दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे प्रयत्न

विकतच्या पाण्याने जगवली बाग फळबाग लागवडीनंतर काही काळातच (२०१५) परिसरात भीषण दुष्काळ पडला. झाडे वाळून जाण्याच्या मार्गावर असताना लातूरहून टँकर मागविला. तब्बल चार महिने टँकरने पाणी दिले. त्यासाठी ८३ हजार रुपयांचा खर्च आला. विकतचे पाणी विहिरीत साठवित असत. ठिबकद्वारे काटकसरीने ते झाडांना देऊन फळबाग जगवली.
आपल्या लिंबाच्या बागेत सुधीर सोनवणे
आपल्या लिंबाच्या बागेत सुधीर सोनवणे

लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाशी सातत्याने सामना करीत आहे. तरीही पाच एकरांवरील विविध फळपिकांचे नंदनवन फुलविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे ३५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारून, प्रसगी पाणी विकत घेऊन त्यांनी बाग सुकू दिलेली नाही. त्यांच्या कष्टाला आता गोड फळे येण्यास सुरवात झाली आहे. दुष्काळातही माळरानावर हिरवाई दृष्टीस पडू लागली आहे.  लातूर जिल्ह्याला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने सहन करावा लागत आहे. चाकूर तालुक्यातील वाघोली परिसरात सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते. मात्र ऐन भरात पीक असताना पावसाने पाठ फिरवून शेतकऱ्यांच्या आशाआकाक्षांवर पाणी फिरवल्याचे दृश्य अलीकडील वर्षांत पाहावयास मिळाले आहे.  दुष्काळाची परिसीमा  वाघोलीचे पंढरीनाथ सोनवणे व त्यांचा उच्च शिक्षित मुलगा सुधीर सोनवणे दुष्काळाशी संघर्ष करीत आपली पाच एकर शेती जिद्दीने फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सात एकरांपैकी पाच एकरांवर त्यांची फळबाग आहे. पंढरीनाथ हे लातूर येथील एका डेअरी संस्थेत गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी कार्यरत होते. सन २०११ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरवात झाली. सुधीर यांचा वकिली व्यवसाय आहे. सुटीचे दिवस तसेच अत्यंत जरुरीच्या काळात ते पूर्ण वेळ शेतीत असतात.  संघर्षातून वाटचाल  सन २०१५ च्या भीषण दुष्काळात या भागातील विहिरी व कूपनलिका यांना पाण्याचा थेंबही नव्हता. परिणामी अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच सोनवणे यांना आपल्याकडील पाच जनावरांची विक्री करावी लागली. एकतर माळरान व त्यात पावसाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्षे शेतीत फक्त नुकसान सोसावे लागत होते. लागवड केलेल्या फळबागेलाही विकतचे पाणी देऊन खर्चात वाढ होत होती. तरीही हार न मानता जिद्दीने परिस्थितीला तोंड देत शेती जगवण्याचा प्रयत्न सोनावणे करीत राहिले.  शेततळे उभारले  सोनवणे साधारण चार-पाच वर्षांपासून दुष्काळ सहन करीत आहेत. यंदाही फार तर दोन पाऊस झाले. शाश्वत पाणी उपलब्ध असेल तरच शेतीत काही घडू शकते हे त्यांनी ओळखले. त्यानुसार मागील वर्षी २०१७ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ३५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले. शेतपरिसरात नाला आहे. त्याचे पाणी बंधारा घालून अडवले. एका विहीर आहे. या जोरावर यंदा शेततळे भरलेले आहे. पाच एकर फळबागेला त्याचा मोठा आधार झाला आहे.  माळरानावर फुलतेय नंदनवन  पारंपरिक शेती सुरू असताना घरच्यापुरती आंब्यांची दहा झाडे लावली. त्यानंतर लिंबू, जांभूळ, चिकू, पेरू, अॅपलबेर आदींची विविधता जोपासत माळरानावर नंदनवन फुलविण्यास सुरवात केली. रोप लागवडीसाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च आला. वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सर्व क्षेत्राला कुंपण केले. त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला. फळबाग फुलविताना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही. फळबाग लावल्यानंतर सुमारे चार वर्षे सोयाबीन व तुरीच्या आंतरपिकातून उत्पादन खर्च कमी केला.  दृष्टिक्षेपात फळबाग 

  • आंबा-केशर, दशहरी, मलगोबा जातीच्या एकूण १६० झाडांची लागवड. गेल्या वर्षीच्या हंगामात 
  • व्यापाऱ्याला जागेवरूनच विक्री केली. त्यातून ७० ते ७२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा 
  • थेट ग्राहकांना विक्रीचे नियोजन आहे. 
  • लिंबू- सुमारे १११ झाडे. मागील वर्षी जागेवरूनच विक्री करून २८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. 
  • चिंच– शेताच्या सर्व बांधांवर ४२ झाडे. पुढील वर्षापासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल. 
  • जांभूळ- दापोली येथून १८ झाडे आणून लागवड. मागील हंगामात उत्पन्न घेतले नाही. मात्र पुढील हंगामापासून ते घेण्याचे नियोजन 
  • चिकू- सुमारे ३४ झाडे. मागील वर्षी जागेवरच विक्री. सुमारे १४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 
  • पेरू व अॅपलबेर- पेरूची ३५ व अॅपलबेरची १० झाडे. आजपर्यंत उत्पन्न न घेता वाटप केले. पुढील हंगामापासून बाजारात विक्रीचे नियोजन. 
  • सेंद्रिय घटकांचा वापर  शेतात सेंद्रिय घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आवश्यकतेनुसार शेणखत, गांडूळखत, निंबोळी अर्क आदी विकत घेतात. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे फळे चवदार बनतात. जमिनीची सुपीकताही टिकून राहते, असा अनुभव सोनवणे सांगतात.  विकतच्या पाण्याने जगवली बाग  फळबाग लागवडीनंतर काही काळातच (२०१५) परिसरात भीषण दुष्काळ पडला. त्या वेळी विहीर कोरडी पडली. कूपनलिकेचे पाणीही गेले. झाडे वाळून जाण्याच्या मार्गावर असताना लातूरहून टँकर मागविला. तब्बल चार महिने टँकरने पाणी दिले. त्यासाठी ८३ हजार रुपयांचा खर्च आला. विकतचे पाणी विहिरीत साठवित असत. ठिबकद्वारे काटकसरीने ते झाडांना देऊन फळबाग जगवली.  सेंद्रिय भाजीपाला  उर्वरित माळरानावरील क्षेत्रात मल्चिंग व ठिबकद्वारे पाण्याचा काटकसरीने वापर करून हंगामानुसार भाजीपाला लागवड करण्यात येते. जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करीत असल्याने दर्जा चांगला मिळत आहे. मागील वर्षी मे महिन्यात एक एकरवर मिरची लागवड केली. त्याचे २० क्विंटलपर्यंत उत्पादन व सरासरी २० रुपये प्रति किलो दर मिळाला. कोथिंबिरीची अर्धा एकरवर मागील मेमध्ये लागवड केली. व्यापाऱ्याला जागेवरच विक्री केली. चाळीस रुपये प्रति किलो दर मिळाला. कोथिंबीर निघाल्यानंतर एक एकरवर जूनच्या सुमारास वरणाची लागवड केली. त्यापासून ३९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अशा रितीने दुष्काळी स्थितीतही उत्पन्नाचे स्रोत सुरू ठेवले.  कृषी विभागाची मदत  फळबाग व्यवस्थापनेचा कुठला अनुभव नसल्याने सुरुवातीला काही अडचणींना तोंड द्यावे लागले. त्या वेळी कृषी सहायक सचिन पंडगे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच २०१५ च्या दुष्काळात फळबाग पुनरुज्जीवन योजनेतून शासकीय मदतही मिळाली.  संपर्क -सुधीर सोनवणे- ९४२२७४३७३८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com