आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दर

कोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व) हंगामाचे नियोजन करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करतात. त्याद्वारे बाजारपेठेत लवकर आंबा दाखल करण्याचा मान मिळवतात. त्यांना दरही चांगले मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रातिनिधीक बागायतदारांच्या नियोजनावर त्यानिमित्ताने टाकलेला प्रकाश.
संपूर्ण डोंगरात असलेली चव्हाण यांची हापुस आंबा बाग.
संपूर्ण डोंगरात असलेली चव्हाण यांची हापुस आंबा बाग.

कोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व) हंगामाचे नियोजन करून त्यानुसार पीक व्यवस्थापन करतात. त्याद्वारे बाजारपेठेत लवकर आंबा दाखल करण्याचा मान मिळवतात. त्यांना दरही चांगले मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रातिनिधीक बागायतदारांच्या नियोजनावर त्यानिमित्ताने टाकलेला प्रकाश. देवगड हापूस आंब्याची जगभर ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीचे तालुके हापूस उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. आंबा हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. एप्रिल-मे तो पूर्ण क्षमतेने चालतो. किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये लवकर मोहोर येतो. इथले बागायतदार अतोनात मेहनत घेत चांगल्या व्यवस्थापनातून आगाप उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. चव्हाण यांचे नियोजन भरडवाडी वायरी ( ता.मालवण) येथील नागेश श्रीकृष्ण चव्हाण हे त्यापैकीच एक शेतकरी आहेत. त्यांच्या वडिलांना शेतीची प्रचंड आवड होती. परंतु मालकीची जमीन नसल्याने १९९० मध्ये देवगड तालुक्यातील हिंदळे येथे दहा एकर आंबा बाग कराराने घेतली. पाच वर्षे देखभाल करीत चांगले उत्पादन घेतले. एकेदिवशी बागमालकाने प्रामाणिकपणे झोकून देऊन काम करणाऱ्या चव्हाण यांच्यापुढे खरेदीसाठी प्रस्ताव ठेवला. तो तत्काळ मान्य करीत १० एकर बाग खरेदी केली. आज चव्हाण यांच्या बागेत हापूसची सुमारे ४०० झाडे आहेत. उंच डोंगरावर बाग असल्याने व्यवस्थापन करताना प्रचंड कष्ट करावे लागतात. काटेकोर व्यवस्थापन

  • शेणखत, सेंद्रिय खतांसोबत गरजेनुसार रासायनिक खते, झाडांच्या पालापाचोळ्याचे आच्छादन
  • जूनमध्ये नियोजनानुसार खते.
  • सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बागेतील काही झाडांना मोहोर येण्यास प्रारंभ. त्यानंतर डोळ्यात तेल घालून काम.
  • अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका अलीकडे सातत्याने बसतो. त्या अनुषंगाने फवारणीचे वेळापत्रक. झाडावर फळे टिकवण्याच्या दृष्टीने सतत निरीक्षण.
  • आगाप आंब्याला चांगला दर बहुतांशी उत्पादकांचा आंबा मार्चनंतर बाजारपेठेत येऊ लागतो. त्यावेळी मोठी स्पर्धा करावी लागते. चव्हाण यांचा आंबा मात्र डिसेंबर, जानेवारीत बाजारपेठेत येतो. साहजिकच त्यास चांगला दर व बाजारपेठही मिळते. यंदा २६ जानेवारीला पहिली पेटी वाशी मार्केटला पाठविली. दोन डझनाच्या पेटीला साडेचार हजार रुपये तर नंतर पाठविलेल्या पाच डझनाच्या पेटीला साडेआठ हजार रुपये दर मिळाला. सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या भीतीमुळे दर साडेचार हजारांपर्यंत खाली घसरल्याचे चव्हाण यांनी सांगितले. वाशी, बेळगाव, पुणे, कोल्हापुर यासह विविध बाजारपेठांमधून मोठी मागणी त्यांच्या आंब्याला असते. असे असतात दर आगाप व नियमित हंगाम मिळून चव्हाण यांच्याकडील ५०० ते ६०० पेटी मालाची दरवर्षी होते. त्यातील आगार आंब्याची विक्री १०० ते २०० पेटीपर्यंत असते. त्यास दरवर्षी प्रति पेटी पाचहजार ते दहाहजार रुपयांपर्यंत दर मिळतो. नियमित हंगामातील दर ८०० पासून दोनहजार रुपये असतो. कुटुंबाची साथ बागेत काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. पत्नी पूनम, मुलगी मानसी, मुलगा श्रीकृष्ण अशा कुटुंबातील सर्वांची साथ चव्हाण यांना मिळते. अलीकडील काळात कलिंगडाची शेतीही ते करतात. मालवण येथे हॉटेल व्यवसायही आहे. त्यास अनुसरून गावरान कुकूटपालनही करतात. संपर्क- नागेश चव्हाण-९४२२५८४७२२ फोंडेकर यांचे व्यवस्थापन वातावरणात सतत होणारे बदल, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. त्यातच उत्पादन खर्च वाढला आहे. अशा संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता.मालवण) येथील उत्तम सूर्यकांत फोंडेकर सेंद्रिय पद्धतीवर भर देत दर्जेदार आंबा घेत आहेत. त्यांनीही बाजारपेठेत आगाप आंबा आणण्यात नाव मिळविले आहे. आढी पद्धतीने पिकविलेला आंबा ते ग्राहकांना उपलब्ध करून देतात. सेंद्रिय पध्दतीचा अवलंब

  • चौके साळेल येथे २५० तर कुंभारमाठ येथे १६० झाडे
  • १० बाय १० फूट अंतरावर लागवड करीत कमी जागेत अधिक झाडे
  • उंची आणि आकार अवास्तव वाढू नये यासाठी छाटणी. त्यामुळे व्यवस्थापन व फवारणी करणे सोपे
  • सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरवात
  • हंगाम संपल्यानंतर झाडाच्या सभोवताली रिंगण खोदून त्यात राख पसरून गवताचे आच्छादन केले जाते. त्यात गरजेनुसार पाणी सोडतात. जून आणि जुलै अखेरीस शेणखत, गांडूळखत वापरून चर बुजविला जातो. झाडांच्या पाचापाचोळ्याचाही वापर
  • फवारणीसाठी गोमुत्राचा वापर
  • पहिली पेटी पाठविण्याचा दोनदा मान नियोजित हंगामापूर्वीच उत्पादन घेण्याचा प्रयत्न असल्यामुळे पहिला हंगाम संपल्यापासून तयारी सुरू होते. प्रत्येक पंधरा दिवसांचे वेळापत्रक निश्चित करून काम करतात. फोंडेकर अन्य बागायतदारांप्रमाणे पॅक्लोब्युट्राझोल या वाढ नियंत्रकाचा वापर करीत नाहीत. सन २०१८ मध्ये नोव्हेंबरमध्ये तर २०२० मध्ये २१ जानेवारीला अशा दोनवेळा पहिली पेटी बाजारात पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला. सन २०१८ मध्ये पाच डझन पेटीला तब्बल साडे १३ हजार रुपये तर २०२० मध्ये ९००० हजार रुपये दर मिळाला. दरवर्षी एकूण हंमागवर्षात १२०० ते १५०० पेटी माल ते बाजारात आणतात. त्यातील ५०० पर्यंत पेटी आगापची असते. त्यास किमान ५००० रुपये प्रति पेटी दर मिळतो. बाजारपेठेत लवकर व सेंद्रिय असल्याने थेट ग्राहकांकडून मोठी मागणी मिळते. कोणतेही रसायन न वापरता अढीत पिकविलेल्या आंब्याला ग्राहक पसंती दर्शवितात हंगामात एकूण २० ते २२ लाख रुपयांपर्यंतची उलाढाल ते करतात. संपर्क- उत्तम फोंडेकर- ७६२०५११४०१, ८४०८८१७४३८,

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com