शतावरी ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. लागवड नोव्हेंबर- डिसेंबर या दरम्यान केली जाते. बिया टोकून किंवा गड्ड्याच्या फुटव्यापासून लागवड केली जाते. पांढरी शतावरी ४ बाय ३ फूट आणि पिवळी शतावरी ३ बाय ३ किंवा ३ बाय २ फूट अंतरावर लागवड करावी. शतावरी लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, हलकी, मध्यम, रेताड, हलकी ते मध्यम जमीन निवडावी. ही वनस्पती उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगली वाढते. जमिनीची नांगरट करून, कुळव्याच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. त्यानंतर ५ फूट अंतराने एक फूट खोल व एक फूट रुंद असे चर खणावेत. चरातील माती काढून निम्या मातीत शेणखत मिसळून, ती त्याच चरात निम्म्याने भरावी व उरलेली माती रोपे भरताना वापरावी. साधारण ७५ ते ९० सेंमी अंतराच्या सऱ्या किंवा पाट पाडावेत. लागवड तंत्र ः
लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान केली जाते. बिया टोकून किंवा गड्ड्याच्या फुटव्यापासून किंवा कठीण खोडाच्या कलमापासून रोपे तयार करून लागवड केली जाते. पांढरी शतावरी ४ बाय ३ फूट आणि पिवळी शतावरी ३ बाय ३ किंवा ३ बाय २ फूट अंतरावर लागवड करावी. साधारण १० ते १५ सेंमी उंच फुटवे आलेली रोपे लावावीत. पहिले ३ ते ४ दिवस हलके पाणी द्यावे. त्यानंतर एक दिवसाआड दोन वेळेस पाणी द्यावे. नंतर गरजेप्रमाणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे. झाडाच्या बुंध्याभोवती चर किंवा खड्ड्यांवर पालापाचोळा किंवा गवत टाकून आच्छादन करावे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. लागवडीआधी मातीचे परीक्षण करावे. जमिनीचा प्रकार व मातीतील खतांचे प्रमाण यावर आधारित खतांची मात्रा ठरवावी. चांगल्या व निकोप वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा. लागवडीनंतर बुंध्याजवळील खड्ड्यातील माती खुरपून, गड्ड्यांना भर द्यावी. चांगल्या वाढीसाठी काठ्यांचा आधार द्यावा. ते शक्य नसल्यास टोमॅटोला तारा किंवा दोरी बांधतो, त्याप्रमाणे बांधून आधार द्यावा. लागवडीनंतर १८ ते २० महिन्यांनी काढणी करता येते. झुपक्याने वाढलेल्या मुळ्या खणून काढाव्यात व वेलीची खोडी तशीच ठेवावीत. काढलेली मुळे स्वच्छ करून लगेच मुळांवरील बारीक साल काढून १० ते १५ सेंमी लांबीचे तुकडे करावे. मुळामधील शीर ओढून काढावी, म्हणजे वाळण्याची प्रक्रिया लवकर होते. पांढरी शतावरी ः १० ते १२ टन प्रतिहेक्टर मुळ्या मिळतात. पिवळी शतावरी ः ४ ते ६ टन प्रतिहेक्टर मुळ्या मिळतात. ही चवीस कडू व पचनास गोड असते. ही वात व पित्तनाशक असून सर्व शरीरधातूंना बल देणारी, बुद्धीचा तल्लखपणा वाढविणारी व डोळ्यांना हितकारक आहे. पित्तप्रकोप, अपचन आणि जुलाब यासाठी मधातून शतावरी दिली जाते. शक्ती वाढविण्यासाठी शतावरी चूर्ण दुधात खडीसाखर मिसळून द्यावे. मुतखड्यासाठी शतावरीचा रस सात दिवस सकाळच्या वेळी घ्यावा. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छाती दुखणे, घशाला जळजळ, तोंडास कोरड पडणे, डोके दुखणे, आंबट कडू ढेकर, बेंबीभोवती पोट दुखणे या व्याधींवर गुणकारी आहे. मूत्राशयाच्या रोगावर व बाळंतपणात मातेस दूध सुटण्यासाठी शतावरी अत्यंत उपयुक्त आहे. (टीप ः शतावरीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी वैद्याचा सल्ला घेणे आवश्यक आहे.) संपर्क ः डॉ. विक्रम जांभळे ः०२४२६- २४३२९२ (औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)