रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गती

रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गती
रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गती

परभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) येथील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामान स्थितीत तग धरू शकणाऱ्या व महिन्याला शाश्वत उत्पन्न देण्याची क्षमता असलेल्या रेशीम शेतीचा पर्याय निवडला आहे. रेशीम शेतीची गोडी लागल्याने गावच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबले आहे. बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या देवठाणा ग्रामपंचायतीतर्फे लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर, निरोगी गावाची संकल्पना साकारली जात आहे.   देवठाणा गाव दृष्टिक्षेपात

  • भौगोलिक क्षेत्र- ४३७ हेक्टर
  • लागवडीयोग्य क्षेत्र- ३८८ हेक्टर
  • लोकसंख्या- ८८२
  • शाळा- जिल्हा परिषद-.चौथी इयत्तेपर्यंत
  • अंगणवाडी- १
  • कुटुंब संख्या- १८५
  • स्वच्छतागृहे- १८५
  •   परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील देवठाणा येथील शेतकरी बागायती क्षेत्रात ऊस, हळद, कापूस तर जिरायतीमध्ये कापूस, सोयाबीन, मूग, तूर आदींचे उत्पादन घेतात. गोदावरी नदीवरील डिग्रस (ता. पालम) येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे ‘बॅकवॉटर’ गावापर्यंत येते. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असते. जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळतो. परंतु, दुष्काळामुळे जायकवाडी धरणात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुकावे लागते. रेशीम शेतीचा विस्तार....... पावसाचा अनियमितपणा, असमान वितरण यामुळे पारंपरिक पीक पध्दतीतून उत्पन्नाची खात्री न राहिल्याने गावातील काही शेतकऱ्यांनी तुती रेशीम उद्योग करण्याचे ठरविले. सन २०१२-१३ मध्ये सहा शेतकऱ्यांनी आठ एकरांवर तुती लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांना रेशीम कोषविक्रीतून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी. आर. कदम, पर्यवेक्षक व्ही. आर. कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आठ- नऊ वर्षांत गावात रेशीम उत्पादकांची संख्या ७४ तर तुती लागवड क्षेत्रात ६२ एकरांपर्यंत वाढ झाली. गेल्या दोन वर्षांत दुष्काळामुळे तुती लागवडीचे क्षेत्र कमी झाले. सध्या ३६ शेतकऱ्यांकडे ४७ एकरांवर तुती लागवड आहे. क्षेत्र कमी झाले असले तरी रेशीम कोष उत्पादकतेत वाढ झाली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीपर्यंत एकूण ३५ हजार अंडीपुंजांपासून १६० क्विंटल रेशीम कोष उत्पादन त्यांनी घेतले. रेशीम शेती दृष्टिक्षेपात

  • व्ही १ वाणाच्या तुतीची लागवड. जोडओळ पध्दतीच्या लागवडीवर भर.
  • ठिबक सिंचनाचा वापर
  • रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रांसोबत शेण आणि गांडूळखताच्या मात्रा. त्यामुळे तुतीपाला
  • दर्जेदार व रेशीम कोषही त्या गुणवत्तेचे मिळतात.
  • बायव्होल्टाईन रेशीम कीटकाचे संगोपन. त्याच्या कोषांत धाग्याचे प्रमाण अधिक.
  • कीटकसंगोपन गृहातील व्यवस्थापन देवठाणातील शेतकऱ्यांनी साधारणपणे ५० बाय २२ फूट आकाराची रेशीम कीटक संगोपनगृहे उभारली आहेत. संगोपनगृहाभोवती चार फूट उंचीची विटांची भिंत बांधली जाते. लोखंडी ॲगलवर टीन पत्र्याचे शेड टाकले जाते. विटांच्या भिंतीवर शेडनेटचे हिरव्या रंगाचे जाळीदार कापड लावण्यात येते. काही शेतकऱ्यांनी संगोपनगृहात फरशीचा वापर केला आहे. आतील तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर आर्द्रता ६० ते ६५ टक्के राखली जाते. त्यासाठी हिवाळ्यात शेडनेटच्या कापडाला समांतर प्लॅस्टिक लावले जाते. उन्हाळ्यामध्ये तागाच्या पिशव्या (पोते) लावून त्या ठिबकव्दारे भिजविल्या जातात. बांबू किंवा लोखंडी ॲगलच्या साह्याने रॅक्स तयार करण्यात येतात. त्यावर नॉयलॉन जाळीचे कप्पे तयार करून त्यावर रेशीम कीटकांचे संगोपन केले जाते. काही शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक तसेच जुन्या साड्यांचा वापर करून संगोपनगृहाचा खर्च कमी केला आहे. रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी संगोपनगृहातील स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते.   गावाने राबवलेले विधायक उपक्रम

  • शुध्द पाणी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आर. ओ. यंत्रणा. ग्रामस्थांना माफक दरांत म्हणजेच पाच रुपयांत २० लिटर पाणी. उन्हाळ्यात थंड पाण्याचा पुरवठा.
  •  गावातातील गल्ली- बोळातूंन सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॅाक्स. त्यामुळे पावसाळ्यात चिखल होत नाही.
  • प्रत्येक घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंधिस्त गटारे. त्याव्दारे एकत्रित केलेले पाणी गोदावरी नदीकाठच्या शोषखड्यामध्ये मुरविले जाते. त्यामुळे नदीत प्रदूषण नाही.
  • रस्त्यांवर सौर पथदिवे. बोअरवरील पाणी उपसण्यासाठी सौरपॅनेल्स. शेतांमध्येही सौर कृषिपंप. त्यामुळे दिवसा पिकांना अखंड पाणी देणे शक्य.
  • ग्रामपंचायत कार्यालयात संग्राम कक्ष. जन्म, विवाह, मृत्यू, उत्पन्न, जात आदी प्रमाणपत्रे संगणकीकृत स्वरूपात. पीकविमा प्रस्ताव, पीएम किसानअंतर्गंत नोंदणी.
  • गाव लहान असल्यामुळे शेतीसाठी मजुरांची समस्या असते. रेशीम व एकूणच शेतीतून उत्पन्नात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्स खरेदी केले आहेत. त्याद्वारे मशागतीपासून ते काढणीपर्यंतची कामे केली जातात. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर मात करणे शक्य झाले. काही वर्षांपूर्वी ट्रॅक्टर्सची दोनवर असलेली संख्या १८ पर्यंत वाढली आहे.
  • पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध. ग्रामसभेत सर्वानुमते सदस्य, सरपंच, उपसरपंचांची निवड. त्यामुळे निवडणुकीवर होणारा खर्च ग्रामविकासाठी वापरता येतो.
  • मिनी बॅक गावात बॅंक नाही. त्यामुळे पैसे काढण्यासाठी दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात आयडीएफची बॅंकेची मिनी बॅक सुविधा उपलब्ध केली आहे. त्याद्वारे ग्रामस्थ तसेच मनरेगाच्या कामांवरील मजुरांना गावातच पैसे मिळण्यची सोय झाली आहे. गावाला मिळालेले पुरस्कार

  • महात्मा गांधी तंटामुक्त अभियान
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गंत (जिल्हास्तर) पाणी व्यवस्थापन
  • तालुका स्मार्टग्राम
  • प्रतिक्रिया गावात रेशीमशेती सुरुवात करणाऱ्यांपैकी मी आहे. महिन्याकाठी मला दोन ते अडीच क्विंटल रेशीम कोष उत्पादन मिळते. दर्जेदार कोषांना कर्नाटकातील रामनगर येथील मार्केटमध्ये चांगले दर मिळतात. उत्पनाची खात्री झाल्यामुळे अल्प भूधारक शेतकरी रेशीम शेतीत उतरले आहेत. त्यामुळे रोजगारासाठीचे स्थलांतर थांबले आहे. -मधुकर जोगदंड, रेशीम उत्पादक   मी तीन एकर शेतीपैकी दीड एकरांत तुती लागवड केली आहे. महिन्याला २०० ते २५० अंडीपुंजांपासून १५० ते १७५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते. रेशीम शेतीमुळे खात्रीशीर उत्पन्न मिळत आहे. -संतराम जोगदंड, रेशीम उत्पादक गावातील नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली आहे. ग्रामपंचातीकडून विविध सुविधा दिल्या जातात. ग्रामस्थदेखील करांचा नियमित भरणा करतात. -के. एच. साके, ग्रामसेवक   रेशीम शेतीमुळे गावात समृध्दी आली. स्वच्छतागृहांच्या वापरामुळे गाव पाणंदमुक्त झाले आहे. सांडपाण्याची विल्हेवाट बंदिस्त गटारांव्दारे केली जाते. त्यामुळे आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. -गिरीधर जोगदंड, सरपंच

    जीवनमान उंचावले पारंपरिक पिकांमधून देवठाणा येथील शेतकऱ्यांना वर्षभरात जेमतेम उत्पन्न मिळायचे. कोरडवाहू क्षेत्रात तर खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नसे. गेल्या आठ, नऊ वर्षांत रेशीम शेतीस सुरुवात झाल्यानंतर आता मात्र महिन्याला पगाराप्रमाणे उत्पन्न मिळत आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रेशीम उत्पादकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण करून कोरडवाहू शेतीचे बागायतीत रुपांतर केले. घर बांधकाम, मुलामुलींचे शिक्षण, लग्न आदी बाबी सुलभ झाल्या आहेत. गावातील शेतकरी कर्नाटकातील रामनगरम येथे रेशीम कोष विक्रीसाठी नेतात. तेलंगणातील जंगम येथेही काही विक्री होते. सन २०१८-१९ मध्ये कोषांना सरासरी १५० ते २५० रुपये प्रति किलो तर मागील वर्षी ४५० रुपयांपर्यंत दर पोचले होते. वर्षभरात सुमारे पाच ते सात बॅचेसमध्ये उत्पादन घेतले जाते. महिन्याला ३० हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत तर वर्षाला साडेतीन ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पारंपरिक शेतीला रेशीम शेतीची जोड मिळाल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. शिल्लक उत्पन्नातून गोदावरी नदीवरून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी आणणे, विहिरी खोदणे शक्य झाले. त्यामुळे ऊस, हळद तसचे फळपिकांचे उत्पादन घेता आले. अनेक शेतकऱ्यांनी पक्क्या घरांची बांधकामे केली. ट्रॅक्टर खरेदी केले.   संपर्क- मधुकर जोगदंड - ९७६४६७१९२८ गिरधर जोगदंड - ९८९०१११००७ (सरपंच)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com