड किंवा नापीक होत आहेत. येथील शेतकरी प्रयोगशील वृत्तीचा असल्याने जिद्दीने ऊस, केळी यासारख्या पिकांचे प्रयोग करण्यात कायम व्यस्त असतो. प्रयोगशील शेळके तांबवे येथील शहाजी शेळके १९९० मध्ये शास्त्र शाखेतून पदवीधर झाले. वडिलोपार्जित त्यांच्या वाट्याला सात एकर जमीन आली. ऊस हे त्यांचेही मुख्य पीक. सतत काहीतरी वेगळे करण्याची त्यांची धडपड असते. त्यातूनच केळी लागवडीचा चांगला प्रयोग या भागात त्यांनी केला. केळी पिकविण्यासह रापनिंग चेंबरमध्ये पिकवून यशस्वी विक्री करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. जंबो पेरूचा प्रयोग केळी पिकातील यशापुरते थांबणारे शेळके नव्हते. अनेक ठिकाणी फिरून अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यातूनच त्यांना बाजारपेठेत जंबो पेरूबाबत माहिती मिळाली. या पेरूला दरही सर्वसाधारण पेरूपेक्षा थोडे जास्त मिळू शकतात याचीही माहिती झाली. हे पीक आपल्या भागासाठी आश्वासक ठरू शकते का याची चाचपणी झाली. हा पेरू छत्तीसगड भागातील अाहे. त्या दृष्टीने त्याची लागवड केलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची माहिती घेतली. यात सासवड, कटगुणस, अौंध भागातील माहिती घेतली. तांबवे गावाजवळच कासेगाव आहे. तेथे शेळके व त्यांच्या मित्रांचा शेतकरी गट आहे. या पेरूविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट रायपूर (छत्तीसगड) देखील गाठले. पेरूचे व्यवस्थापन- ठळक बाबी
गुणवत्ता
पॅकिंग दहा ते पंधरा किलो वजनाच्या बॉक्समधून पेरू बाजारपेठेत पाठवला जातो. बॉक्समध्ये भरताना त्याला फोम (नेट) व त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घातली जाते. त्यामुळे पेरूची गुणवत्ता टिकून राहते. उत्पादन, मार्केट व विक्री आत्तापर्यंत शेळके यांनी पेरूचे दोन हंगाम घेतले. पैकी पहिल्या हंगामात ५५ गुंठ्यांत ८ टन तर पुढील हंगामात १२ टन उत्पादन मिळाले. पहिल्या हंगामातील पेरूंची पुणे येथे विक्री केली. त्या वेळी बाजारात आवक जास्त असल्याने किलोला ५० रुपयांपर्यंतच दर मिळू शकला. पुढील हंगामात मात्र मुंबई बाजारपेठेत पाठवलेल्या पेरूला हाच दर ८०, ८५ व कमाल १०० रुपयांपर्यंत मिळाला. शेळके म्हणाले की, या पेरूचे वजन ३५० ग्रॅम, ६०० ग्रॅम ते कमाल एक ते सव्वा किलोपर्यंतदेखील मिळाले आहे. त्याची गोडीही इतर पेरूंपेक्षा वेगळी आहे. बियांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बाजारात त्याला चांगला दर मिळण्याची संधी आहे. जून ते सप्टेंबर तसेच उन्हाळ्यात पेरूला चांगला दर मिळतो. अर्थात आवकेवर दरामध्ये चढ-उतार होताे. शेळके यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
संपर्क- शहाजी शेळके- ९९२३०३०७५७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.