शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी पीक ! वाचा सविस्तर..

दादासाहेब माळी यांचा बहरलेला शेवगा
दादासाहेब माळी यांचा बहरलेला शेवगा

कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर येथील तरुण शेतकरी दादासाहेब माळी यांनी शेवगा हे आपले हुकमी पीक करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभर असलेली मागणी, कमी पाण्यात येणारे पीक व समाधानकारक मिळणारे दर या कारणांमुळे त्यांनी या पिकाशी जवळीक साधली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवत गुणवत्तेसह एकरी १४ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे.या सातत्यपूर्ण प्रयत्नानेच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून २० किलोमीटर अंतरावर मंगळवेढा-भोसे मार्गावर नंदेश्वर येथे युवा शेतकरी दादासाहेब माळी यांची सुमारे ३० एकर शेती आहे. त्यात प्रत्येकी दोन एकर डाळिंब व शेवगा आहे. सात एकर ज्वारी आणि अन्य क्षेत्रावर मका, मटकी अशी पिके आहेत. नंदेश्वर पटट्यात ऊसासह द्राक्ष, डाळिंब पिकेही घेतली जातात. या भागात पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत नाही. पाऊसही अत्यंत कमी पडतो. बोअर आणि विहिरीच्या पाण्यावरच सर्वाधिक शेती होते. माळी यांच्याकडे दोन विहिरी आणि पाच-सहा बोअर आहेत. मात्र पाणी जेमतेम आहे. याच पाण्यावर १० ते १२ एकर क्षेत्र ते बागायती करू शकतात. आई-वडिलांसह तीन भाऊ, भावजय असे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. पैकी तिघे शेती करतात. धाकटे समाधान नोकरी करतात. मात्र कुटुंबाचा सर्वाधिक भार शेतीवरच आहे. दादासाहेबांची शेवगा शेती दादासाहेब यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले आहे. पाच वर्षांपूर्वी पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले. नोकरीही लागली. पण त्यातून फारसे काही हाती येत नव्हते. अखेर त्यांनीही सन २०१५ च्या सुमारास अन्य भावांबरोबर शेतीकडेच लक्ष देण्यास सुरुवात केली. पारंपरिक शेती व्यतिरिक्त नवं काही तरी करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातूनच शेवग्याची निवड केली. दोन ते अडीच एकर क्षेत्र निश्‍चित केले. सन २०१६ मध्ये हलक्या ते मध्यम जमिनीत अकरा बाय सात फूट अंतरावर लागवड केली. ठिबक सिंचनाचीही यंत्रणा उभारली. झाडांची समाधानकारक वाढ लागवडीनंतर महिनाभरानंतर झाडांची चांगली वाढ झाली. प्रत्येक झाडाचा शेंडा खुडला. त्यामुळे पुन्हा एकदा झाडांना चांगला बहर आला. लागवडीच्या पहिल्या आठवड्यापासून काही दिवस दोन तास पाणी सोडले. पुढे गरजेनुसार अर्धा तासच एक-दोन दिवसाआड पाणी दिले. ठिबक असल्याने पाण्याची बचत झाली. विद्राव्य खतांच्या ग्रेडसचा वापर करण्याबरोबरच एकरी २०० लिटर जीवामृत ठिबकद्वारे दिले. लागवडीनंतर पहिल्या पंधरवड्यात एक आणि अडीच महिन्यांनंतर एकदा अशी दोनवेळा खुरपणी केली. किडी-रोगांच्या प्रादुर्भावानुसार दर पंधरा दिवसांनी आलटून-पालटून फवारण्या घेतल्या. शेवग्याची छाटणी साधारण जानेवारीमध्ये एक फुटापर्यंत झाड ठेवून फांद्या, वेली यांची पूर्णपणे छाटणी करून घेतली जाते. त्यानंतर बहर धरला जातो. छाटणीनंतर साधारण तीन महिन्यांनंतर पुढे उत्पादनास सुरुवात होते. ती डिसेंबरपर्यंत राहते. छाटणीला शेवग्यामध्ये फारच महत्त्व आहे. त्यामुळे झाडांची पूर्णपणे पानगळ होत असल्याने नव्याने फुटी फुटण्यास मदत होतेच. शिवाय झाडे पूर्ण क्षमतेने उत्पादनासाठी तयार होतात. शेवग्याला सोलापूर मार्केट, सर्वाधिक ६८ रुपये दर राज्यात यंदा अनेक ठिकाणी अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र दादासाहेबांना कमी पाऊसमान आणि वातावरणाचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे यंदा तुलनेने उत्पादनात काहीशी घट झाली. प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे तोडा केला. प्रत्येक तोड्याला ७०० ते ८०० किलो शेंगा मिळाल्या. एकूण १० ते १२ तोडे मिळाले. सोलापूर बाजार समितीचे मार्केट शेवग्यासाठी चांगले असल्याचे दादासाहेब सांगतात. वाहतुकीच्या दृष्टीनेही हे मार्केट त्यांना सोयीस्कर ठरते. प्रति किलोला २२ रुपये तर सरासरी ३५ ते ४० रुपये दर त्यांना मिळतो आहे. मागील वर्षी सर्वाधिक ६८ रुपये कमाल दर त्यांना मिळाला. किफायतशीर अर्थकारण मेमध्ये सुरू झालेला फ्लॅाट आता संपत आला आहे. आत्तापर्यंत साधारण एकरी सरासरी साडेनऊ टन उत्पादन मिळाले आहे. सरासरी दर ३५ रुपये मिळाला आहे. दरवर्षी या पिकासाठी एकूण उत्पादन खर्च सुमारे ५५ हजार रुपये येतो. एकरी सुमारे १० ते १४ सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. आर्थिकदृष्ट्या मिळाले स्थैर्य दादासाहेबांनी नोकरीचा विचार सोडून शेतीत लक्ष घातले. नवीन काही तरी करण्याची जिद्द बाळगली. मात्र त्यासाठी स्वतःहून कष्ट घेतले. शेवग्यासोबत नव्याने दोन एकरांवर डाळिंबाची लागवडही केली आहे. यंदा त्याचा बहर धरला जाणार आहे. दुष्काळाच्या स्थितीत कमी पाण्यावरील या पिकाने उत्पन्नात भर टाकण्याबरोबर संकटातही तारले आहे. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिल्याची भावना दादासाहेब माळी यांची आहे.   माळी यांनी घेतलेले शेवग्याचे उत्पादन आणि उत्पादन

वर्ष उत्पादन (एकरी) दर (रुपये) प्रति किलो
२०१९ साडेनऊ टन ३५ रु. 
२०१८ १४ टन ५० रु. 
२०१६ ५ टन ३० रु. 

संपर्क - दादासाहेब माळी - ९७६३६९३५७३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com