काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक सहकारी प्रकल्प

रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेतर्फे काजूगर निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. काही कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून तेथे स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रांद्वारेसुमारे ३६ ग्रेड काजूचे उत्पादन घेतले जाते. ‘आरकेपी’ या दर्जेदार ब्रॅण्डने विविध फ्लेवर्सच्या काजूची बाजारपेठेत विक्री करण्यात येते. त्यातून वर्षाला तीन ते चार कोटींची उलाढाल करण्यापर्यंत संस्थेने मजल मारली आहे.
काजू निर्मितीत महिलांना रोजगार दिला आहे.
काजू निर्मितीत महिलांना रोजगार दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेतर्फे काजूगर निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. काही कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून तेथे स्वयंचलित अत्याधुनिक यंत्रांद्वारे सुमारे ३६ ग्रेड काजूचे उत्पादन घेतले जाते. ‘आरकेपी’ या दर्जेदार ब्रॅण्डने विविध फ्लेवर्सच्या काजूची बाजारपेठेत विक्री करण्यात येते. त्यातून वर्षाला तीन ते चार कोटींची उलाढाल करण्यापर्यंत संस्थेने मजल मारली आहे. कोकणपट्ट्यात काजू प्रक्रियेचे अनेक उद्योग उभे आहेत. मात्र बहुतांश खाजगी किंवा वैयक्तिक मालकीचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील गव्हाणे येथे मात्र सहकारी तत्त्वावर काजू प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाली आहे. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचा हा उपक्रम आहे. कोकणी माणूस एकत्र येत नाही ही ओळख पुसण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव विचारे यांनी पुढाकार घेतला. सहकार क्षेत्रातील अनुभव पणाला लावून सहकारी तत्त्वावर काजू प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा निर्णय सहकारी बँक कर्मचारी संघटनेत कार्यरत असतानाच त्यांनी घेतला होता. मार्च २००३ मध्ये संस्था स्थापन झाली. प्रक्रिया उद्योगाची वाटचाल गव्हाणे येथे साडेसहा एकर जागेपैकी २२ हजार चौरस फूट क्षेत्रावर प्रक्रिया उद्योग उभारला आहे. त्यासाठी शासन दरबारी कर्ज प्रस्ताव सादर करण्यात आला. अशोक बोरकर, विक्रांत खानविलकर, सुरेंद्र खानविलकर, योगेश विचार यांच्यासह अनेकांची साथ मिळाली. दोन वर्षे प्रकल्प मंजूर झाला नाही. मग तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या साह्याने शासकीय योजनेतून दोन कोटी पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले. प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. कर्जाचा पहिला हप्ता २००५ मध्ये मिळाला. त्यानंतर विविध अडचणींवर मात करत २००८ मध्ये इमारतीत यंत्रे आली. कोकणातील पहिला काजू बी सहकारी कारखाना २००९ मध्ये सुरू झाला. सुरुवातीला पावणेदोनशे कामगार होते. मात्र स्वयंचलित यंत्रे व मागणी- पुरवठा गणीत लक्षात घेऊन सध्या ६० जणांना वर्षभर रोजगार मिळत आहे. काजू बी खरेदीचे आव्हान पहिली दोन वर्षे अतिशय अडचणीची गेली. पैसा हाती आल्याशिवाय काजू बी देण्यास कोणी तयार नव्हते. तिसऱ्या वर्षापासून शेतकरी स्वतः च बी घेऊन येऊ लागले. मग कामांना वेग येऊ लागला. लॉकडाऊनपूर्वा काजू बीचा दर १३० ते १४० रुपये प्रति किलो होता. आता तो ९० ते १०० रुपये आहे. काजू प्रक्रिया उद्योग- ठळक बाबी

  • प्रति दिन २ ते ४ टन प्रक्रिया क्षमता
  • मात्र सध्या मागणीनुसार मर्यादित म्हणजे एक ते दोन टनांएवढे काम.
  • पहिल्या दोन वर्षांतील पारदर्शी व्यवहारानंतर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून पोस्ट डेटेड चेक’द्वारे काजूबी देण्यास सुरुवात केली. आता शंभर टक्के पेमेंट धनादेशाद्वारे.
  • स्वयंचलित यंत्रणेचा वापर

  • तोडणीनंतर बियांसोबतची बोंडे बाजूला काढून बी प्रक्रियेसाठी आणले जाते.
  • काजूगर निर्मिती विविध टप्प्यांतून जाते.
  • उदा. रॉ नट ग्रेडिंग, बॉयलिंग, कटिंग, शेल रिमूव्हिंग, ड्राइंग, मॉश्‍चरायझिंग, पिलींग, ग्रेडींग
  • यात आठ तासाचे व पुढे चार तासांचे असे दोन वेळा ड्राईंग होते.
  • ग्रेडिंगनुसार विक्रीचा भाव ठरतो.
  • मनुष्यांकरवी तसेच स्वयंचलित यंत्रणेद्वारेही कामे केली जातात.
  • या यंत्रणेत काजू बी ओतल्यानंतर ते उभ्या आकारात खाली येते. विशिष्ट टप्प्यात मधोमध फिरून काजूगर आणि कवच वेगवेगळे होतात. हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण येथे अखंड स्वरूपात हाती येणारा काजूगर चांगला दर मिळवून देतो.
  • त्यामुळे प्रक्रियेत यंत्र उत्तम प्रकारे चालणे गरजेचे असते.
  • कवच आणि गर बाजूला काढण्यासाठी पूर्वी मजुरांची गरज असे. आता हे काम यंत्राद्वारे होते.
  • काजू पिलिंग यंत्रात गेल्यानंतर त्यावरील पातळ लालसर पापुद्रा हवेच्या तीव्र झोताने उडवून लावला जातो. आकार आणि काजूगराच्या अखंडतेप्रमाणे ग्रेडिंग होते.
  • प्रक्रियेतूनही लालसर रंगाचे काजू बाजूला काढले जातात.
  • मोठा, मध्यम, छोटा, तुकडा अशा विविध ३६ ग्रेडसमध्ये काजूगर तयार केला जातो.
  • क्लस्टर योजनेचा फायदा कामाचा वेग वाढवणे आणि उत्पादन अधिक गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी स्वयंचलित यंत्रणेची गरज होती. मात्र त्यासाठी आर्थिक ताकदही लागते. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा, छोट्या उत्पादकांना सामुदायिक उत्पादन व प्रक्रिया सुविधा उपलब्ध व्हावी (कॉमन फॅसिलीटी सेंटर) यासाठी केंद्राने ’क्लस्टर डेव्हलपमेंट योजना’ आणली. त्याअंतर्गत ’लांजा रत्नागिरी काजू क्लस्टर’ ही स्वतंत्र कंपनी विचारे यांच्याच  अध्यक्षतेखाली स्थापन झाली. सुमारे ४७ उद्योजक त्याचे सदस्य आहेत. गव्हाणे येथे साडेतीन कोटी तर क्लस्टर अंतर्गत पाच कोटी अशी एकूण गुंतवणूक झाली. क्लस्टर योजनेंतर्गत केंद्र सरकार ८० टक्के अनुदान देते. तर उर्वरित रक्कम उद्योजकांना उभी करायची असते. हे आव्हान विचारे यांनी स्वीकारले व नवी यंत्रणा उभी राहिली. आता कुकरमध्ये काजू बी टाकल्यानंतर टीनच्या डब्यात पॅक होईपर्यंत त्याला मानवी स्पर्शही होणार नाही अशी स्वयंचलित व्यवस्था उभी राहिली. निर्यातीच्या दृष्टीने पॅकिंगपासून सर्व प्रकारच्या गुणवत्ता चाचण्यांपर्यंतच्या सोयी क्लस्टरच्या माध्यमातून उभ्या झाल्या. अनेक स्थानिक शेतकरी व उद्योजक क्लस्टरचा वापर करून उत्पादन घेत आहेत. आरकेपी ब्रॅण्ड विकसित ‘आरकेपी’ हा आपला बँड ‘रत्नागिरी कृषी प्रक्रिया’ संस्थेने विकसित केला. ग्रेडबरोबरच खारवलेले, मसालेदार चवीच्या काजूंचेही उत्पादन होते. ब्लॅक पॅपर, रेड चिली, काजू चाट, प्लेन सॉल्टेड, चॉकलेट असे विविध फ्लेवर तयार करून पॅकिंगमधून विकले जात आहेत. सध्या ग्रेडनुसार किलोला ३८० ते ११०० रुपये असे काजूगराचे दर ठेवले आहेत. उत्पन्नाचा लाभ संस्थेला मिळतो. बाजारपेठ स्थानिक पातळीवर विविध व्यावसायिकांना काजू दाखवण्यात आला. सध्या मुंबई येथे मध्यस्थ व्यापारी निश्‍चित केला आहे. त्या माध्यमातून मुंबई महानगराची बाजारपेठ मिळाली आहे. राज्य शासनाच्या ‘प्रमोशन अ‍ॅक्टीव्हिटी’मधून दुबई, शारजासह दिल्ली येथील प्रदर्शनात आरकेपी काजू ठेवण्यात आला. दिल्ली येथे कृषी उन्नती मेळाव्यात मागील वर्षी सहभागी होण्याचा मान मिळाला. संस्थेला मिळालेले पुरस्कार

  • वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा कृषी उद्योग
  • डोंबिवली नागरी बँकेचा सहकार मित्र पुरस्कार
  • आयएसओ २२०००-२०००५ मानांकन
  • प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा, छोट्या उत्पादकांना सामायिक उत्पादन व प्रक्रिया उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी केली आहे. दहा वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे संचालकांच्या सहकार्याने कोकणात शेतकऱ्यांना एकत्र घेऊन सहकार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. जयवंतराव विचारे- ९८३३३९४३१९, ९५२९२११६७९ संस्था अध्यक्ष

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com