सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला बाजारपेठ

मालेगाव येथील भगवान इंगोले बहुविध पिकांच्या सेंद्रिय शेतीत कार्यरत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून हळद पावडर, गूळ, धान्ये आदींचे गट करून राज्यासह परराज्य व बांगला देशात त्यांनी बाजारपेठ मिळवली आहे.
सेंद्रिय हळद पावडर, गूळ व तीळ
सेंद्रिय हळद पावडर, गूळ व तीळ

नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव येथील भगवान इंगोले दहा वर्षांपासून बहुविध पिकांच्या सेंद्रिय शेतीत कार्यरत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून हळद पावडर, गूळ, धान्ये आदींचे गट प्रमाणीकरण व मूल्यवर्धन करून राज्यासह परराज्य व बांगला देशात त्यांनी बाजारपेठ मिळवली आहे. नांदेड शहरापासून पंधरा किलोमीटरवर मालेगाव (ता. अर्धापूर) आहे. येथील भगवान इंगोले यांनी दहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीत दमदार ओळख तयार केली आहे. मानवी आरोग्य व पर्यावरणाचे संवर्धन ही मुख्य उद्दिष्टे त्यांनी जपली आहेत. हळद, ऊस हरभरा, उडीद, मूग आदी पिके ते घेतात. सेंद्रिय व्यवस्थापनातील बाबी

  • झाडांनाही संवेदना असतात हे समजून सकाळ-संध्याकाळ सुमधुर संगीत त्यांना ऐकवले जाते.
  • सेंद्रिय जैविक शेती प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षण
  • योगविद्या शिक्षण. त्यामुळे मानसिक तणावातून मुक्ती मिळते. शेतीतील समस्यांचा सामना करण्यासाठी स्फूर्ती व शक्ती प्राप्त होते. सकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो अशी इंगोले यांची धारणा.
  • निविष्ठा बाहेरून न आणता शेतातच तयार करण्यावर भर. जिवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गांडूळ खत, नाडेप कंपोस्ट खत प्रकल्पाचे प्रशिक्षण व शेतातच निर्मिती.
  • शेतातील काडीकचरा, पीकअवशेष, उसाचे पाचट, गवत यांचे आच्छादन. जमिनीत गाडण्यात येते. त्यातून सेंद्रिय कर्ब वाढतो.
  • जिवाणू कल्चर व बीजामृताची बीजप्रक्रिया. हळदीला दर महिन्याला ठिबकद्वारे जिवामृत. ट्रायकोडर्मा, वेस्ट डी कंपोजर यांचाही वापर.
  • चार देशी गायी. गोमूत्र व शेणाचा उपयोग सेंद्रिय निविष्ठांसाठी.
  • बायोगॅस यंत्रणा. त्या इंधनावर स्वयंपाक. स्लरीपासून गांडूळ खतनिर्मिती.
  • जिल्हा परिषदेकडून कृषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित (२००८)
  • हळद, गूळ उत्पादन हळदीचे (वाळवलेल्या) एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात. त्यापासून पावडरनिर्मिती करतात. बंगळूर येथील शासकीय प्रयोगशाळेतून कुरकुमीन व अन्य घटकांची तपासणी केली. त्यास पीजीएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. शंभर ग्रॅम ते एक किलो प्लॅस्टिक पाऊचमधून २०० रुपये प्रति किलो एमआरपी दराने विक्री होते. मागील वर्षी चार टन विक्री केली. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, राजस्थान आदी ठिकाणी मागणीनुसार हळद पाठवली जाते. ऊस दोन एकर असून, एकरी ४० टन उत्पादन होते. त्यापासून गूळ बनवून घेतला जातो. किलोला ७० ते ८० रुपये दराने विक्री होते. गट व कंपनीची स्थापना

  • सेंद्रिय शेतीचा फायदा गावातील शेतकऱ्यांना व्हावा, त्यांच्या मालालाही बाजारपेठ मिळावी या हेतूने एक जानेवारी २०१९ रोजी आत्मा व पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत मालेगाव ओमशांती ऑरगॅनिक शेतकरी गटाची स्थापना
  • ३४ शेतकऱ्यांच्या सुमारे ५० एकरांत त्याद्वारे धान्य, भाजीपाला, फळांचे  उत्पादन
  • गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांकडे शेतीशाळा. सुरुवातीला ध्यानधारणा करून बैठकीची सुरुवात. शेतकऱ्यांच्या अडचणी, नवे तंत्रज्ञान, ज्ञान यांची देवाण-घेवाण होते.
  • भगवान यांचे बंधू प्रल्हाद यांच्या पुढाकाराने आता शेतकरी मित्र उत्पादक कंपनीची स्थापना
  • संदीप डाकुलगे गटाचे उपाध्यक्ष, बालाजी सावंत सचीव तर भीमराव इंगोले सहसचिव.
  • कंपनीच्या सभासदांकडील सुमारे १५० टन सेंद्रिय हळदीची मागील वर्षी बांगलादेशात निर्यात
  • गटाच्या माध्यमातून वृक्षारोपण, माती परीक्षण, जलसंवर्धन याविषयी जागृती
  • आरोग्यदायी मालाची थेट विक्री

  • गटाच्या माध्यमातून नांदेड शहरात दोन ठिकाणी ‘विठोबा नैसर्गिक भाजीपाला विक्री केंद्र. यात सेंद्रिय भाजीपाला, धान्ये-डाळी, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश.
  • सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव पावडे यांचे त्यासाठी सहकार्य
  • विक्रीतून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला. शिवाय गटाला दिवसाला १० ते१५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
  • सर्वांचा माल निवडक शेतकरी आळीपाळीने नेऊन विकतात. त्यामुळे सर्वांच्या वेळेत बचत होते.
  •  शहरी ग्राहकांना आरोग्यदायी शेतीमाल मिळतो.
  • घराला ‘ॲग्रोवन’चे नाव भगवान ‘ॲग्रोवन’चे पहिल्या दिवसापासून वाचक आहेत. यातील लेख, यशकथा प्रेरणादायी असतात. त्यातूनच शेतीत वेगवेगळे प्रयोग करता आले. प्रगती साध्य झाली. याच प्रेमापोटी त्यांनी आपल्या शेतातील दुमजली घराला ॲग्रोवनचे नाव दिले आहे. आई, मावशीसह ते येथे राहतात. वरच्या मजल्यावर प्रशिक्षण केंद्र व संगीत ऐकवण्याची व्यवस्था आहे. बोंड अळी दाखवा, बक्षीस मिळवा मागील वर्षी एक एकरात सेंद्रिय घटकांवर कापूस पोसला. पीक संरक्षणासाठी झेंडू, मका, चवळी, एरंडी अशी मिश्र सापळा पिके घेतली. दर पंधरा दिवसांनी दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डी कंपोजर यांची फवारणी केली. कपाशीवर गुलाबी बोंड अळी दाखवा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन त्यांनी केले होते. यामुळे कृषी अधिकारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. परंतु अळी आढळली नाही. या प्रयोगातून मनोबल वाढल्याचे इंगोले सांगतात. संपर्क- भगवान रामजी इंगोले, ९४२१२९५९८४, ७३८७२९१०५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com