बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५ शेतकरी महिलांनी एकत्र येत यशस्विनी ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली आहे. त्याद्वारे स्वउत्पादीत विविध डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थांना विविध बाजारपेठांचे स्त्रोत मिळवले आहेत. त्यातूनच अल्पावधीत कंपनीने चार कोटींची उलाढाल करण्यापर्यंत झेप घेतली आहे. अनिता माळगे यांच्या पुढाकारातून उभारलेली राज्यातील ही बहुधा पहिलीच महिला शेतकरी उत्पादक कंपनी असावी. सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून १५ किलोमीटरवर असलेले बोरामणी हे भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध गाव आहे. पडवळ, दोडका, हिरवी मिरची, टोमॅटो आदींच्या भरघोस उत्पादनात गावचा हातखंडा आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे येथील बाजारपेठांत येथील भाज्यांनी ओळख तयार केली आहे. गावातील सौ. अनिता माळगे या प्रयत्नवादी महिला शेतकरी आहेत. परिसरातील महिलांना संघटित करून त्यांनी शेतकरी गटाची स्थापना केली. ‘आत्मा’चे तत्कालीन प्रकल्प संचालक विजयुकमार बरबडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॅा. एल. आर. तांबडे, नाबार्डचे सरव्यवस्थापक प्रदीप झिले, तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी सतीश वाघमोडे, आत्माचे तालुका व्यवस्थापक विक्रम फुटाणे यांनी या कामात मोठी मदत केली. त्यातून १० गट तयार झाले. त्यांना गटाचे महत्त्व, सामूहिक शेती, विक्री व्यवस्था आदी विषयांवर तज्ज्ञांची चर्चासत्रे घेतली. अर्थात महिलांमध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. गटाचा प्रवास
शेतकरी कंपनीची उभारणी पाहाता पाहाता सन २०१५ मध्ये गटांची संख्या १८ वर पोचली. त्या वेळी सुमारे साडेतीनशे महिलांचे संघटन झाले होते. त्यातूनच शेतकरी कंपनीची संकल्पना पुढे आली. अर्थात ही गोष्ट सोपी नव्हती. आराखडा, उद्दीष्ट, स्वभांडवल अशा अनेक अडचणी होत्या. अखेर हिंमतीने सर्वातून मार्ग काढत यशस्विनी ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी उभी राहिली. मिळाली प्रेरणा, वाढला आत्मविश्वास बोरामणी येथील सौ. अनिता माळगे या कंपनीच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या सदस्य महिलांना प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. त्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई, बारामती या भागातील प्रदर्शने, चर्चासत्रे, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहली आयोजित केल्या. निर्यातदार कंपन्यांसोबत भेटी घडवून आणल्या. शेतमाल उत्पादन, मार्केटिंग या पातळ्यांवरील वस्तुस्थिती आणि संधी महिलांना जवळून अनुभवता आली. यातील काही महिला पूर्वी फारशा घराबाहेर पडल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी हा अनुभव प्रेरणा देणारा ठरला. प्रक्रिया उद्योगाचा विचार कंपनीने प्रक्रिया उद्योगावर भर दिला. डाळमिल, क्लिनिंग, ग्रेडिंग यंत्रणा उभारण्याचे ठरले. एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा आराखडा होता. स्वभांडवलासाठी गटातील सदस्यांचे चार लाख रुपये भांडवल होते. महाराष्ट्र स्पर्धाक्षम प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीचे कार्य सुरू झाले. प्रतितास अडीच टन ग्रेडिंगची तर प्रतिदिन दीड टनांपर्यंत डाळमिलची क्षमता आहे. महिलांची कंपनी- दृष्टिक्षेपात
विक्री व्यवस्था पुणे, मुंबई भागातील विविध प्रदर्शने, महोत्सव आणि थेट ग्राहकांना स्वच्छ, दर्जेदार डाळी व धान्य पुरवठा होतो. कोणत्याही प्रकारच्या पॅालिशिंगशिवाय डाळ तयार केली जाते. त्यामुळे बाजारातील दरांपेक्षाही प्रति किलोमागे २० ते ३० रुपये जास्तीचे मिळतात. सध्या एक ग्रेडच्या तुरीला १२० रुपये प्रति किलो तर बाकी ग्रेडला ७० ते ९० रुपये, हरभरा डाळीला ८० रुपये तर उडीद डाळीला १०० रुपये दर मिळाला आहे. नुकताच आघाडीच्या मॅालशी करार. भाजीपाला, शेंगाचटणी, मसाले पदार्थ, चटण्या, धान्य आदींचा होणार पुरवठा सकाळच्या तनिष्का व्यासपीठाचा फायदा कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे यांच्यासह अनेक महिला सकाळच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्य आहेत. या माध्यमातून आम्हाला उद्योगाचे प्रशिक्षण मिळाले. आम्ही आत्मनिर्भर झालो अनेक संधी मिळाल्याचे सौ. माळगे यांनी सांगितले. तनिष्काच्या माध्यमातून मेक्सिको येथील अभ्यासक मिस मारियाना यांनीही भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क - सौ. अनिता माळगे - ९८८१९९८११२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.