आल्याचे दर्जेदार उत्पादन दाखविताना दंदाले दांपत्य.
आल्याचे दर्जेदार उत्पादन दाखविताना दंदाले दांपत्य.

आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता 

बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व कुसुमबाई या दंदाले दांपत्याने आले पिकाच्या शेतीत सातत्य टिकवले आहे. दरवर्षी सुमारे एक ते दीड एकरातील हे पीक एकरी १४० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना देऊन जाते. बांधावरच व्यापारी खरेदी करीत असल्याने विक्रीचा प्रश्‍न सोडवला आहे. मजूरटंचाईची समस्या लक्षात घेता कपाशीपेक्षा याच पिकाने आर्थिक सक्षमता दिल्याचे दंदाले सांगतात.    बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुका मुख्यालयापासून १८ किलोमीटरवर खल्याळ गव्हाण गाव आहे. साधारणतः दोन हजार लोकवस्तीचे हे गाव खडकपूर्णा प्रकल्पामुळे पुनर्वसित झाले आहे. या प्रकल्पामुळे बरेच शेतकरी भूमिहीन तर अनेकजण अत्यल्पभूधारक झाले. गावातील दिनकरराव दंदाले हे सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आहेत. खडकपूर्णा प्रकल्पात त्यांची जमीन गेल्यानंतर २००१-०२ मध्ये १.२३ हेक्टर जमीन विकत घेत पत्नी सौ. कुसुमबाई यांच्या नावे केली. कुसुमबाईंनाही शेतीची आवड असल्याने नवे काही करून दाखविण्याची जिद्द बाळगत त्यांनी पारंपरिक पिकांतून भरघोस उत्पादन घेतले.  कुटुंब वळले आले पिकाच्या शेतीकडे  साधारण २०१४-१५ च्या दरम्यान हे कुटुंब आले पिकाच्या लागवडीकडे वळाले. यापूर्वी कपाशी हे त्यांचे मुख्य पीक होते. मात्र या पिकात मजूरटंचाईची मोठी समस्या होती.  गावातील शेतकरी आले पिकाकडे वळत होते. दंदले यांनीही या पिकाचा अभ्यास करून त्यात उतरावयाचे ठरवले. सुरवातीला ७० हजार रुपयांचे सात क्विंटल बेणे विकत आणले. पहिले आश्‍वासक उत्पादक मिळाले. उत्पन्नही चांगले मिळू लागले. मग या पिकातील रुची वाढत गेली.  लागवडीत सातत्य  गेल्या सहा वर्षांपासून दंदले यांनी आले लागवडीत खंड पडू दिलेला नाही. दरवर्षी सुमारे एक ते दीड एकरात आल्याची लागवड असते. या सहा वर्षात दरात चढ-उतार झाले. परंतु नुकसान फारसे झेलावे लागलेले नाही. सातत्यामुळे काही वेळा वाढीव दराचही फायदा झाला आहे. आले शेतीत दंदाले दांपत्याचा मुलगा दीपक कृषी पदवीधर आहे. साहजिकच त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा मोठा फायदा होतो. दीपक हे कृषी सहायक असून त्यांचे नोकरीचे ठिकाण १८ किलोमीटरवर आहे. सुटीच्या दिवशी तेही घरच्या शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. यावर्षी त्यांनी व्यापाऱ्यांना जागेवरच ८६०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार केला आहे. ०.६० हेक्टर क्षेत्रात किमान २०० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. सध्या ही काढणी सुरू झाली आहे. यावर्षी लागवड क्षेत्रात वाढ केली आहे.  आले शेती व्यवस्थापन- ठळक बाबी 

  • लावणीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक स्तरावर तंत्रशुद्ध व्यवस्थापन. 
  • वाण- माहीम. 
  • आल्याची काढणी केल्यानंतर बियाण्यासाठी चांगल्या दर्जाचे आले व्यवस्थित निवडतात. 
  • लागवडीपूर्वी संयुक्त बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया. 
  • गादीवाफ्याचा (बेड) वापर. बेडवर डवऱ्याच्या साह्याने दोन चर पाडून त्यामध्ये चरात प्रत्येक २० सेंटिमीटरवर ३० ते ३५ ग्रॅम वजनाचे कंद लावले जातात. 
  • जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लागवडीची वेळ साधतात. 
  • लागवडीपूर्वी दरवर्षी एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखताचा वापर. घरची सुमारे ८-९ जनावरे. 
  • त्यामुळे खत पुरेसे उपलब्ध होते. 
  • उगवण होण्यापूर्वी तणनाशकाचा वापर. 
  • एकरी ७५ किलो डीएपी खताची मात्रा देऊन मातीची भर. 
  • लागवडीनंतर दोन महिन्यांनी खताचा दुसरा डोस. या वेळी अमोनियम सल्फेट अधिक सिंगल सुपर फॉस्फेट अधिक पोटॅशचा वापर. 
  • तिसरा डोस पीक चार महिन्यांचे झाल्यानंतर. १२ः३२ः१६ एकरी दोन बॅग आणि चौथा डोस सहा महिन्यांनी १०ः२६ः२६ एकरी ३ बॅग. 
  • गरजेनुसार विद्राव्य खते. उदा. १९ः१९ः१९, १२ः६१ः०. कंदाची फुगवण होण्यासाठी ०ः५२ः३४ आणि गुणवत्ता वाढीसाठी ०ः०ः५०. 
  • अझोस्पिरीलम, स्फुरद विरघळवणारे जीवाणू यांचा वापर. 
  • कंदकुज टाळण्यासाठी प्रतिबंधकात्मक ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग. तसेच कॉपर ऑक्सी क्लोराईड बुरशीनाशकाचाही पर्याय. 
  • मार्केटचा अभ्यास करून काढणी  आले पिकाचे मार्केट सातत्याने बदलत असते. वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये असलेल्या दरांचा अंदाज घेऊन दंदाले आल्याची काढणी करण्याचे नियोजन करतात. दीपक दंदाले म्हणाले की, गावात सुमारे १०० आले उत्पादक असतील. साहजिकच क्षेत्र वाढल्याने व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी अधिक माल उपलब्ध होतो. त्यामुळे जागेवर येऊन खरेदी करण्याला ते पसंती देतात. काढणी करणे, आले धुणे, स्वच्छ करणे आदी कामे त्यांच्याकडे असतात. हा खर्च व त्यातील श्रमांमध्ये बचत होते. केवळ काढणी केलेल्या मालाचे वजन करणे व पैसे घेणे एवढे काम सोपे होऊन जाते.  आल्यातून प्रगती  दीपक म्हणाले की, दरवर्षी आल्याचे एकरी १४० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यंदा क्विंटलला ८६०० रुपये दराने विक्री केली. यापूर्वी ५९००, ४००० ते २५०० रुपये अशा दरानेही विक्री केली आहे. अर्थात हा दर बांधावर मिळतो. एकरी खर्च वजा जाता सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. या पिकाच्या भरवशावर प्रगती साधता आली.  दीपक यांनी नवीन कार कर्जाऊ घेतली. मात्र पुढील वर्षीच आले पिकातील उत्पन्नातून कार कर्जमुक्त केली. गेल्या हंगामात आलेल्या उत्पन्नातून साडेपाच लाख रुपये खर्च करून विहीर खोदली. शेतात एक लाख रुपये खर्च करीत गाळ टाकला. देऊळगावराजा शहरात चार खोल्यांचे घर घेणे शक्य झाले आहे.  संपर्क- दीपक दंदाले- ७५८८६८९१८८, ८८०५९००५६४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com