महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते जूनपर्यंत दरवर्षी केवळ कोरड्या चाऱ्याचा जास्त प्रमाणात पशुआहारात वापर केला जातो. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे तर हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरड्या चाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येत आहे. यामुळे उपलब्ध कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर केल्यास निश्चितच कमी चाऱ्यात जनावरांचे संगोपन करणे सोयीस्कर होईल. कडबा, सोयाबीन भुसकट/ गुळी, गव्हाचे काड, भाताचा पेंडा, उसाचे वाळलेले पाचट इ. वाळल्या चाऱ्याचा निकृष्ट चाऱ्यामध्ये समावेश होतो. हा चारा खाण्यास कठीण, तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेला तसेच प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असणारा चारा असतो. या चाऱ्याला जनावरांना आवडेल अशी चवही नसते. याबरोबरच त्याची पचनीयता सुद्धा कमी असते. अशा प्रकारच्या चाऱ्यातून जनावरांची पोषणतत्त्वांची शारीरिक गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करण्यासाठी महागड्या पशुखाद्याचा जास्त प्रमाणात पशुआहारात वापर करावा लागतो. महागड्या पशुखाद्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. या उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पचनीयता वाढवण्यासाठी युरिया, गूळ, मीठ किंवा मळीची प्रक्रिया केली जाते. या उपलब्ध चाऱ्याची पचनीयता व पशुआहारात वापर वाढण्यासाठी आणखीही काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. निकृष्ट चाऱ्याची पौष्टीकता वाढवा
चाराटंचाई काळात उपलब्ध वाळल्या निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढवण्यासाठी असा चारा देतेवेळी जनावरांना तात्काळ ऊर्जापुरवठा करणाऱ्या घटकांचा पुरवठा करावा. उदा. गूळ, मळी, मका, भरड इ. कारण यामुळे जनावरांच्या कोटीपोटातील तंतुमय पदार्थ पचनासाठी उपयोगी असणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढून व त्यांची क्रियाशिलता वाढल्यामुळे निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढते. टंचाईकाळात जर जनावरांच्या शरीरात नत्र व सल्फरची कमतरता असेल तर कोटीपोटातील पचनासाठी उपयुक्त जीवाणूंच्या क्रियाशीलतेला मर्यादा येतात व त्यामुळे चाऱ्याचे पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात. हे टाळण्यासाठी चाराटंचाईकाळात किंवा ज्या ज्या वेळी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर होत असेल, त्या वेळी जनावरांना योग्य मात्रेत नत्र व सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावे. हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘अ' ची कमतरता दिसून येते. या कमतरतेमुळे डोळ्यातून नियमित पाणी येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, सतत हगवण लागणे, डोळ्याचा पडदा पांढरा होणे, अंध वासरे जन्मणे अशा समस्या निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर करतेवेळी दर पंधरा दिवसांतून एकदा जीवनसत्त्व ‘अ' युक्त द्रावण तोंडावाटे द्यावे किंवा जीवनसत्त्व ‘अ' चे इंजेक्शन द्यावे. आहारात क्षार मिश्रण, मिठ गरजेचे
टंचाईकाळात उपलब्ध चाऱ्यातून क्षार व मीठाचा गरजेप्रमाणे जनावरांच्या शरीराला पुरवठा होत नाही. यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते तसेच शरीरातील संप्रेरके व इतर उपयुक्त द्रावण तयार होण्याचे प्रमाण घटते, कोटीपोटातील उपयुक्त जीवाणूंची क्रियाशीलता कमी होते, त्यामुळे चाऱ्याची पचनीयता घटते, पोषण तत्त्वांच्या कमतरतेमुळे आजार उद्भवतात. याकरिता टंचाईकाळात व इतरवेळीही क्षारयुक्त चाटण विटा गोठ्यात ठेवाव्यात, जेणेकरून जनावरं गरजेनुसार विटांना चाटून आपल्या शरीराची क्षाराची गरज पूर्ण करू शकतील. देशी जनावरांना दररोज किमान ३० ग्रॅम मीठ व संकरीत जनावरं किंवा मुऱ्हा म्हशींना ५०-६० ग्रॅम मीठ दररोज द्यावे. भाताचा पेंढा व मका कडब्यावर वाफ/ स्टीम प्रक्रिया केल्यास अशा चाऱ्यातील प्रथिनांची उपलब्धता वाढते. त्यासाठी असा चारा लहान-लहान तुकडे करून स्टिम प्रक्रिया १५ मिनिटे ते अर्धातास दिल्यास पचनीयता वाढते आणि प्रथिनांची उपलब्धता वाढते. शेळ्या/ इतर जनावराना बाहेर चरण्यासाठी चारा उपलब्ध नसल्यास विनाकारण बाहेर चरण्यासाठी सोडू नये, कारण चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंतीमुळे जनावरांच्या शरीरातील पोषणतत्त्वांचा साठा वापरला जातो. आणि दूरवर फिरूनही जनावरांना गरजेप्रमाणे चारा भेटत नाही, त्यामुळे जनावरं अशक्त, दुबळी बनतात. म्हणून अशावेळी जनावरं चरायला न सोडता उपलब्ध चारा गोठ्यातच द्यावा व व्यायामासाठी जाळीचे कुंपण करून सोडावे. शेतातील टाकाऊ पदार्थ/ दुय्यम पदार्थ जनावरांना खायला दिले जातात. परंतु असे घटक जनावरे आवडीने खात नाहीत, त्यामुळे पशुआहारात त्यांच्या वापरास मर्यादा येतात. शेतातील दुय्यम पदार्थ/ निकृष्ट चारा यांचा पशुआहारात वापर वाढवण्यासाठी त्याची पावडर बनवून या पावडरीमध्ये पशुखाद्य मिसळून त्याचे पिलेटस् (गोळी/ कांडी) बनविल्यास या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढते व पशुखाद्य तसेच चारा एकत्रित दिल्यामुळे, पिलेटस् बनवतानाच्या उष्णतेमुळे निकृष्ट चाऱ्याची पचनीयता वाढते. यामुळे दूधाळशेळ्यांसाठी/ जनावरांसाठी चारा पावडर व पशुखाद्य प्रमाण ६०ः४० किंवा ७०ः३० असे ठेवता येते. या पशुखाद्यामध्ये किमान १७ टक्के प्रथिने व एकूण पचनीयता ७० टक्के राहावी ही काळजी घ्यावी. चाऱ्यामध्ये, सोयाबीन/ तूर गुळी/ भुसकट, सूर्यफुलाची धाटं, तुराट्या, पराट्या, कडबा, भाताची साळ/ पेंढा, गव्हाचे काड, उसाची पाचट इ. चा वापर करता येतो. भाकड जनावरांसाठी असे पिलेटस् बनविताना ८०ः २० असे चारा व पशुखाद्याचे प्रमाण ठेवावे. तसे वासरं, करडं यांच्यासाठी ४०ः६० किंवा ५०ः५० असे चारा व पशुखाद्याचे प्रमाण ठेवावे. बायपास फॅट, प्रथिनांचा वापर
टंचाईकाळात वाळल्या चाऱ्याचा वापर करतेवेळी पशुआहारात प्रोबायोटिक्सचा वापर केल्यास जनावरांच्या शरीरावरील ताण कमी होऊन निकृष्ट चाऱ्यामधून पोषक घटकांची उपलब्धता वाढण्यात मदत होते. कोटीपोटामध्ये पचनक्रिया जलद करण्यासाठी लागणारे सूक्ष्मजीवाणू हे प्रोबायोटिक्सपासून मिळतात व जनावरांची पचनक्रिया वाढून दूध उत्पादनातही वाढ होते. ज्या जनावरांना निकृष्ट दर्जाचा चारा वैरण म्हणून दिला जातो. त्या जनावरांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात जीवाणूजन्य प्रथिने तयार होत नाहीत. अशा जनावरांच्या आहारामध्ये बायपास फॅट/ बायपास प्रोटीनचा वापर करावा. संपर्क ः प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)