फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता असल्यास सीताफळ झाडांना पाणी देणे सुरू करून बहर घ्यावा. बहर घेण्यापूर्वी झाडाच्या फांद्यांची साधारणतः डिसेंबर-जानेवारी महिन्यात छाटणी करावी. तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. कमी पावसाच्या मराठवाड्यासारख्या भागामध्ये डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत कमी तापमान व अपुरे पाणी यामुळे सीताफळ झाडांची पानगळ होऊन झाडे सुप्तावस्थेत जातात. सीताफळामध्ये बहर घेण्यापूर्वी झाडाच्या फांद्यांची साधारणतः डिसेंबर - जानेवारी महिन्यात छाटणी करावी. छाटणी ही फळधारणा व फळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. छाटणी संपूर्ण पानगळ झाल्यानंतर करावी. बहर धरणे ः
बहर धरणे म्हणजे झाडांची पानगळ करून झाडाला पुरेशी विश्रांती देण्यासाठी झाडांचे पाणी तोडणे होय. बहर धरताना पाणी देऊन एकाच वेळी फळधारणा करून घेता येते. बहर घेण्यासाठी प्रथम बागेस पाणी देणे बंद करावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणपणे हलक्या जमिनीत ३० ते ३५ दिवस, तर मध्यम ते भारी जमिनीत ४० ते ४५ दिवसांपर्यंत पाणी तोडावे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता असल्यास झाडांना पाणी देणे सुरू करून बहर घ्यावा. या काळात तापमान जास्त असल्याने फळधारणा व्यवस्थित होत नाही; परंतु या दरम्यान योग्य काळजी घेतल्यास भरपूर उत्पादन घेता येऊ शकते. या काळात उत्तम फळधारणा होण्यासाठी बागेमध्ये पुरेशी आर्द्रता राहून तापमान सौम्य राहील याची काळजी घेतल्यास भरपूर फायदा होतो. साधारणपणे सकाळी व सायंकाळी कमी तापमानात फुले उमलतात. या वेळेत तापमान कमी व आर्द्रता राहिल्यास ९० टक्के फळधारणा होऊ शकते. या कालावधीत फळधारणा झाल्यावर फळे जून-जुलैमध्ये काढणीस येतात. या काळातील फळांना हंगामात येणाऱ्या फळांपेक्षा जास्त बाजारभाव मिळतो. सीताफळ हे कोरडवाहू फळपीक असल्याने याला पाण्याची जास्त गरज भासत नाही; परंतु बागेत जर ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर केल्यास चांगली वाढ होऊन उत्तम गुणवत्तेची फळे मिळतात. ठिबक सिंचनामुळे ५० ते ७० टक्के पाण्याची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. ठिबकचा वापर करताना झाडाच्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार ड्रिपरचा वापर करावा. तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनासाठी प्लॅस्टिक आच्छादन किंवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा इत्यादींचा वापर करावा. बागेत आच्छादन केल्यास जमिनीतील पाण्याचे विभाजन चांगल्या प्रकारे होऊन त्या पाण्याचा उपयुक्त वापर फळझाडे करतात. बाष्पीभवनाचा वेग मंदावतो, अन्नशोषण करणाऱ्या मुळांची कार्यक्षमता वाढते त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर केला जातो. संपर्क ः वैभव कांबळे, ८५५१९२८१२८ (कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर)