उसात वर्षभरात तीन आंतरपिके, राजोबा यांची कोथिंबिरीत ‘मास्टरी’ 

नाद कोथिंबिरीचा ब्रह्मनाळ गावात पोचल्यानंतर राजोबा कुठे राहतात, असा प्रश्‍न विचाराल तर कोथिंबिरीचा नाद करणाऱ्या व्यक्तीला भेटायचं आहे का? असा प्रश्‍न गावकरी करतात. कोथिंबीर पिकात मास्टरी मिळवल्यानेचआपली ही ओळख तयार झाल्याचे राजोबा सांगतात
 कोथिंबिरीची काढणी करताना महिला
कोथिंबिरीची काढणी करताना महिला

ब्रह्मनाळ (जि. सांगली) येथील अजित महावीर राजोबा यांनी आडसाली उसात वर्षभरात ठरावीक अंतराने कमी कालावधीची तीन आंतरपिके घेण्याचे कौशल्य अवगत केले आहे. कोथिंबीर, बीटरूट व मेथी ही तीन आंतरपिके उसाचा जवळपास सर्व खर्च भरून काढून उसाचे उत्पन्न निव्वळ बोनस म्हणून ठरते.  त्यांची आंतरपीक पद्धतीते गावातील शेतकऱ्यांनीही अनुकरण सुरू करीत आर्थिक सक्षमता मिळवण्यास सुरवात केली आहे.   सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ (ता. पलूस) गाव प्रामुख्याने उसासाठी ओळखले जाते. काही प्रमाणात हळदही पिकवली जाते. गावातील अजित महावीर राजोबा यांची दहा एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती मध्यम होती. एमएबीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करायची असा त्यांचा विचार होता. कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड येथे २००१ साली माध्यमिक विद्यालयात  ते इतिहासाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. परंतु नोकरीचे चाकोरीबद्ध जीवन, शिवाय मनात असलेल्या गोष्टी हव्या त्या वेळेस करता येती नसल्याची खंत वाटायची. घरची शेती खुणावत होती. त्यातच प्रयोगशीलता दाखवायची असा निश्‍चयच त्यांनी केला.  घरच्या शेतीचा ध्यास  आपले दहा एकर शिवार समृद्ध करण्याचा ध्यास होता. टोमॅटो, ढोबळी मिरची असा विविध प्रकारचा भाजीपाला ते करू लागले. अनेकवेळा अपेक्षित दर मिळायचे नाहीत. आर्थिक फटके बसायचे. शेती व्यावसायिक करण्यासाठी व उत्पन्नाचे मार्ग वाढवण्याची विचारचक्रे डोक्यात फिरू लागली. स्वतःकडील उत्पादनासह शेतकऱ्यांकडूनही खरेदी करून विक्री करण्याचे पक्के केले. सन २००८ मध्ये कर्नाटकातील बोरगाव, एकसंबा तर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी, दानोळी, कोथळी या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाजीपाला खरेदी होऊ लागला. त्यातून दौन पैसे अधिक मिळू लागले.  पीकपद्धतीच्या शैली अवगत  या व्यवसायात प्रत्येक भागातील शेतकऱ्यांकडून वेगळे अनुभव मिळाले. त्यांची शेती, पीकपद्धतीची शैली अवगत झाली. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. अभ्यास करताना आवक, दर, हंगाम यांचाही अभ्यास झाला. त्यातून स्वतःच्या शेतात स्मार्ट पीकपद्धती विकसित करायचं ठरवलं. अनुभव येत गेला. त्यात सातत्य व चिकाटी ठेवली. कौशल्य आत्मसात केलं. आज हीच पीकपद्धती राजोबा यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यास कारणीभूत ठरली आहे.   

अशी आहे स्मार्ट पीकपद्धती 

  • एकूण शेती १० एकर 
  • मुख्य पीक आडसाली ऊस 
  • त्यात वर्षभरात ठरावीक टप्प्याने कोथिंबीर, बीटरूट व मेथी यांची आंतरपिके 
  • सोबत श्रावणघेवबीन्स, 
  • कोथिंबीर हे मुख्य आंतरपीक 
  • आंतरपिकांची रचना 

  • आडसाली उसाच्या बरोबरीने कोथिंबिरीची लावण. 
  • यातही काही गुंठ्याचे भाग करून त्यात पंधरा दिवसांचे अंतर 
  • यातील पहिल्या टप्प्यातील कोथिंबिरीला दर न मिळाल्यास दुसऱ्या टप्प्यात दर मिळण्याची आशा 
  • कोथिंबिरीचे पीक सुमारे एक महिन्याचे 
  • त्यानंतर कोथिंबिरीप्रमाणेच बीट रूटचेही टप्पे करून त्याची लागवड 
  • बीट रूट हे सुमारे दोन महिन्यांचे पीक 
  • त्याच्या काढणीनंतर मेथीची लावण 
  • पुन्हा फेब्रुवारीतही सलग क्षेत्रात कोथिंबिरीची लावण 
  • व्यवस्थापन, उत्पादन- ठळक बाबी 

  • उन्हाळ्यात कोथिंबिरीची लागवड केल्यानंतर पाल्याने आच्छादन 
  • यामुळे उगवण क्षमता चांगली होते. पाणी कमी लागते. बाष्पीभवन कमी होते. 
  • वर्षभर पिकांची लावण व काढणी सुरूच असल्याने दररोज दहा मजुरांना काम 
  • मेथी, कोथिंबीर, बीटरूटची सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई आदी बाजारात विक्री 
  • बंधू अविनाश यांच्यावरही लागवडीपासून ते काढणीपर्यंतची जबाबदारी 
  • गावातील राहुल राजोबा, सुदर्शन मदवाण्णा, प्रवीण राजोबा अशा सर्व भाजीपाला उत्पादकांना सोबत घेऊन राजोबा यांनी पैलवान नावाने ‘ग्रुप’ सुरू केला आहे. ते एकत्र पिकवण्याबरोबर एकत्र विक्रीही करतात. राजोबा सांगली जिल्हा जनसेवा भाजीपाला व खाद्य पेय विक्री संघटनेचे सचिवही आहेत. 
  • आश्‍वासक उत्पादनाचा अनुभव  सव्वा एकराचे उदाहरण देताना राजोबा म्हणाले, की यंदा आडसाली उसात पहिल्या टप्प्यातील कोथिंबिरीच्या १२ हजार ते १४ हजार पेंड्या उत्पादन मिळाले. शेकडा १५०० रुपये दर मिळाला. सत्तर हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या टप्प्यात मात्र दर ८०० ते ४०० रुपये झाल्याने उत्पन्न कमी मिळाले. मेथीचे देखील तेवढ्या क्षेत्रात १२ हजार ते १४ हजार पेंड्यांपर्यंत उत्पादन मिळते. बीटरूटला मुंबई बाजारपेठेत किलोला २५ रुपये तर स्थानिक शेकड्याला ६ ते ७ रुपये दर होता. या तीनही आंतरपिकांमधून चांगले उत्पन्न मिळते. याच पिकांनी माझी आर्थिक ऊन्नती केली आहे. उसाचा सर्व खर्च निघून त्याचे उत्पन्न बोनसच ठरते.  दर (शेकडा) 

  • फेब्रुवारी ते जून - १२०० ते १५०० रु. 
  • जुलै ते सष्टेंबर- ४०० ते ८०० रु. 
  •  आक्टोंबर ते डिसेंबर- ३०० ते ४०० रु. 
  • मेथीचे दर- हंगामानुसार- ३०० ते १५०० रु. 
  • बीन्स- एकरी उत्पादन- २ टन 
  • दर प्रति किलो- ३० ते ४० रुपये 
  • क्षेत्र- २ ते ३ एकर 
  • विक्री- सांगली, कुरुंदवाड, पुणे 
  • अशक्य काहीच नसते  राजोबा सांगतात, की नोकरी सोडल्यानंतर कोथिंबीर तसेच अन्य आंतरपिके घेऊ लागलो. तेव्हा गावातील अनेकांनी नोकरी सोडून या पिकांची जोखीम कशाला घेतोस? नुकसान होईल असे सांगण्यास सुरूवात केली. केवळ ऊस पिकातून मिळणारा पैसा एवढंच मला माहिती आहे असा त्यांचा गैरसमज झाला होता. पण एखादी गोष्ट अभ्यासपूर्ण व नियोजबद्ध करायची असे ठरवून जीव ओतून काम केलं तर काहीच अशक्य नसते हे मी आज सिद्ध केले आहे. आता पूर्वी माझ्यावर अविश्‍वास दाखवणारे देखील याच पीकपद्धतीचा अवलंब करू लागल्याचे राजोबा यांनी सांगितले.  संपर्क- अजित महावीर राजोबा - ७०३०१०३९८९   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com