राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी गावातील शनेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांनी शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे. सुमारे वीस सदस्यांनी मशागतीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध नऊ यंत्रांची सुविधा व वापर सुरू केला आहे. नगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाथर्डी हा दुष्काळी तालुका आहे. भागातील अनेक गावांत सिंचनाचा अभाव आहे. तालुक्यातील राघोहिवरे येथील अनेक शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. गावातील अण्णासाहेब होंडे, सचीन काठमोळे, हरिभाऊ झरेकर, कुंडलिक दहिफळे, रामदास नरवडे, भगवान नरवडे, विलास गायकवाड विशाल नरवडे, दिपाली नरवडे, सुजानाबाई होंडे हे दहा शेतकरी कापसाचे बियाणे खरेदी करण्यासाठी एकत्र आले. सन २०१२-१३ मध्ये जय श्रीराम शेतकरी गटाची स्थापना त्यातून झाली. मासिक बचत, एकत्रित बियाणे, खते व अन्य निविष्ठा खरेदी आदी बाबीतून गट कार्यरत झाला. जमा झालेल्या रकमेतून एकमेकांना मदत होऊ लागली. गटाचे नियमित लेखापरीक्षण होऊ लागले. शेतकरी वळले यांत्रिकीकरणाकडे
सुरुवातीला तीन वर्षे प्रति महिन्याला शंभर रुपये व त्यानंतर पाचशे रुपये बचत सुरू केली. त्यातून पंधरा गुंठे जमीन २९ वर्षे करारावर घेतली. तेथे कार्यालय बांधले. माल साठवणीसाठी सात लाख रुपये खर्च करुन पन्नास टन क्षमतेचे शेड उभारले. तेथे डाळमील युनिट बसवले आहे. दिवसाला तीनशे टनांपर्यंत प्रक्रियेची क्षमता असली तरी मालाच्या उपलब्धतेनुसार सध्या २५ ते ५० टनांपर्यंत प्रक्रिया होते. कंपनीच्या सदस्यांसह अन्य शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति किलो दराने डाळ तयार करून दिली जाते. त्यातून कंपनीला प्रती किलो दोन ते तीन रुपये नफा मिळतो. दोन पॉलिशिंग करणारी यंत्रे, धान्याचे ‘ग्रेडींग’ करणारी दोन यंत्रे असून कुकूट खाद्यासाठी कांडी पेंड तयार करणाऱ्या यंत्राचीही आगाऊ मागणी नोंदवली आहे. पाॅलीहाऊस, शेळीपालन राघोहिवरेच्या या शेतकऱ्यांनी अवजारांबरोबरच उच्च तंत्रज्ञानाचीही कास धरली आहे. कृषी विभागाच्या मदतीने गटशेतीमधील वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पंधरा जणांनी प्रत्येकी वीस गुंठ्याची शेडनेटस उभारली आहेत. त्यात गुलाबाची लागवड केली आहे. एकाने दूध व्यवसाय सुरू केला आहे. कंपनीचे अध्यक्ष अण्णासाहेब होंडे यांनी शेळीपालन सुरु केले आहे. त्यांच्याकडे सुमारे १५० गावरान शेळ्या आहेत. गटशेतीमधून तीन शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळे उभारले आहे. पाऊसपाणी ठीक राहिले तर त्याचा दुष्काळात फायदा होत आहे. मुरघासासाठी कुट्टी करणाऱ्या यंत्राचा आधार कंपनीतील प्रत्येकाकडे जनावरे आहेत. त्या अनुषंगाने चाराटंचाई लक्षात घेऊन मुरघासासाठी शेतातच चाऱ्याची कुट्टी करणारे यंत्र खरेदी केले आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मुरघास केला. त्याचा गेल्यावर्षीच्या दुष्काळात चांगला फायदा झाला. जनावरे जगवता आली. गेल्यावर्षी दुष्काळात छावणी चालकांना यंत्र भाडेतत्वावरही काही काळ दिले. त्यातून कंपनीला पंचवीस हजारांचा आर्थिक फायदा झाला. यांत्रिकीकरणातून अशी होतेय बचत कंपनीचे अध्यक्ष अण्णासाहेब होंडे म्हणाले की अलीकडील काळात बैलांची संख्या कमी होत चालली आहे. साहजिकच ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर वाढू लागला आहे. मात्र गटाद्वारे तुम्ही यंत्रांची सुविधा केली तर उत्पादन खर्चात मोठा फायदा होतो असे आढळले आहे. एक एकरांवर प्रचलित पद्धतीने नांगरणी करायची तर १५०० रुपये खर्च होतो. पाच एकर क्षेत्र असेल तर हाच खर्च ७५०० रुपयांवर जातो. आम्ही नांगरणीसाठी घेतलेल्या यंत्राचा वापर सुरू केला तर हाच खर्च एकरी १०५० रूपयांवर येतो. म्हणजेच एकरी ४५० रुपयांची बचत तर पाच एकरसाठी २, २५० रूपयांची बचत होते. रोटावेटरच्या तसेच पेरणीसाठीच्या खर्चातही साधारण याच स्वरूपात बचत होते. आम्ही सदस्यांकडून यंत्राच्या देखभालीसाठी विशिष्ट रक्कम घेतो. आम्हांला हंगामासाठी त्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. खड्डे खोदण्याच्या यंत्राने वाचवले पैसे होंडे म्हणाले की शेडनेटस उभारण्यासाठी आम्हाला खड्डे खोदावे लागतात. आम्ही हेच काम बाहेरून करून घेतले असते तर खर्च वाढला असता. त्यावर उपाय म्हणून ९५ हजारांचे यंत्र आम्ही खरेदी केले. त्यासाठी ४५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. संपर्क- अण्णासाहेब होंडे-९०४९७५५४६१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.