जिद्द, चिकाटी, कष्टाची तयारी असली की यशाला गवसणी घालणे कठीण नसते. चळे (जि. सोलापूर) येथील तरुण उच्चशिक्षित शेतकरी ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी हे सिध्द केले आहे. नवे प्रयोग, त्यातील अपयशे, त्यावर अभ्यास व हिंमतीतून मात त्यांनी करार शेती करीत २८ एकरांपर्यंत बागेचा विस्तार केला. प्रतिझाड, प्रतिकिलोवर डाळिंबाचे अर्थकारण तयार करून निर्यातक्षम उत्पादन घेतले. आज वाघमोडे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श उदाहरण तयार झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून १५ किलोमीटरवर भीमा नदीच्या काठावरील चळे गावाची ओळख पूर्वीपासून उसासाठी आहे. अलीकडील वर्षात ऊसदराची स्थिती बिघडल्याने शेतकरी डाळिंबाकडे वळले आहेत. याच गावाचे ज्ञानेश्वर वाघमोडे यांचे वडील मारुती यांना दोन एकर शेती होती. साहजिकच मजुरी आणि ऊसतोड कामगार म्हणून ते काम करीत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी ज्ञानेश्वर आणि शिवाजी या दोन्ही मुलांना शिकवले. शिवाजी जेमतेम चौथीपर्यंत शिकले. मग तेही वडिलांसोबत मजुरीत रमले. ज्ञानेश्वर यांनी तरी शिकावे म्हणून वडिलांनी अट्टाहास धरला. ज्ञानेश्वर यांना शिक्षणात चांगला रस होता. पण शेतीचीही ओढ होती. प्रयोगांसह उच्चशिक्षणही ज्ञानेश्वर पहिल्यापासूनच प्रयोगशील वृत्तीचे आहेत. बीएचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आपल्या भागात प्रचलित नसलेल्या बटाटा, अळिंबी शेतीचे प्रयोग केले. पण ते फेल गेले. निराशा पदरी घेत बीएची पदवी पूर्ण केली. सन २००२ मध्ये पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून नोकरी सुरू केली. पण यातून भविष्य घडत नव्हते. दोन-तीन वर्षांनंतर एमएड केले. पुढे सेट, नेट परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. परिसरातील विना अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकही झाले. आता पी.एचडी पदवीही अंतिम टप्प्यात असल्याचे वाघमोडे सांगतात. शेतीतच भवितव्य दिसले खरे भवितव्य शेतीतच दिसत होते. सन २००८ मध्ये शेतीतच पूर्ण लक्ष घातले. डाळिंबाचे पीक निवडले. काळी जमीन आणि ऊसपट्ट्यात डाळिंब यशस्वी होईल का याबाबत आजूबाजूचे शेतकरी शंका व्यक्त करत होते. पण, ज्ञानेश्वर यांचा निश्चय ठाम होता. लेक्चररने वाढवला आत्मविश्वास सुमारे ३५० झाडांपासून सुरवात झाली. सगळी मिळून अवघी ३८० फळे निघाली. काही जणांसाठी हा विषय चेष्ठेचा ठरला. ज्ञानेश्वर यांनी हिंम्मत मात्र सोडली नाही. मात्र, नव्या उमेदीने शेती सुरू ठेवली. अशातच बीएडच्या सहकारी लेक्चरने निर्यातक्षम शेती उत्पादकाची भेट घालून दिली. तिथून तंत्रशुध्द, शास्त्रीय व्यवस्थापनाला सुरवात झाली. किलोला १७० रुपये दर ज्ञानेश्वर यांनी अभ्यासपूर्ण, निर्यातक्षम शेती सुरू केली. दरम्यान २०१२ मध्ये दुष्काळात अत्यंत कमी आवक असलेल्या वर्षी ज्ञानेश्वर यांच्या दर्जेदार डाळिंबाला उच्चांकी १७० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. त्या वेळी एकूण उत्पन्नही वीस लाखांच्या पुढं गेलं. त्यानंतर मात्र ज्ञानेश्वर यांचा डाळिंब शेतीतील प्रवास चिकाटी व चोख व्यवस्थापनातून सुरू राहिला तो आजगायत. केली करार शेती सन २०१३ च्या दरम्यान शेती विकत घेण्याचा विचार होता. पण आर्थिक परिस्थिती नव्हती. मग धाडस करून शेजारच्या रांजणी गावात नऊ एकर शेती दहा वर्षांच्या भाडेपट्टा कराराने घेतली. एकरी वार्षिक ५० हजार ते ६० हजार रुपये त्याचे शुल्क आहे. ज्ञानेश्वर यांची आजची शेती व वैशिष्ट्ये
गुणवैशिष्ट्ये व झालेले फायदे
वीस मजुरांना वर्षभर काम एकेकाळी मजूरकाम करणारे ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबाकडे दररोज २० मजूर काम करतात. स्वतःच्या प्रगतीबरोबर आज २० कुटुंबे वाघमोडे आपल्या शेतीतून चालवतात. अर्थकारण कसे असावे---ज्ञानेश्वर सांगतात अलीकडील काळात डाळिंबाचे दर घसरले आहेत. मात्र मी चिंता करीत नाही. त्याचे अर्थकारण पक्के बसवले आहे. प्रतिकिलो २२ रुपये खर्च व १० किलो प्रतिझाड उत्पादन असे गृहीत ठेवतो. तीस रुपये प्रतिकिलो दर मिळाला तर उत्पन्न ३०० रुपये व खर्च २२० रुपये व नफा ८० रुपये मिळेल. - प्रत्येक फळ निर्यातक्षम व दोनशे ग्रॅम वजनाचे पिकविण्याचा प्रयत्न करतो. अर्ली हस्त बहर घेतो. त्याची फळे युरोपीय बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. या फळांना किलोला १०० ते त्यापुढे दर अनेकवेळा मिळाले आहेत. - व्यवस्थापन करणे शक्य आहे एवढ्याच झाडांचा विचार करावा. झेपणार नाही एवढी झाडे ठेवू नयेत. अन्यथा त्याकडे दुर्लक्ष होते. उत्पादन - प्रातिनिधीक
संपर्क - ज्ञानेश्वर वाघमोडे - ९८८१६५४५२५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.