सरपंचांची ताकद एकत्र झाल्यास चमत्कार होईल : सरपंच चंदू पाटील

चंदू पाटील
चंदू पाटील

आळंदी, जि. पुणे : केवळ भाषणाने गाव, समाज बदलत नाही. गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्‍यकता असून, प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली पाहिजे. सरकारचे नियमही बदलता येतात; मात्र त्यासाठी एकजूट झाले पाहिजे. राज्यातील सरपंचांची ताकद एकत्र झाली तर चमत्कार होईल, असे मत चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड (ता. मूल) येथील सरपंच चंदू पाटील यांनी व्यक्त केले.  अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत बोलताना पाटील म्हणाले, की निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील लोकांनी नाव पुढे केल्याने मी सरपंच झालो. शहरात वाढलो असल्याने माझी पाटी कोरी होती. गावाला तीर्थस्थळ मानून महिला आणि युवकांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान सुरू केले. यातून गावाला दीड कोटी रुपयांची बक्षिसे मिळाली. गावचा विकास झाला अन् झोपडीतील ग्रामपंचायत दुमजली झाली. पाटील म्हणाले, की सरपंचांनी भांडत बसण्यापेक्षा मार्ग कसा काढता येईल याकडे लक्ष द्यावे. शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढवावा. तसेच, टीका करण्यापेक्षा चांगली कामे करण्यावर भर द्यावा. देशाच्या नकाशावर गावाची ओळख निर्माण करण्यासाठी सरपंचांनी स्वत:मधील क्षमता जागृत केली पाहिजे.    सरंपच शासन निर्णयही बदलू शकतो  स्वच्छतेच्या कामातून मिळालेली पारितोषिकांची रक्कम स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यासाठीच खर्च केली पाहिजे, असा निर्णय शासनाने घेतला होता. पैसे असूनही अन्य विकासकामे करणे शक्य होत नव्हते. शासन निर्णय बदलता येत नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. शेवटी मंत्रालयात सचिवांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. ग्रामसभेच्या मान्यतेने बक्षिसांचा निधी खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला. एक सरपंच शासन निर्णयही बदलू शकतो, हे दाखवून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com