प्रक्रिया उत्पादने, ब्रॅंड निर्मीतीतून  फायदेशीर दुग्धव्यवसायाकडे 

उद्योगाला चालना केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिले..हा संकल्पनेनुसार आत्मविश्‍वास ठेऊन देशमुख कुटुंबातील नवी पिढी उद्योगात रूळते आहे. ‘स्टार्टअप’ उद्योगाच्या श्रेणीतील सध्या हा प्रकल्प असला तरी यवतमाळसारख्या शेतीचे अनेक प्रश्‍न असलेल्या जिल्‍ह्यात नवे परिवर्तन घडविण्याची ताकद त्याच्यात आहे हे खरे आहे.
 दुधाचा दर्जा कायम राखला जातो.
दुधाचा दर्जा कायम राखला जातो.

काळाची पावले ओळखत केलेला बदल गरजेचा ठरतो. पुसद (जि. यवतमाळ) येथील देशमुख कुटुंबीयांनी असाच वेध घेत पारंपरिक दुग्ध व्यवसायात परिवर्तनाला स्थान दिले. सध्याच्या न परवडणाऱ्या दुग्ध व्यवसायात प्रक्रियेवर भर दिला. सध्या हा ‘स्टार्ट अप’ असला तरी ‘सई’ ब्रॅण्डची निर्मिती व गावात तीन विक्री केंद्रांची उभारणी याद्वारे व्यवसाय स्थिर करण्याकडे पाऊले टाकली आहेत.  यवतमाळ जिल्ह्यात पुसद (तालुका ठिकाण) येथील मोतीनगर भागात राहणारे संतोषराव देशमुख यांची कोंढई शिवारात ३५ एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, हळद यांसारखी व्यवसायिक पिके घेतली जातात. हे शिवार सिंचनाखाली पूर्णतः नव्हते. मग वणी धरणाच्या ‘बॅकवॉटर’पासून पाच किलोमीटर शेतापर्यंत संतोष देशमुख यांनी पाइपलाइन उभारली. या माध्यमातून संपूर्ण शिवार ओलीताखाली आले. त्यामुळे व्यावसायिक शेतीचा अंगीकार करणे शक्‍य झाले. गेल्या वर्षभरापासून त्यांनी शेतीला शेळीपालनासारख्या पूरक व्यवसायाची जोडही दिली आहे.  डेअरी व्यवसायात रोवले पाय  देशमुख यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड असावी यासाठी चाचपणी सुरू केली होतीच. दुग्ध व्यवसायावर त्यांचे एकमत झाले. त्यानुसार सुरवातीला एक गाय, त्यानंतर दोन म्हशी अशी सुरवात केली. संतोष यांचा मुलगा वैभव याने उदगीर (जि. लातूर) येथील ‘कॉलेज ऑफ डेअरी टेक्‍नॉलॉजी’ येथून बीटेकची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्षेत्रातील बारकावे जाणून घेण्यासाठी श्रीरामपूर (जि. नगर) येथील एका डेअरीमध्ये वैभव यांनी काही महिने नोकरी केली. त्या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा अनुभव घेतला. सद्यस्थितीत दैनंदिन व्यवस्थापनात त्याचा उपयोग होत आहे.  असा झाला ब्रॅण्ड विकसित  नोकरीजा राजीनामा देऊन गावी परतल्यानंतर सुरवातीला घरच्या जनावरांपासून मिळणाऱ्या वीस लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सुरवात केली. प्रायोगिक तत्त्वावर उत्पादित पदार्थांची विक्री परिसरात केली जात होती. दर्जा चांगला असल्याबद्दल ग्राहकांकडून प्रतिक्रिया मिळू लागल्या. त्यामुळे हुरूप वाढला आणि व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे वैभव यांनी सांगितले.  शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी  ग्राहकांकडून मागणी वाढू लागली तरी घरचे दूध संकलन जेमतेम होते. त्यामुळे पुरवठा त्यानुसार करता येत नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. टप्याटप्याने आज दूध संकलन वाढत ३००, ४०० व कमाल ५०० लिटरवर पोचले आहे.  दुधाची विक्री  शेतकऱ्यांकडून पुरवठा होणाऱ्या दुधाला सर्वाधिक सव्वा सहा रुपये प्रती फॅटचा दर दिला जातो. त्याचा ८.५ इतका एसएनएफ असावा लागतो. याच दर्जाच्या दुधाची खरेदी होते. सुमारे २०० लिटर दुधाची विक्री होते. तर ३०० लिटर दुधावर प्रक्रिया होते.  ‘हायजेनीक’ दुधाचे शेतकऱ्यांना धडे  आपल्याला दुधाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना वैभव स्वच्छ दुधाचे महत्त्व समजावून देतात.  गोठा आणि दुधाळ जनावरे असलेला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या टीप्स देतात. जेणेकरून ‘हायजेनिक’ दूध असावे हे ध्येय ठेवले जाते. साहजिकच शेतकऱ्यांतही तंत्रशुद्ध दुग्धोत्पादनाविषयीचा आत्मविश्‍वास वाढीस लागला. दुधाचा दर्जा सुधारणास मदत झाली.  सई ब्रॅण्ड तयार केला  वैभव यांनी आपल्या वडिलांच्या नावावर उद्योग उभारणीचा निर्णय घेतला. त्यानुसार `संतोष अॅग्रो  इंडस्ट्री' नावाने कंपनी नोंदणी केली. त्याच कंपनीच्याअंतर्गत सई ब्रॅण्डचे नोंदणीकरण केले. या ब्रॅण्डखाली पनीर, दही, खवा, तूप, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, ताक असे पदार्थ तयार केले जातात.  दररोज दह्याची सुमारे ५० लिटर विक्री होते. लग्नसराईत तुपाला अधिक मागणी राहते. सद्यस्थितीत ते महिन्याला ९५ ते १०० किलोपर्यंत तर पनीर २२५ किलोपर्यंत विकले जाते. महिन्याला सरासरी ३०० ते ४०० किलो पनीरची मागणी असल्याचे वैभव यांनी सांगितले.  दर्जा कायम ठेवला  पदार्थांचा दर्जा कायम राखल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आहे. वैभव यांचा लहान भाऊ गौरव ‘मार्केटिंग’ची जबाबदारी सांभाळतात. सध्या डेअरी प्लॅंटमध्ये सहा मजूर काम करतात. त्यांना आठवड्याला मेहनताना दिला जातो. दुधाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आठवड्यालाच रक्कम दिली जाते. सध्या गाव परिसरात तीन आऊटलेटस आहेत. त्यातील दोन ‘फ्रॅंजायसी’ तत्त्वावरील आहेत. व्यवसाय विस्तारीकरणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.  दर आणि पॅकिंग  पुणे शहरातून ‘पॅकिंग मटेरीयल’चा पुरवठा होतो. पनीर १२५ ग्रॅम ते ५०० किलोपर्यंतच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. दह्याची विक्री ८० रुपये प्रतिलिटरप्रमाणे होते. गाईचे तूप ७४० रुपये, म्हशीचे ६४० रुपये, पनीर ३६० रुपये प्रति किलो, श्रीखंड, आम्रखंड २०० रुपये प्रति किलो, ताक ३० रुपये प्रतिलिटर, खवा ८९ रुपये पाव किलो तर बासुंदी १८० रुपये प्रतिकिलो असे दर आहेत.  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिले..हा संकल्पनेनुसार आत्मविश्‍वास ठेऊन देशमुख कुटुंबातील नवी पिढी उद्योगात रूळते आहे. ‘स्टार्टअप’ उद्योगाच्या श्रेणीतील सध्या हा प्रकल्प असला तरी यवतमाळसारख्या शेतीचे अनेक प्रश्‍न असलेल्या जिल्‍ह्यात नवे परिवर्तन घडविण्याची ताकद त्याच्यात आहे हे तितकेच खरे आहे.  संपर्क- वैभव देशमुख- ८८०५०१२३०३  गौरव देशमुख- ९५१८५३३५४८ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com