शेतीमाल मूल्यवर्धनात दत्तगुरू कंपनीची आघाडी

हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील व अनुभवी शेतकरी एकत्र आले. त्यांनी शिवणी येथे दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. सोयाबीन, तूर, हळद, हरभरा आदींची प्रक्रिया व मूल्यवर्धित साखळी तयार केली. आश्‍वासक उलाढालीतून कंपनी यशाचे शिखर गाठण्यासाठी मार्गक्रमण करीत आहे.
हळद प्रक्रियेसाठीचे सयंत्र.
हळद प्रक्रियेसाठीचे सयंत्र.

हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील व अनुभवी शेतकरी एकत्र आले. त्यांनी शिवणी येथे दत्तगुरू शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. सोयाबीन, तूर, हळद, हरभरा आदींची प्रक्रिया व मूल्यवर्धित साखळी तयार केली. आश्‍वासक उलाढालीतून कंपनी यशाचे शिखर गाठण्यासाठी मार्गक्रमण करीत आहे.   हिरोली हा जिरायती बहुल जिल्हा आहे. तुलनेने कमी पाण्यात किफायतशीर उत्पादन मिळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी हळदीकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले. क्षेत्रही वाढल्याने हळदीचा जिल्हा अशी नवीन ओळख हिगोलीला मिळत आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, तसेच सक्षम विक्री, प्रक्रियेसाठी नाशिक येथील सह्याद्री शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांची प्रेरणा यातून जिल्ह्यात शेतकरी कंपन्या स्थापन होण्यास मदत झाली. दत्तगुरू कंपनीची स्थापना पणन परवाना धोरणानंतर जिल्ह्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा उदय झाला. शेतकरी उत्पादक कंपन्या परवाने घेऊन विपणन व्यवस्थेत उतरल्या. सन २०१८ पासून शेतीमाल खरेदी विक्री प्रक्रियेतील अनुभवी सूर्याजी शिंदे (पांगरा शिंदे, ता. वसमत) व गंगाधरराव शृंगारे (टाकळगव्हाण, ता. कळमनुरी) यांच्या प्रयत्नांतून एक ऑगस्ट २०२० मध्ये दत्तगुरू शेतकरी कंपनीची स्थापन झाली. संचालक मंडळात त्यांच्यासह तान्हाजी शिंदे, गजानन भुसागरे, सुरेश देशमुख, गणेश मस्के यांचा समावेश आहे. हिंगोली-कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी येथे (मसोड फाटा) सहा एकर जमीन घेतली. तेथे २५ हजार चौरस फूट आकाराचा भव्य निवारा उभारला. शेतीमाल स्वच्छता व प्रतवारी, हळद व हरभरा प्राथमिक प्रक्रिया व विक्री हे कंपनीने मुख्य उद्देश ठेवले. २१ सप्टेंबर २०२० पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. कंपनीचे १० संचालक व सुमारे १३० सदस्य आहेत. शेतीमाल खरेदी व्यवस्था कंपनीने हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांतील १०० गावांतील शेतकऱ्यांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले. त्याचे सहा हजार सदस्य आहेत. त्याआधारे दररोज सकाळी दरांची माहिती दिली जाते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आवक असते. मालातील आर्द्रता, माती, डागी मालाच्या निश्‍चित केलेल्या प्रमाणानुसार दर दिले जातात. उदा. सोयाबीनसाठी १० टक्के आर्द्रता, दोन टक्के माती, दोन टक्के ‘डॅमेज’ असल्यास जाहीर प्रमाणित दरानुसार खरेदी होते. शेतकऱ्यास दर पसंत पडल्यासच वाहनातून माल उतरवून घेत वजनमाप होते. प्लेटकाटा व पोते असे दोन्ही पर्याय आहेत. रिकाम्या बारदान्याचे वजन एकूण वजनातून वजा होते. कडती घेतली जात नाही. फक्त हमाली (प्रतिक्विंटल सरासरी १५ रुपये) घेतली जाते. चुकारे रोखीने वा ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात .   हळदीचे मूल्यवर्धन कंपनीने हळद खरेदी केंद्र, ग्रेडिंग व डबल पॉलिशिंग युनिट सुरू केले आहे. त्यामुळे मसाला उद्योगांना आवश्यक प्रतीची हळद उपलब्ध होते. ५० किलो वजनी पोत्यातून खरेदीदारांना पुरवठा होतो. एकूण खरेदीच्या २० टक्के हळदीपासून संयंत्राद्वारे पावडरनिर्मिती होते. दत्तगुरू ब्रॅण्डने २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम, २५ किलो, ५० किलो वजन पॅकिंगद्वारे घाऊक व किरकोळ विक्री होते. परराज्यांत मागणी गुणवत्तापूर्ण पावडरीला मुंबई, राज्याच्या विविध भागांसह गुजरात, पंजाबातही मागणी आहे. निर्यातदारांना पुरवठा होतो. मूल्यवर्धनामुळे हळद उत्पादकांना अन्य हळद मार्केटच्या तुलनेत चांगले दर मिळतात. वाहतूक खर्चही कमी लागत आहे. आजवर एक हजार टन हळद पावडरनिर्मिती व विक्री करण्यात कंपनीला यश आले आहे.  शेतकऱ्यांकडील सोयाबीनची स्वच्छता व प्रतवारी करून लातूर, नागपूर, सांगली आदी भागांतील सोया ऑइल मिल्सना पुरवठा होतो. हरभरा देशभरात तर तूरडाळ मिलला पाठविली जाते.   झालेली खरेदी खरेदी- विक्री व्यवहारातील पारदर्शकता, वेळेवर चुकारे अदा, तुलनेने अधिक चांगले दर यामुळे दीड वर्षाच्या कालावधीत हिंगोलीसह नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांतील मिळून सुमारे १५ हजारांवर शेतकऱ्यांनी कंपनीकडे विक्री केली. सोयाबीन तूर, हरभरा, हळद मिळून सुमारे अडीच लाख क्विंटल मालाची खरेदी कंपनीने केली. स्थापनेनंतर सहा महिन्यांत केवळ सोयाबीन खरेदी- विक्रीतून ४५ कोटींची उलाढाल झाली. चालू आर्थिक वर्षात ती दीडपट वा त्याहून अधिक वाढू शकते.   कंपनीचे उपक्रम दृष्टिक्षेपात

  • कंपनी कार्यरत असलेल्या पिकांतील व्यवस्थापन, काढणीबाबत आधुनिक तंत्रज्ञान प्रसार.
  • कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन. यंदा तालुक्यात गादीवाफा पद्धतीने एक एकरात राजमा लागवडीचा प्रयोग.
  • केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केंद्र. गेल्या वर्षी हमीभावाने ११ हजार क्विंटल हरभरा खरेदी. यंदा तूर खरेदीसाठी नोंदणी.
  • कंपनीने स्थानिक बेरोजगार महिला, पुरुषांना रोजगार उपलब्ध केला. हमाल, कामगार,
  • कंपनी स्टाफ मिळून १५० ते २०० जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संधी.
  • येत्या काळात फुटाणेनिर्मिती, डाळ, बेसन गिरणी व मोठ्या क्षमतेच्या गोदामांची उभारणी.
  • प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या मालास जास्तीत जास्त चांगले दर देण्याचा प्रयत्न आहे. दरांबाबत शेतकऱ्यांत जागृती केली जाते. त्यातून त्यांची सौदा करण्याची क्षमता वाढली आहे. गंगाधर शृंगारे, गजानन भुसरगे संचालक, दत्तगुरू कंपनी संपर्क-  गंगाधर शृंगारे, ९८५०३२६७९८, ७५८८१५३१९७ सूर्याजी शिंदे, ८९९९०७६३३२, ९०४९४७७१५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com